Site icon InMarathi

Infosys मधून बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांना दणका! या कंपन्यांमध्ये नाही मिळणार नोकरी

info im 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बक्कळ पैसे मिळवून देणारं क्षेत्र म्हणून आपल्याला ‘आयटी’ क्षेत्राचं प्रचंड आकर्षण असतं. या क्षेत्राची ही एक चांगली बाजू बघताना या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर किती ताण असतो, त्यांना कुठल्या प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागतो याचा आपल्याला अंदाज नसतो.

आपली पत आणि ऐपत राखण्यासाठी या क्षेत्रातले कर्मचारी करियरच्या बाबतीतल्या त्यांच्या रोजच्या लढाया विनातक्रार लढत राहतात. पण एखादी आयटी कंपनी सोडली म्हणून एखाद्या कर्मचाऱ्याच्या पोटावरच पाय येणार असेल तर?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कर्मचाऱ्यांनी कंपनीतून बाहेर पडू नये आणि कंपनीचं नुकसान होऊ नये म्हणून एखादी अतिशय नावाजलेली आयटी कंपनीच विचित्र नियम काढून कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असेल तर? ‘Infosys’ या सुप्रसिद्ध आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर सध्या असाच अन्याय होताना दिसतोय.

 

the economic times

 

सुधा मूर्ती यांचे पती नारायण मूर्ती यांनी ज्या ‘Infosys’ कंपनीची स्थापना केली तिच्याबाबतीत हे असं काहीतरी ऐकायला येणं आश्चर्यजनक आहे. कंपनी सोडून गेलेल्या आणि सोडण्याचा विचार करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनी सोडल्यानंतरचे पुढचे ६ महिने ‘Infosys’ ची प्रतिस्पर्धी असलेल्या दुसऱ्या कुठल्याही कंपनीत नोकरी मिळू शकणार नाही असा एक धक्कादायक नियम Infosys ने काढला आहे.

कंपनीने हे असं पाऊल उचलण्यामागे नेमकं काय कारण आहे? आणि या नव्या नियमाविरुद्ध कुणी तक्रार दाखल केली आहे? हे जाणून घेऊ.

Infosys कंपनी सोडलेले आणि सोडण्याचा विचार करणारे कर्मचारी यामुळे चांगलेच चिंतेत पडले आहेत. नव्या कर्मचाऱ्यांसाठीच्या ‘ऑफर लेटर’मध्ये Infosysने एक नवं, फार कडक कलम जोडलंय. ज्यात म्हटलंय :

 

Inkhabar

“मी माझी सहमती दर्शवतो की कुठल्याही कारणाकरता Infosys मधली नोकरी सोडल्यानंतर पुढचे ६ महिने मी :

अ. Infosys मधली नोकरी सोडायच्या आधीचे १२ महिने मी ज्या ग्राहकांसोबत प्रोफेशनली काम केलेलं आहे त्यातल्या कुठल्याही ग्राहकाकडून आलेली रोजगाराची संधी मी स्वीकारणार नाही.

ब. Infosys ची कुठलीही प्रतिस्पर्धी कंपनी जर मी Infosys सोडायच्या आधीचे १२ महिने ज्या ग्राहकांसोबत कामं केली आहेत त्यांच्यापैकी कुणाहीसोबत काम करण्यासाठी मला विचारत असेल तर त्या प्रतिस्पर्धी कंपनीकडून आलेली रोजगाराची संधी मी स्वीकारणार नाही.

Infosys ने यात आपले प्रतिस्पर्धी म्हणून TCS, IBM, Cognizant, Wipro आणि Accenture या ५ बड्या आयटी कंपन्यांचा उल्लेख केला आहे.

 

Twenty19.com

प्रचंड मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडून जाणं हे Infosys ने इतका कठोर नियम करण्यामागचं कारण आहे. बाकीच्या आघाडीच्या आयटी कंपन्यांचे कर्मचारीदेखील अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या सोडत आहेत. मात्र आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत Infosys मधल्या कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडून जाण्याचा दर सर्वाधिक आहे.

