Site icon InMarathi

सिनेमातल्या रॅन्चोचं कौतुक झालं, मात्र एका खऱ्या रणछोडदासने हजारो पाकिस्तानी सैनिकांपासून आपल्याला वाचवलंय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रणछोडदास म्हटलं की सगळ्यात आधी आठवतो तो ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील रँचो! छांछड असं काहीसं विचित्र आडनाव आणि त्याला रणछोडदास अशा नावाची जोड! या पात्राची आणि आमिर खानच्या उत्तम अभिनयाची खूप वाहवा झाली.

 

 

 

रँचो लोकांच्या गळ्यातील ताईत झाला. रणछोडदास या नावाची किंमत अधिक वाढली म्हणा ना. चित्रपटातील या रणछोडदासचं सगळ्यांनीच तोंडभरून कौतुक केलं, मात्र याच नावाचा एक खराखुरा माणूस अस्तित्वात होता आणि त्याने भारतासाठी मोठं काम केलं आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

चला आज जाणून घेऊया रणछोडदास नावाच्या एका खऱ्याखुऱ्या ‘हिरो’ विषयी…

फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचं जेवण…

१९७१ साली बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात भारताने महत्त्वाची भूमिका निभावली होती. भारत विरुद्ध पाकिस्तानच्या या दुसऱ्या युद्धात भारताने विजय मिळवला. बांगलादेश स्वतंत्र झाला. त्यावेळी मार्शल सॅम माणेकशॉ ढाक्यात होते.

अचानक त्यांनी एक वेगळंच फर्मान सोडलं. आज पागीसह जेवणार असल्याचं त्यांनी म्हटलं. त्याला बोलवून घ्या अशी सूचना सॅम यांनी देताच एक हेलिकॉप्टर या पागीला घेऊन आलं.

 

 

त्याला घेऊन येत असताना, एक पिशवी खाली राहिली. याच पिशवीसाठी चक्क हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरवण्यात आलं. ‘ज्या पिशवीसाठी हेलीकॉप्टर पुन्हा खाली उतरवलं गेलं, त्या पिशवीत एवढं अमूल्य असं काय असेल बरं?’ हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? तसाच तो त्यावेळी सगळ्यांना पडला होता. त्याचं उत्तर कळल्यावर मात्र सारेच आश्चर्यचकीत झाले.

या पिशवीत दोन पोळ्या, एक कांदा आणि बेसनाचा एक पोळा होता. या दोन पोळ्यांपैकी एक पागीने खाल्ली, तर दुसरी सॅम माणेकशॉ यांनी!

कोण होता हा पागी?

२००८ साली मार्शल माणेकशॉ हॉस्पिटलमध्ये असताना या पागीचं नाव सतत घेत असत. त्यांना या पागीविषयी विचारलं गेलं त्यावेळी त्यांनी मोठा खुलासा केला होता.

पागी या शब्दाचा अर्थ मार्गदर्शक असा होतो. ‘रणछोडदास रबारी’ या नावाच्या व्यक्तीला माणेकशॉ पागी असं संबोधत असत. आज हे पागी म्हणजे रणछोडदास यांच्या नावाने गुजरातच्या सीमाभागात चक्क भारतीय सेनेच्या एका ठाण्याला त्यांचं नाव देण्यात आलं आहे.

 

 

एवढंच नाही तर तिथे त्यांचा पुतळा सुद्धा उभारण्यात आला आहे. भारतीय सेनेच्या ठाण्याला एखाद्या सामान्य व्यक्तीचं नाव दिलं जाण्याची ही पहिलीच घटना म्हणायला हवी.

प्रतिभेला तोड नाही

गुजरात सीमेवरील एका छोट्याशा गावामध्ये राहणारा रणछोडदास हा चक्क भारतीय सेनेसाठी एक मोठा मार्गदर्शक होता. पावलांचे नुसते ठसे पाहून माणसाचं वय आणि शरीरयष्टी यांचा अंदाज बांधणं, उंटांच्या पायांच्या ठशावरून त्यावर स्वार असणाऱ्या माणसांची संख्या ओळखणं, अशा गोष्टी तो अगदी लीलया सांगायचा.

 

 

ती व्यक्ती अथवा उंट किती दूर गेला असावा, कधी निघाला असावा याबद्दल सुद्धा उत्तम ठोकताळे बांधणं त्यांना जमत असे.

पहिल्यांदा मदतीला आला…

भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये २ युद्ध झाली आहेत. यातील १९६५ च्या युद्धात सर्वप्रथम रणछोडदास भारतीय सेनेच्या मदतीला धावून आला.

या युद्धात एका भारतीय चौकीवर पाकिस्तानी सैन्याने कब्जा केला. अवघ्या ३ दिवसात एका विशिष्ट ठिकाणी पोचणं भारतीय सानियाला आवश्यक होतं. वाळवंटाच्या अगम्य वाटांवर रणछोडदास भारतीय सैन्याचा वाटाड्या बनले.

 

 

भारतीय सैन्याला नियोजित वेळेच्या तब्बल १२ तास आधी इच्छित स्थळी पोचता आलं, याच श्रेय रणछोडदास यांनी केलेल्या योग्य दिशादर्शनाला जातं. भारतीय सीमेजवळ लपून बसलेल्या १२०० सैनिकांचा ठावठिकाणा रणछोडदास यांनी नुसत्या पाऊलखुणा बघून सांगितला होता.

दुसऱ्या युद्धात वाढली जबाबदारी…

पहिल्या भारत विरुद्ध पाकिस्तान युद्धात भारतीय सैन्याचा मार्गदर्शक ठरलेल्या रणछोडदास यांच्यावर १९७१ च्या युद्धात अधिक जबाबदारी टाकण्यात आली.

सर्वात पुढे असणाऱ्या जवानांच्या तुकडीपर्यंत शस्त्रास्त्र पोचवण्याचं जोखमीचं काम पागी म्हणजेच रणछोडदास यांनी उत्तम पार पाडलं. पाकिस्तानातील पालीनगर शहरात भारतीय सेनेने तिरंगा फडकावला होता. हे शौर्य सत्यात उतरवणं रणछोडदास यांच्यामुळे शक्य झालं होतं.

 

 

शंभरीपार…

१९६५ आणि १९७१ च्या युद्धात भारतीय सेनेसाठी भरीव कामगिरी करून दाखवणाऱ्या रणछोडदास रबारी यांना ‘संग्राम पदक, पोलीस पदक आणि सैन्य सेवा पदक अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.

सॅम माणेकशॉ यांच्या निधनानंतर काही काळातच, म्हणजे २००९ साली त्यांनी सैन्याच्या कामातून स्वेच्छनिवृत्ती घेतली. यावेळी त्यांचं वय होतं तब्बल १०८ वर्षं! पुढे २०१३ साली वयाच्या ११२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

 

रणछोडदास आपल्यातून निघून गेले असले, तरी त्यांचे अफाट पराक्रम आणि उत्तम प्रतिभा, त्यांचा त्यांनी सैन्याच्या मदतीसाठी केलेला वापर यामुळे त्यांचं नाव मात्र कायमचं अजरामर झालं आहे. ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ या उक्तीप्रमाणे आज रणछोडदास अमर झाले आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version