Site icon InMarathi

“एक दिवसीय पंतप्रधान” – भारतात घडून गेलेली अज्ञात ऐतिहासिक घटना…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

२००१ मध्ये ‘नायक’ नावाचा एक सिनेमा आला होता. ज्यामध्ये एका पत्रकार व्यक्तीला ‘एक दिवसाचा मुख्यमंत्री’ होण्याची संधी मिळते आणि त्या एका दिवसात तो पूर्ण यंत्रणा बदलून टाकतो.

लोकांना हा सिनेमा आवडला होता, पण इतके राजकीय पक्ष, युती अशी गुंतागुंत असलेल्या भारताच्या राजकारणात असं काही होणं शक्य नाहीये असाही एक सूर तेव्हा उमटला होता,पण १९६१ मध्ये आपल्या स्वतंत्र भारतात अशी एक घटना घडली होती हे वाचून आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल.

फरक इतकाच होता की, ही व्यक्ती ‘एक दिवसाचा पंतप्रधान’ झाली होती हे त्याहून मोठं आश्चर्य आहे. ‘के.एस. बदलानी’ हे त्या नशीबवान व्यक्तीचं नाव होतं. हे नाव आपण कधीच ऐकलं नसेल याची खात्री आहे.

काय आहे ही ‘एक दिवसाच्या पंतप्रधान’ची स्टोरी ? जाणून घेण्यासाठी थोडा इतिहासात जाऊयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१७८३ मध्ये सर्वदूर पसरलेल्या मराठा साम्राज्याच्या काही भागांवर पोर्तुगीज लोकांनी अतिक्रमण केलं होतं. पोर्तुगीज हे मोठ्या संख्येने महाराष्ट्र आणि गुजरातच्या मध्ये आज असलेल्या ‘दादरा नगर हवेली’ या ५०० स्क्वेअर किलोमीटर इतक्या केंद्रशासित परदेशात ठाण मांडून बसले होते.

या भागात घनदाट जंगल, तलाव आणि ऐतिहासिक वास्तू असल्याने पोर्तुगीज हे लपून बसले तरीही त्यांना तिथून हुसकावून लावणं हे मराठा सैनिकांना अवघड जात होतं.

आपल्या पराक्रमाची शर्थ करून मराठा सैन्याने पोर्तुगीज सैन्याचं ‘संताना’ हे जहाज उध्वस्त केलं होतं, पण ते पुरेसं नव्हतं. पोर्तुगीजांनी आपलं सैन्य वाढवलं आणि परिणामी असा तह झाला की, पोर्तुगीजांनी आपलं साम्राज्य हे ‘दादरा नगर हवेली’ इतक्याच भागात सीमित ठेवायचं.

१८१८ मध्ये जेव्हा इंग्रजांचं भारतातील साम्राज्य वाढवलं तेव्हा पोर्तुगीज लोकांनी ‘दादरा’चा विकास केला, तटबंदी केली आणि अशी सोय केली, की पोर्तुगीज लोकांचं साम्राज्य तिथे अनादी अनंत काळापर्यंत टिकून राहेल.

संपूर्ण भारतात तेव्हा क्रांतिकारी हे इंग्रजांना भारतातून हकलण्याचा प्रयत्न करत होते. पण, कोणीही पोर्तुगीज लोकांविरुद्ध लढा देण्यास पुढे येत नव्हतं. दादरा नगर हवेली हा आपला गड म्हणून पोर्तुगीजांनी राखून ठेवला होता.

 

 

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. इंग्रज भारत सोडून गेले, पौंडेचेरी येथे तळ ठोकून बसलेलं फ्रान्स सैन्य निघून गेलं, पण गोवा आणि दादरा नगर हवेली येथे तेव्हा सुद्धा पोर्तुगीज लोकांचंच राज्य होतं.

भारतातील आपलं सैन्य काढून घेण्यासाठी पोर्तुगीज लोकांवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव येत होता, पण ते कशालाच जुमानत नव्हते.

