Site icon InMarathi

घरातली व्यक्ती गेल्यावर केस पूर्ण कापायच्या प्रथेमागे ही आहेत ६ महत्वाची कारणं!

mundan featured 2 IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

घरातील व्यक्ती जाणं हा घरच्यांसाठी अतिशय दुःखद प्रसंग असतो. बराच काळ आपल्या इतक्या जवळ असणाऱ्या व्यक्तीला जड अंत:करणाने कायमचा निरोप द्यावा लागणार असतो. ती व्यक्ती आपल्याला आता पुन्हा कधीच दिसणार नाही हे कटू वास्तव सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये स्वीकारायला खूप कठीण जातं.

घरातल्या प्रत्येकाच्या मनात अशा वेळी एक न भरून निघणारी पोकळी तयार झालेली असते. पण हिंदू धर्मानुसार शरीर गेलं तरी आत्मा अमर असतो असं मानलं जातं.

 

 

त्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यूनंतरचा प्रवासही व्यवस्थित, त्या व्यक्तीच्या आत्म्याला क्लेश न देणारा व्हावा या दृष्टीने त्या व्यक्तीच्या मरणानंतर आजही काही प्रथा पाळल्या जातात.

हिंदू धर्मात शुभकार्याच्या वेळी केल्या जाणाऱ्या विधींना जसं महत्त्व असतं तसंच अशा दुःखद प्रसंगी केल्या जाणाऱ्या विधींनाही असतं. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही ठराविक विधी पार पाडले जाणं याला आपल्या संस्कृतीत महत्त्व आहे आणि आजही आपल्यातले बहुतेकजण हे विधी करतात.

ज्या घरातली व्यक्ती जाते त्या घरात त्या दिवशी काही शिजवलं जात नाही. शेजारपाजारचे पिठलं भात आणून देतात. व्यक्तीच्या मृत्यूच्या तिसऱ्या, पाचव्या, सातव्या आणि नवव्या दिवशी त्या व्यक्तीचे आवडते पदार्थ बनवले जातात.

व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहाव्या आणि तेराव्या दिवशी दहावं, तेरावं केलं जातं. ब्राह्मणाला जेवायला बोलावलं जातं. हे सगळे दिवस घरातलं वातावरण खूप बदलून गेलेलं असतं. नकारात्मक झालेलं असतं.

घरातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या विधींपैकी एक विधी म्हणजे घरातल्या पुरुषांनी पूर्णतः केस कापणं. ही प्रथा वर्षानुवर्षे सुरू असल्याचं आपल्याला माहितेय.

 

 

पण या प्रथेमागे नेमकी कुठली कारणं आहेत हे कदाचित आपल्यातल्या अनेकांना माहीत नसेल. जाणून घेऊया ती कारणं.

१. मृत्यूनंतरचे विधी करणाऱ्यांना रजस, तामो गुणांचा त्रास होऊ नये :

घरातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या घरातलं वातावरण राजसिक-तामसिक झालेलं असतं. मृत व्यक्तीच्या शरीरामुळे उत्पन्न झालेले राजसिक-तामसिक गुण काही काळ घरातल्या हवेत असतात. केसांचा काळा रंग हे राजसिक-तामसिक गुण पटकन शोषून घेतो.

मृत व्यक्तीच्या मरणानंतरच्या विधींमध्ये घरातल्या ज्या व्यक्तींचा सक्रिय सहभाग असतो त्या व्यक्तींचे केस हे गुण पटकन शोषून घेऊ शकतात आणि त्यामुळे त्यांना तीव्र डोकेदुखीसारखा त्रास होऊ शकतो. हे टाळायचं असेल तर त्या व्यक्तींनी आपले केस पूर्णपणे कापले पाहीजेत.

 

२. सकारात्मकता यावी म्हणून :

घरातल्या व्यक्तीच्या जाण्याने घरात नकारात्मकता निर्माण झालेली असते. घरातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीसाठी विधी करणाऱ्यांची पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने तयारी व्हावी यासाठी आणि शेवटचे विधी करताना त्यांच्यात सकारात्मकता असावी आणि बाकीचे विधीही त्यांना लक्षपूर्वक पार पाडता यावेत म्हणून घरातल्या पुरुषांनी केस कापणं आवश्यक असतं.

