Site icon InMarathi

एका व्यक्तीला आत्महत्या करण्यापासून रोखणारा असा गीतकार पुन्हा होणे नाही!

anand bakshi featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज सहज विचारले की तुम्हाला आवडणारी जुनी गाणी कुठली तर आपण ज्या ज्या गाण्यांची नावे घेऊ त्या बऱ्याचश्या गाण्यांशी एक नाव हमखास जोडले गेलेले आहे ते म्हणजे ‘गीतकार आनंद बक्षी’!

जेव्हा जेव्हा आपल्याला काही गाण्याच्या संगीताबरोबरच त्या गाण्याचे शब्द जसेच्या तसे तोंडपाठ असतात तेव्हा त्या गाण्यावर आणि आपल्यावर त्या गीतकाराची जादू असते असे म्हणतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आनंद बक्षीही हे असेच गीतकार होते, जे सामान्य परिस्थितीतूनही गाणी शोधून ते इतक्या साध्या पद्धतीने सादर करायचे की ते गाणं लोकांच्या ओठावर कायम राहिलं पाहिजे.

 

 

बक्षी यांनी जवळपास चार दशके आपल्या गाण्यांनी लोकांच्या मनावर राज्य केले.आज त्याच आनंद बक्षी यांच्याशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी सांगणार आहोत.

आनंद बक्षी यांचे बालपण :

पाकिस्तानातील रावळपिंडी येथे २१ जुलै १९३० रोजी त्यांचा जन्म झाला. आनंद बक्षी यांचे वडील रावळपिंडी येथे बँक व्यवस्थापक होते. देशाची फाळणी झाली तेव्हा बक्षी कुटुंबासह भारतात आले.

संगीत क्षेत्रात काम करण्यापूर्वी सैन्यदलात नोकरी :

तरुणपणीचा काही काळ त्यांनी सैन्यात टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम केले पण गीतलेखनाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून त्यांनी नोकरी सोडून मुंबई गाठली.

मायानगरीमध्ये त्यांची स्वप्ने पूर्ण झाली नाहीत तेव्हा पुन्हा ते सैन्यात रुजू झाले. तेथे तीन वर्षे काम केले परंतू ‘कलाकाराला त्याची कला स्वस्थ बसू देत नाही’ त्याप्रमाणे त्यांनी दुसऱ्यांदा लष्कराची नोकरी सोडली आणि पुन्हा गीतकार बनले आणि यशस्वी झाले.

 

‘भला आदमी’ चित्रपटातून पदार्पण :

१९५८ मध्ये आनंद बक्षी यांना १९५८ मध्ये आलेल्या ‘भला आदमी’ चित्रपटात गीतकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली, पण हा चित्रपट त्यांना फारसे यश मिळवून देऊ शकला नाही.

यानंतर १९६३ मध्ये राज कपूर यांनी त्यांना त्यांच्या ‘मेहंदी लगे मेरे हाथ’ या चित्रपटात गाण्याची संधी दिली. त्यानंतरच बक्षी यांची लोकप्रियता वाढली आणि त्यांना काम मिळू लागले.

कपूर घराणे म्हणजे बॉलिवूडमधील मानाचे घराणे. १९६५ साली शशी कपूर यांची कारकीर्द जरा वाईट वळणावर होती.त्यांचे बरेचसे चित्रपट त्यावेळी चालत नव्हते अशावेळी आनंद बक्षी यांच्या गाण्यांची जादू चालली आणि शशी कपूरांचेही नशीब पालटले.

 

 

१९६५ च्या मध्ये ‘जब जब फूल खिले’ या चित्रपटाद्वारे बक्षी यांना खरी ओळख मिळाली, ज्यात त्यांनी ‘परदेसीस से ना आंखियों मिलाना’, ‘ये समा.. समा है ये प्यार का’, ‘एक था गुल, एक थी बुलबुल’गाणी लिहून स्वत:चाच नव्हे, तर कपूर घराण्याचा दिवा असलेल्या शशी कपूर यांची बुडत चाललेली कारकीर्दही वर नेली.

सुपरस्टार बनवणारा गीतकार :

बॉलिवूडचे पाहिले सुपरस्टार कोण तर राजेश खन्ना! त्यांच्या फॅन्सचे आणि त्यांचे नाते आणि त्यांची किस्से आपल्याला नवीन नाहीत.राजेश खन्ना सुपरस्टार होण्यामागे सर्वात मोठा वाटा होता त्यांच्या गाण्यांचा.आजही ती गाणी आपण कायम गुणगुणतो.