गेल्या वर्षीच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये Infosys कंपनी सोडून जाणाऱ्यांचा दर २५.५% होता. या वर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत कंपनीचे ८०,००० पेक्षा जास्त कर्मचारी सोडून गेल्यामुळे हा दर २७.७ टक्क्यांवर आला. या परिस्थितीमुळे निराश झालेल्या Infosys ने कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडून जाणं थांबवण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांवर हा नवा नियम लादल्याचं दिसतंय.

IT/ITES आणि संबंधित क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आणि फायद्यांसाठी काम करणाऱ्या आणि IT/ITeS/BPO/KPO च्या कर्मचाऱ्यांना ज्या समस्यांचा सामना करावा लागतो त्या समोर ठेवून त्याबाबत कृती करणाऱ्या Nascent Information Technology Employees Senate (NITES) या एनजीओने ‘श्रम आणि रोजगार मंत्रालय’, भारत सरकार, ‘मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स’ कडे Infosys च्या या कठोर नियमासंदर्भात Infosys विरुद्ध तक्रार केली आहे.

 

NITES ने दिलेल्या विधानानुसार, आपल्या तक्रारीत NITES ने Infosys विरुद्ध योग्य ती कारवाई केली जावी अशी विनंती केली आहे आणि रोजगार करारातून इतकी बेकायदेशीर, अनैतिक आणि अनियंत्रित कलमं काढून टाकण्यासाठी Infosys Ltd ला आवश्यक ते आदेश जारी केले जावेत अशी मागणी केली आहे.

NITES च्या अध्यक्षा असलेल्या हरप्रीत सलुजा यांनी ही तक्रार दाखल केली असून आपल्या पत्रकात त्यांनी म्हटलंय की, Infosys च्या कर्मचाऱ्यांसाठीचं हे कलम ‘करार कायद्या’च्या कलम २७ अंतर्गत बेकायदेशीर आहे आणि याची अंमलबजावणी करण्यापासून कंपनीला थांबवलं जावं अशी विनंती त्यांनी केली आहे.

या पत्रकात त्या लिहितात, “कर्मचाऱ्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठीच्या  मिळकतीवर त्यांचा वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याची अंमलबजावणी करण्यापासून कंपनीला थांबवलं जावं.”

Infosys मधल्या व्यवस्थापकांनी मात्र असं सांगितलंय की गेल्या वर्षीच्या १२ महिन्यांच्या तुलनेत या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये कंपनीचे कर्मचारी सोडून जाण्याचा दर कमी झालाय आणि १ एप्रिल पासून पगार वाढ केल्यानंतर हा दर हळूहळू कमी होत जाईल अशी कंपनीला अपेक्षा आहे. २०२२ च्या आर्थिक वर्षासाठी कंपनीने ८५,००० कर्मचाऱ्यांना कामावर घेतलं.

 

 

२०२३ च्या आर्थिक वर्षात कंपनी ५०,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचा विचार करते आहे. मार्चच्या तिमाहीत कंपनीचा नेट प्रॉफिट १२ टक्क्यांनी वाढून ५,६८६ करोड डॉलर झाला आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात २२.७ टक्क्यांनी म्हणजेच ३२,२७६ करोड डॉलरने वाढ झाली आहे.

कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडून जाण्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी कंपनीने असा चुकीचा निर्णय न घेता कर्मचारी आणि कंपनी या दोघांचं हित लक्षात घेऊन सर्वांगीण विचार करायला हवा होतं. Infosys हे नाव फार सन्मानाने उच्चारलं जातं होतं.

आपल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत Infosys ने केलेल्या या सक्तीमुळे नाही म्हटलं तरी काही अंशी या सन्मानाला धक्का पोहोचला आहे. Infosys च्या कर्मचाऱ्यांवर हा अन्याय होऊ न देण्यासाठी सरकार ठोस पावलं उचलेल अशी अपेक्षा करूया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version