३. अहंकार नष्ट व्हावा म्हणून :

घरातली मोठी व्यक्ती जेव्हा वारते तेव्हा तिच्या जाण्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीमुळे घरातल्या पुरुषांच्या मनात अहंकाराची भावना वाढू शकते. त्यामुळे घरातली व्यक्ती वारल्यानंतर आपला अहंकार वाढला असेल तर तो नष्ट व्हावा यादृष्टीने मुंडन करणं गरजेचं असतं.

 

४. दुखवट्याचं प्रतीक :

घरातली व्यक्ती गेल्यानंतर मुंडन करणं हे दुखवट्याचं प्रतीक असतं. एखाद्या मुंडन केलेल्या व्यक्तीला पाहिल्यावर त्या व्यक्तीच्या कुटुंबातलं कुणीतरी इतक्यातच वारलं असेल हे इतरांच्या लक्षात यावं म्हणूनही मुंडन केलं जातं.

त्यामुळे एखाद्या व्यक्तीने मुंडन केलंय हे पाहिल्यावर ही शक्यता विचारात घेऊन लोक त्या व्यक्तीशी जपून बोलतात.

५. आदर व्यक्त करणे :

घरातली एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा त्या व्यक्तीने घरच्यांसाठी खूप काही केलेलं असतं याच्या आठवणी मागे सोडून जाते. ती व्यक्ती आपल्यासाठी किती महत्त्वाची होती आणि त्या व्यक्तीने आपल्यासाठी काय काय केलंय याचं स्मरण ठेवून त्या व्यक्तीविषयी आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही हा विधी केला जातो.

 

६. अलिप्तता यावी म्हणून :

घरातल्या व्यक्तीचा मृत्यू होणं ही गोष्ट घरच्यांना फार अस्वस्थ करणारी असते. घरातली वारलेली मोठी व्यक्ती जोपर्यंत होती तोपर्यंत आपल्याला त्या व्यक्तीचा किती आधार होता, त्या व्यक्तीकडून किती मार्गदर्शन मिळत होतं हे घरच्यांना फार तीव्रपणे जाणवतं.

त्यामुळे या सगळ्या अनुभवात फार काळ गुंतून न पडता मनात एक अलिप्तता यावी आणि बदललेल्या आयुष्यासाठी स्वतःला तयार करता यावं यादृष्टीनेही मुंडन करणं महत्त्वाचं असतं.

पुरुषच मुंडन का करतात? बायका का करत नाहीत?

पूर्वीच्या काळी नवरा गेल्यानंतर बायकांना ज्या अनिष्ट प्रथा पाळाव्या लागायच्या त्यातली एक प्रथा तिने केशवपन करणं ही होती. साधारण उच्च मानल्या जातींमध्ये ही प्रथा होती. बायकांना कायमस्वरूपी आपले केस पूर्णतः कापावे लागायचे आणि त्या डोक्यावरून आलवण घ्यायच्या.

 

 

कायमस्वरूपी विधवा झाल्याचं ते प्रतीक मानलं जायचं. आता सुदैवाने पुष्कळ ठिकाणी ही प्रथा बंद झालेली आहे. जिथे ती अजूनही अस्तित्त्वात असेल तिथल्या बायकांची यातून लवकर सुटका व्हावी.

हिंदू धर्मात घरातल्या स्त्रीमध्ये दैवी शक्ती आहे असं मानलं जातं. तिने केस वाढवणं शुभ मानलं जातं. बायकांच्या लांब केसांच्या टोकांतून सत्त्व-रजस गुण बाहेर पडतात जे नकारात्मक ऊर्जेपासून त्यांचं संरक्षण करतात असं मानलं जातं.

बायकांचे केस लांब असणं हे त्या विनम्र असल्याचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळे बायकांनी केस कापणं ही गोष्ट धर्माविरुद्ध समजली जाते. आज जरी अशी मतं राहीलेली नसली तरी आजही पुरुषच मुंडन करतात.

 

 

आपल्यातल्या काही जणांच्या घरांमध्ये आता ही प्रथा पाळली जात नसेलही पण तरीही अशा कुटुंबांचं प्रमाण कमी असावं. थोरामोठ्यांनी सांगितलंय म्हणून आणि परंपरा आहे म्हणून आपण अनेक धार्मिक विधींचं पालन करतो.

प्रत्येक वेळेस त्यांचं महत्त्व आपल्याला माहीत असतंच असं नाही. पण ते विधी, त्या प्रथा पाळण्यामागची कारणं लक्षात घेतली तर आपण अधिक जाणीवपूर्वक ते विधी पार पाडू. मुंडनाच्या प्रथेबाबतही हेच म्हणता येईल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version