Site icon InMarathi

“काय झाडी, काय डोंगर…” खिल्ली उडवताय? क्षणभर विचार करा – “हे” समजून घ्या!

shahaji im 2

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : मयूर कुपडे 

===

काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल, ओक्के मदी हाय…!! मस्करी करावीशी वाटते ना?? एक आमदार असलेला माणूस ‘असल्या भाषेत’ बोलतो याची खिल्ली उडवाविशी वाटते ना??

वाटणं साहजिक आहे.. कारण, तुम्ही अजून कधी शेणाने सारवलेल्या जमिनीवर फतकल मारून बसून बुक्कीनी कांदा फोडून शेंगदाण्याच्या चटणीबरोबर भाकर तुकडा मोडलेला नाही. चामड्याच्या कर्रकर्र करणाऱ्या जड चपला असूनही चिखलातून चालत जात, आनवानी पायानी शेतात केलेली बेणणी पाहिलेली नाही.. शेतीची औजारं वापरून वापरून हाताला पडलेले घट्टे तुम्हाला कधी माहितच नाहीत..

घरी आलेल्या पाव्हण्याला, “या की ओ पाव्हणं…..” म्हणत कधी बसायला घोंगडं आंथरलेल नाही. आलेल्या पाव्हण्याला बायकोने दोन किमीवरून भरून डोक्यावरून आणलेल्या पाण्याच्या हंड्यातलं तांब्याभर पाणी आणि साखरेचा गुळमाट चहा कधी दिलेला नाही..

 

 

कधी शेतात बैल बसला तर जोत खांद्याला लावत दुसऱ्या बैलाला साथीला घेत कधी तुम्ही पाय भेगाळून जाई पर्यंत शेत नांगरलेल नाही.. वावरात पिकलेल्या भाजीपाल्याचा, ज्वारी बाजरीच्या मोटक्याचा वानोळा तुम्ही कधी दिला नाही की तुम्हाला कधी मिळाला नाही..

घाटावरच्या ऐन थंडीत आईच्या सुती लुगड्यात आणि आज्जीच्या वाकळीत लपेटून तुम्ही कधी घोंगडीवर निजलेला नाहीत.. त्यामुळे तुम्हाला त्या रांगड्या, अशुद्ध पण अंत:करणातून आलेल्या शब्दांवर कोट्या कराव्याश्या वाटणं सहाजिक आहे… !!

स्वाभाविक आहे हे.. कारण रस्त्याने चालायची वेळ कधी आलीच तर शेजारून जाणाऱ्या कारने उडवलेला चिखलाचा एखादा शिंतोडा कपड्यावर पडला तर “ओह शीट..” असे उद्गार तुमच्या तोंडून सहज बाहेर पडतात..

 

 

तुम्हाला नाहीच कळू शकत दुष्काळी भागातून आलेल्या एखाद्या माणसाला इतके निसर्गसौंदर्य बघून वाटत असलेल आश्चर्य… !! त्या क्लिपमध्ये आमदार शहाजीबापू पाटील पुढील ओळी देखील म्हणाले आहेत….

अकरा वेळा निवडून आलेल्या माणसाच्या मतदारसंघात चाळीस वर्ष झटतूय!! मेलु मी! माझ घरबारं बरबाद झालं! पाटलाची सून आसून माझ्या बायकुला लुगडं नीट मिळंना!! दीडशे एक्कर जमीन विकलिया आज पातुर!! आजुन काय करायचं राहीलया!!

पोचतायत भावना???? या खऱ्या कार्यकर्त्याच्या….??? जमिनीचा तुकडा विकायला लागणं हे शेतकऱ्याच्या लेखी काळजाचा लचका तोडण्यासारखं असतं हे स्क्वेअर फुटांवर संपत्ती मोजून दोन अडीच BHK ला जग मानणाऱ्या कोट्यधीश असलेल्यांना काय कळणार?

 

चाळीस वर्ष झटून काम करणं म्हणजे काय हे अशा लोकांना नाहीच समजणार.. आणि त्यामुळेच तुम्हाला खिल्लीच उडवाविशी वाटणार त्या डोंगराची…. शहाजीबापूंसारखी अनेक उदाहरणं डोळ्यासमोरून तरळून गेली म्हणून आज शेवटी सत्य परिस्थिती मांडावीच वाटली..

एक किरकोळ मागणी आहे हो या रांगड्या गड्याची… “सांगोल्याच्या पाणी योजनेला बाळासाहेबांचे म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या वडिलांचे नाव द्यायचे आहे..”

१४ पत्रं?????!!!! आपल्या पक्षाच्या एका आमदाराने १४ पत्रं लिहूनही मागणी पूर्ण होत नाही???? ल्येकराला पक्षाचा अध्यक्ष नाही हो बनवायला सांगत आहे हा साधा माणूस….!!

असो, शहाजीबापू… दिल जीत लिया आपने…. !!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version