गीतकार आनंद बक्षी यांनी ‘आराधना’, ‘अमर प्रेम’ आणि ‘कटी पतंग’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये सरस गाणी दिली, ज्यामुळे राजेश खन्ना हे भारतीय चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार बनले.

 

फिल्मफेयर नामांकनाचा रेकॉर्ड :

फिल्मफेयर पुरस्कार हा चित्रपटसृष्टीत अत्यंत मानाचा मानला जातो.आनंद बक्षी यांना लोकांचे इतके प्रेम होते की त्यांना ४१ वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

४१ वेळा नामांकन हा विक्रम म्हणजे लोकांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या गाण्यावर केलेले प्रेमच होते. यापैकी चार वेळा ते हा पुरस्कार जिंकू शकले.

त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक पिढ्यांसोबत काम केले आणि त्यांची खासियत म्हणजे त्यांची लेखनशैलीही काळानुसार बदलत गेली. कदाचित त्यामुळेच ती गाणी लोकांना खूप आवडत असतील.

एका गाण्यासाठी भर पावसात पायपीट :

१९५८-५९  च्या सुमारास त्यांच्याकडे चित्रपट नव्हते. एकदा ते फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये संगीत दिग्दर्शक रोशन यांना भेटले व त्यांनी लिहिलेली गाणी रोशन यांना ऐकण्याचा आग्रह केला. खूप आग्रह केल्यानंतर रोशन साहेबांनी होकार दिला आणि दुसर्‍या दिवशी रात्री १० वाजता त्यांच्या सांताक्रूझ येथील घरी बोलावले.

 

 

बक्षी त्यावेळी त्यांच्या एका मित्रासोबत बोरिवलीमध्ये राहत होते.मात्र त्याच रात्री एवढा पाऊस झाला की मुंबई पाण्यात बुडून गेली. दुसऱ्या दिवशी बस, रेल्वे, टॅक्सी सर्व बंद झाले होते. सगळ्या रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते.

मात्र बक्षी यांनी अंदाज लावला की मी ६ वाजता चालत बोरिवलीवरून निघालो तर १० वाजेपर्यंत सांताक्रूझला पोहोचेल. आणि ठरलं..आनंद बक्षी त्यांची गाणी ऐकवायला बोरिवलीहून सांताक्रूझला चालत आले. बरोबर १० ला रोशन साहेबांचा दरवाजा ठोठावल्या वर त्यांनी विचारले “अरे आनंद आज एवढ्या पावसाचं..पायपीट करत येणं.. गरजेचं होतं का ?”

त्यावेळेस बक्षी म्हणाले “तुमच्यासाठी नाही पण माझ्यासाठी खरंच गरजेचं होतं !”

तुमच्या शब्दांनी माझी आत्महत्या रोखली..!

एका त्यांच्या चाहत्याने त्यांना एक चिठ्ठी लिहिली होती त्यात असे होते की..माझी घरची परिस्थिती बेताचीसुद्धा नव्हती,पैसे नव्हते सगळं काही संपलं असं मला वाटत होतं. मी ठरवलं की आता आत्महत्या हा एकंच उपाय माझ्यासमोर आहे.

मी त्या खचलेल्या अवस्थेत रेल्वेच्या रुळावर गेलो आणि जीव देणार इतक्यात बाजूच्या झोपडपट्टीतून रेडिओवर सुरू असलेल्या गाण्याचे शब्द माझ्या कानावर पडले ‘गाड़ी का नाम न कर बदनाम, पटरी पे रख के सर को, हिम्मत न हार कर इंतज़ार आ लौट जाएं घर को’ ह्या शब्दांनी मला वेगळीच ताकद दिली आणि मी माझा निर्णय बदलला.

 

 

तुमच्या गाण्यामुळे मला एक नवीन आयुष्य मिळालं..आज मी उत्तमरीत्या अडथळ्यांमधून वर आलेलो आहे.

मंडळी,एका गीतकारसाठी याहून मोठी पावती ती काय असू शकते. अश्या आपल्याला, आपल्या चित्रपटसृष्टीला गीतलेखनाने समृद्ध करणाऱ्या आनंद बक्षी यांना विनम्र अभिवादन!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version