Site icon InMarathi

जेव्हा १०वीतल्या कोवळ्या मुलीला परीक्षा केंद्रातच जिवंत जाळलं होतं…

rinku patil featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगात सगळ्यात सुंदर भावना कोणती? याचं एकच उत्तर आहे प्रेम. प्रेमाची भाषा आंधळ्या माणसाला दिसते, बहिऱ्याला ऐकू येते, आणि बधिर माणसाला समजते. खूपदा प्रेम न बोलताही कृतीतून दिसतं. व्यक्त करता येतं.

ही नवी पिढी प्रेमाच्या बाबतीत काही अंशी नशीबवान म्हणायला हरकत नाही. कारण आता प्रेम हा काही टबू म्हणजे निषिद्ध विषय राहिला नाही. मुलं मुली एकमेकांशी मोकळेपणी बोलतात, सुख दु:ख वाटून घेतात. सहलीला जातात.

 

 

थोडक्यात काय आता या गोष्टी आता सर्वसामान्य झाल्या आहेत. पालकही या गोष्टी सह्जावारी घेतात.

एक काळ असा होता की एक मुलगा मुलगी बोलतात ही गोष्ट पण लोकांना संशयाने बघायला लावायची. कारण तेव्हा मुलींना मित्र असणं किंवा मुलांना मैत्रीण असणं ही गोष्ट समाजाला मान्यच नव्हती. त्यामुळे असं काही आहे म्हटलं की थेट ती मुलगी चांगली नाही असे मापदंड हातात घेऊन समाज उभाच असायचा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अगदी पालक सुद्धा आपल्या मुलींना सक्त ताकीद द्यायचे, कॉलेजला पाठवतो आहे. फक्त शिक्षण करा. त्यामुळे त्या काळात मुली मुलांशी बोलायचं धाडस करतच नव्हत्या. अगदी शाळा संपून कॉलेजला गेल्यावर पण अशा गोष्टी दुर्मिळ असत.

अशाच प्रेमाच्या एकतर्फी रंगाने एका तरुण मुलीचा जीव घेतला होता. सबंध महाराष्ट्र त्या घटनेने हादरला होता. आजही लोक ती घटना विसरले नाहीत. ती घटना होती रिंकू पाटील हत्याकांड. काय होतं हे रिंकू पाटील प्रकरण?

 

 

उल्हासनगरमधील रिंकू पाटील ही एक तरुण मुलगी. दिसायला ही मुलगी छान होती. दहावीत शिकत होती. अवघं सोळा वर्ष वय. पण तिची शरीरयष्टी उफाड्याची होती, ती थोडी मोठी दिसायची. त्याच गावातील हरेश पटेल या तरुणाची रिंकूवर नजर पडली. आणि तो तिच्या प्रेमातच पडला.

त्याने खूप वेळा रिंकूसोबत बोलायचा प्रयत्न केला. आपल्या प्रेमाची तिला जाणीव करून देण्यासाठी तो धडपडत होता. पण रिंकू त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हती. त्याच्या कुठल्याही प्रयत्नाला रिंकूने दाद दिली नाही.

त्यामुळे त्याला भयंकर राग यायचा. त्याचं प्रेम स्वीकारणे तर लांबची गोष्ट ती त्याच्याशी बोलयला पण तयार नव्हती. १९९० साली दहावीची परीक्षा सुरु होती. शाळेचा परिसर पालक विद्यार्थी यांनी फुलून गेला होता.

 

पेपर चालू होता आणि उल्हासनगर मधील एका शाळेत १० वीचे विद्यार्थी पेपर देत होते. आणि त्याच वेळी तीन तरुण शाळेत शिरले. ते होते अनुपप्रतापसिंग वर्मा,अशोक वाघ आणि हरेश पटेल.

त्यांच्या हातात पेट्रोलचा कॅन, तलवार,आणि पिस्तूल होतं. ज्या वर्गात रिंकू पेपर द्यायला बसली होती त्या वर्गाकडे निघाले. दहावीच्या परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त असतोच. तसा तिथेही होता. पण त्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाला तलवारीचा धाक दाखवून हे तरुण रिंकूच्या वर्गात शिरले.

वर्गात असलेल्या इतर मुलामुलींना, तिथे असलेल्या शिक्षकाला तलवारीचा आणि बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी बाहेर काढलं. हरेश पटेलचे मित्र वर्गाबाहेर थांबले.

हरेश वर्गात थांबला. हरेशने पेट्रोलचा कन रिंकूच्या अंगावर ओतला आणि काडी ओढली. रिंकू पेटली. त्याबरोबर दरवाजा ओढून हरेश बाहेर पडला. आणि त्याच्या साथीदारांसह निघून गेला. रिंकू जीवाच्या आकांताने ओरडत राहिली. पण कोणीही तिला वाचवायला आले नाही. अर्ध्या तासात रिंकूचा जळून कोळसा झाला.

 

 

उल्हासनगर पप्पू कलानी या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्याचं गाव. ही सारी घटना घडून गेल्यानंतर अर्ध्या तासाने पप्पू कलानीचा भाऊ नारायण कलानी व्हिडीओग्राफरला घेऊन आला. त्या खोलीत जिथे रिंकूला जाळून टाकलं तिथे जाऊन व्हिडीओ शूटिंग केलं.

त्या खोलीला बाहेरून कुलूप लावून आम्ही पोलिसांना कळवू असं सांगून तिथून ते निघून गेले. त्यानंतर एका तासाने पोलिस आले. एकूण परिस्थिती पाहून त्यांनी पंचनामा केला. जे काही पुरावे मिळाले ते घेऊन पोलिस पण निघून गेले.

उल्हासनगर येथील अजून एक नेते होते वाय.सी.पवार. त्यांनी हे प्रकरण लावून धरलं. इतके सगळे लोक असताना, पोलिस असताना या तरून मुलीचा खून होताना सगळ्यांनी बघ्याची भूमिका का घेतली? लोक बाहेरचे असतील पण शाळेची काहीच जबाबदारी नव्हती का? मुख्याध्यापकांनी लगेच पोलिसांना का नाही कळवलं? बर नंतर तरी पोलिस इतके उशीरा का आले? नारायण कलानी त्या जागी जाऊन पुरावे लंपास करून जाण्याची वाट बघत होते का?

असे नाना प्रश्न विचारून त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. मग मात्र पोलिसांना दखल घेणे भाग पडले. आणि हरेश पटेलवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्याला व त्याच्या साथीदारांना शोधायला पोलिसांनी सुरुवात केली.

 

 

रिंकूच्या मृत्युच्या तिसऱ्या दिवशी हरेश पटेलने चालत्या लोकल खाली उडी मारून आत्महत्त्या केली. मात्र त्याचे दोन साथीदार अनुपप्रतापसिंग वर्मा आणि अशोक वाघ हे पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली.

बिचारी रिंकू, कसलाही दोष नसताना जीवानिशी गेली. सोळाव्या वर्षी हरेश पटेलच्या रूपाने तिच्या आयुष्यात एकतर्फी प्रेमाचं रूप घेऊन काळ आला आणि तिला जिवंत जाळून जगातून घेऊन गेला. आजही ३२ वर्षे झाली पण त्या वेळी जे विद्यार्थी दहावीची परीक्षा देत होते त्यांना ही गोष्ट विसरणे शक्य असेल?

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version