Site icon InMarathi

इथे आधार कार्ड दाखवून पुरुषांनाच गोलगप्पे मिळतात; महिला आणि लहानांना आहे बंदी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पाणीपुरी म्हणलं की तोंडाला पाणी सुटणार नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. विशेषत: महिला वर्गात हा पदार्थ लोकप्रिय आहे. भारतभर विविध नावांनी पाणीपुरी ओळखली जाते. तिच्या बनविण्याच्या पध्दतीतही थोडाफ़ार फ़रक असतो.

मुंबईतली चटकदार पाणीपुरी, जिच्यात पुदिन्याचं तिखट चटकदार पाणी सोबत चिंचेचं गोड पाणी आणि पुरीच्या पोटात गरम रगडा असतो तर दिल्लीतले गोलगप्पे आंबटगोड पाण्याचे. बंगाली पुचका चिंचेच्या पाण्याचा आणि पुरीच्या पोटात बटाट्याचं सारण असणारा. मध्यभारतात बताशा म्हणून विकली जाणारी, खाल्ली जाणारीही पाणीपुरीच.

 

 

सर्वत्र पुरी कॉमन असली तरिही पाणी आणि पोटातल्या सारणात विविधता असते. प्रांताप्रांतातल्या पाणीपुरीत ग्वाल्हेरची एक पाणीपुरी मात्र वेगळ्याच कारणामुळे प्रसिध्द आहे.

ग्वाल्हेर मधे लोकप्रिय असणारी भगत पाणीपुरी तिच्या तिखटजाळ चवीसाठी ओळखली जातेच शिवाय आणखीन दोन कारणांसाठीही ती परिचित आहे. या पाणीपुरीच्या ठेल्यावर आधार कार्ड दाखविल्याशिवाय पाणीपुरी मिळत नाही. अशा प्रकारे आधारकार्ड बघणारं देशातलं बहुतेक हे एकमेव चाट सेंटर आहे.

हे कारण जितकं अजब आहे तितकंच दुसरं कारणही अजब आहे. या ठेल्यावर महिलांना चक्क नो एण्ट्री आहे. इथे फक्त पुरुषच पाणीपुरी खाऊ शकतात. लहान मुलं आणि विशेषत: महिलांना इथली पाणीपुरी खाण्यास सक्त मनाई आहे. तसा फलकच याठिकाणी लावलेला आहे.

काय कारण आहे या बंदीचं?

महिलांना पाणीपुरी खाण्यास मनाई वाचूनच आश्चर्य वाटलं नं? असं काय कारण आहे की भगत पाणीपुरी सेंटरवरची पाणीपुरी महिलांना खाता येत नाही? या पाणीपुरी ठेल्याचे’ मालक भगतजी यांच्या मते या पाणीपुरीची चव इतकी तिखटजाळ आहे की महिलांना इतकं तिखट सहनच होत नाही.

 

 

मुलांनाही इतक्या मोठ्या प्रमाणात तिखटाचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच या दोन्ही गटांना पाणीपुरी खाण्यास ते मनाई करतात. १९८४ सालापासून भगतजी हा पाणीपुरीचा स्टॉल चालवितात. ते सोळा वर्षांचे असल्यापासून हा ठेला आहे. आजही त्यांच्या स्टॉलवर १० रुपयात ४ गोलगप्पे म्हणजेच पाणीपुरी मिळते.

गंमत म्हणजे या चार पुर्‍यादेखील कोणी पूर्ण खाऊ शकत नाही. पहिल्या पुरीनंतरच खाणार्‍याचा रॉकेटसिंग होऊन कानातून धूर निघतो. असं असलं तरिही लांबून लांबून खवैय्ये ही पाणीपुरी खाण्यासाठी येतात आणि रांगा लावून ती खातातही.

भगतजी असं सांगतात की, काही मुलं आणि महिलांनी ही पाणीपुरी खाण्याचा प्रयत्न केला तरिही त्यांना हे पचत नाही. मुलांना लगेचच उलटी होते तर महिलांना चक्कर येते.

इतर पाणीपुरीत असतं तसंच कोथिंबीर पुदिन्याचं पाणी असतं, ज्यात खास हैद्राबादी हिंग घातला जातो आणि भगतजींची सिक्रेट रेसपी असणारा मसाला, जो तिखटजाळ असतो. इथे चिंचगुळ\खजुराचं गोड पाणी असणारी पाणीपुरी मिळतच नाही त्यामुळे ज्यांना तिखट झेपत नाही त्यांनी इकडे न गेलेलंच बरं.

 

 

भगतजी सांगतात की त्यांच्याकडे हा स्टॉल योगायोगानंच आला. ते रेल्वेत चना विकण्याचं काम करत आणि त्यांचा मित्र पाणीपुरी विकत असे. भगतजी यांनी हा स्टॉल घेतला. बघता बघता ही पाणीपुरी लोकप्रिय झाली.

त्यांचा असा दावा असा आहे की या पाणीपुरीत केवळ मसाले नाहीत तर काही वनौषधिही आहेत. पुण्यात जशा हॉटेलमधे पाट्या असतात तसाच इथेही सूचनांचा एक निबंधच लटकविण्यात आलेला आहे.

तर मंडळी तुम्हीसुद्धा पाणीपुरी लव्हर असाल आणि या पाणीपुरीचा आस्वाद किंवा चॅलेंज घ्यायचा असेल तर नक्कीच या ठेल्याला अवश्य भेट द्या, आणि तुम्हालासुद्धा अशी अतरंगी खायची ठिकाणं माहीत असतील तर त्याबद्दल कॉमेंटमध्ये अवश्य कळवा!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version