गोवा मधील काही क्रांतिकारी संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी पोर्तुगीज लोकांना भारतातून हकलण्याची मोहीम हाती घेतली. या संघटनांना आर्थिक बळ देण्यासाठी महाराष्ट्रातील सामाजिक संस्था सुद्धा पुढे सरसावल्या होत्या. भारतरत्न लता मंगेशकर यांनी पुण्यात एक गाण्याचा कार्यक्रम करून त्यातील आलेलं उत्पन्न हे गोव्यातील संघटनांना दिलं होतं.

२१ जुलै १९५४ या दिवशी क्रांतिकारी संघटनांच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यांना पोर्तुगीज लोकांना ‘दादरा’ मधून हकलण्यात यश आलं. दोन आठवड्यांनी पोर्तुगीज लोकांनी ‘नगर हवेली’ मधून सुद्धा आपला झेंडा उतरवला.

भारत स्वतंत्र होण्याच्या ७ वर्षांनी १९५४ मध्ये ‘दादरा नगर हवेली’त पहिल्यांदा भारताचा तिरंगा फडकला होता आणि तिथे राष्ट्रगीत गायलं गेलं होतं.

 

 

दादरा नगर हवेली पोर्तुगीजांपासून स्वतंत्र झालं तेव्हा तिथे ‘वरिष्ठ पंचायत’ बसवण्यात आली होती. १ जून १९६१ पर्यंत पंचायत राज मार्फत तिथे प्रशासन चालायचं, पण जसा तिथे येणाऱ्या उद्योगांचा व्याप वाढत गेला आणि मग केंद्र सरकारला या जागेवर नियंत्रण प्रस्थापित करण्याची विनंती करण्यात आली.

भारतीय केंद्र सरकारने या प्रदेशाला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय दादरा नगर हवेली पर्यंत पोहोचवण्यासाठी आणि हा बदल घडवण्यासाठी गुजरातचे आयएएस ऑफिसर ‘श्री. के. एस. बदलानी’ यांची निवड करण्यात आली होती.

११ ऑगस्ट १९६१ रोजी ‘के. एस. बदलानी’ यांना नव्याने स्वतंत्र झालेल्या ‘दादरा नगर हवेली’चं पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आलं होतं.

एका स्वतंत्र राज्याचे पंतप्रधान असलेल्या ‘के. एस. बदलानी’ यांना नंतर भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना भेटण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं. करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आणि मग ‘दादरा नगर हवेली’ हा भाग भारताचा अविभाज्य भाग म्हणून घोषित करण्यात आला.

 

the better india

 

भारताच्या इतिहासात घडलेली अशी ही एकमेव घटना आहे जेव्हा ‘पंतप्रधान’ हे पद एखाद्या व्यक्तीला केवळ एका दिवसासाठी बहाल करण्यात आलं होतं.

‘दादरा नगर हवेली’ला स्वतंत्र लढ्यात मिळालेलं यश हे गोवा येथील लोकांसाठी प्रेरणादायी होतं. नोव्हेंबर १९६१ मध्ये गोव्यात पोर्तुगीजांपासून स्वतंत्र होण्याचे प्रयत्न अधिक तीव्र करण्यात आले.

पोर्तुगीज सैन्याने गोव्यातील जहाजांवर हल्ला केला. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने नौदल, हवाई दल यांच्या सहाय्याने पोर्तुगीज सैन्यावर हल्ला केला. ४८ तासाच्या आत गोव्याचे पोर्तुगीज गव्हर्नर जनरल मॅन्युएल ओंटीनो यांनी शरणागती पत्करली आणि गोवा भारताला परत दिला.

कमालीची गोष्ट म्हणजे भारतावर राज्य करण्यासाठी आलेले पहिले परकीय शत्रू हे पोर्तुगीज होते आणि भारतातून बाहेर पडलेले शेवटचे शत्रू सुद्धा पोर्तुगीजच होते.

‘एक दिवसाचा पंतप्रधान’ झालेल्या ‘के. एस. बदलानी’ यांचं करिअर नंतर कसं घडलं याची कोणतीही माहिती इंटरनेटवर उपलब्ध नाहीये.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version