Site icon InMarathi

गेहराईयां : प्रेक्षकांच्या मनात ‘खोलवर’ उतरण्यात सिनेमाला यश मिळालंय का?

gehraiyaan featured 2 IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

गेहराईयां या सिनेमाचा ट्रेलर जेव्हा आला तेव्हापासूनच सोशल मीडियावर याच्या विषयाची आणि त्यातल्या बोल्ड सीन्सची चर्चा रंगली होती. एकंदरच बॉलिवूडच्या या विवाहबाह्य संबंधांवर बेतलेल्या या कॉन्सेप्टला लोकं खरंच वैतागली आहेत त्यामुळेच कदाचित लोकांनी असा प्रतिसाद दिला असावा!

मी मात्र या सिनेमाविषयी उत्सुक होतो कारण दिग्दर्शक शकुन बत्राचा हा तिसरा सिनेमा. एक मै और एक तू पाहायचं धाडस मी केलं नव्हतं पण त्याने दिग्दर्शित केलेला कपूर अँड सन्स या सिनेमाने मनात एक वेगळीच जागा निर्माण केली होती!

 

 

कपूर अँड सन्समध्ये शकुनने ज्याप्रकारे मानवी भावना हाताळल्या होत्या त्यामुळेच मी त्याचा चाहता झालो होतो हे अगदी खरंय, कपूर अँड सन्समधली त्याने आपल्यासमोर मांडलेली पात्रं ही आपलीशी वाटत होती.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कौटुंबिक कलह, त्यातून होणारा मनस्ताप, गुंतलेली नाती आणि यासगळ्यातून तावून सुलाखून निघणारी त्यातली पात्रं ही आपल्याला बरंच काही शिकवून गेली होती, त्या सिनेमातल्या काही सीन्सनी तर अक्षरशः डोळ्यात पाणी आणलं होतं, त्यातही विवाहबाह्य संबंधावर भाष्य केलं होतंच पण ते कुठेही विद्रूप वाटत नव्हतं!

नेमकी हीच कमतरता शकुनच्या या गेहराइयां सिनेमात आपल्याला जाणवते. म्हणजे नावातली गेहराई थोडी कथानकात आणि पात्रांतसुद्धा जाणवली असती तर कदाचित हा सिनेमासुद्धा तितकाच भावला असता, पण एका चांगल्या स्टोरीप्लॉटची माती केल्यामुळे हा सिनेमा अजिबात रिलेटेबल वाटत नाही.

 

अर्थात धर्मा प्रोडक्शनचा कोणताही सिनेमा सामान्य लोकांना रिलेट होण्यासारखा नसतोच म्हणा पण कपूर अँड सन्स त्याला अपवाद ठरलेला, पण गेहराइयां हादेखील अपवाद ठरला असता पण केवळ उथळ गोष्टी ग्लोरीफाय केल्याने हा सिनेमा सपशेल फसलाय हे नक्की!

सिनेमाची कथा आहे २ चुलत बहीणींची ज्या खूप वर्षांनी एकत्र भेटतात त्यावेळेस त्यांच्यासोबत त्यांचे होणारे लाईफ पार्टनर असतात, दोन्ही बहीणींचा प्रॉब्लेमॅटिक भूतकाळ आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी यामुळे दोघी स्वतःच्याच आयुष्याशी झगडत आहेत.

नात्यात आलेला दुरावा, करियर प्रॉब्लेम आणि संवादाचा अभाव यामुळे एक व्यक्ति आपल्या पार्टनरला चीट करते आणि तिथून हा गुंता आणखीन वाढायला सुरुवात होते. नक्की कोण कोणाला फसवत आहे हे आपण ट्रेलरमध्ये पाहिलंच आहे, त्यामुळे त्याविषयी इथे बोलायला नको. पण यातूनच वेगवेगळे प्रॉब्लेम निर्माण होतात आणि शेवटी एक वेगळंच सत्य आपल्यासमोर येतं.

 

 

खरं सांगायला गेलं तर शेवटची १५ मिनिटं हा सिनेमा तुमच्यावर प्रभाव टाकण्यात यशस्वी होतो, पण त्या सिनेमाच्या शेवटाकडे येण्याचा जो प्रवास आहे तो अत्यंत असहनीय आहे.

सिनेमाच्या शेवटी बाप-लेकीमधले बरेच गैरसमज दूर होतात आणि त्यांच्या नात्यातली खोली आपल्याला तेव्हा जाणवते, सिनेमाचा हा सीन नक्कीच तुम्हाला इमोशनल करतो पण बाकी सिनेमाच्या शेवटी येणारे काही ट्विस्ट हे अत्यंत बाळबोध वाटत होते.

नावावरून हा सिनेमा जेवढा मच्युअर हवा होता तेवढा तो वाटत नाही आणि तिथेच सगळी गल्लत होते!

सिनेमातली पात्रं साऊथ बॉम्बेमध्ये राहणारी उच्चभ्रू समजातली असल्याने त्याची राहणीमान, त्यांच्या सवयी, त्यांची भाषा, याच्याशी सामान्य माणूस नक्कीच कनेक्ट होत नाही, कपूर अँड सन्समध्येसुद्धा हाच खूप मोठा फरक होता.

 

 

त्यामधली पात्रं ही श्रीमंत जरी असली तरी त्यांचे विचार, त्यांचं राहणीमान याच्याशी आपण कनेक्ट होऊ शकतो, पण गेहराइयांमध्ये साऊथ बॉम्बे कल्चरचं चित्रण करण्याच्या नादात त्या मुख्य पात्रांचा सुरच हरवलेला आपल्याला जाणवतो!

शिवाय नको तेवढा स्कीन शो आणि अनावश्यक बोल्ड सीन्समुळे तर आणखीनच वैताग येतो. सध्या आपण सगळेच अशा बोल्ड कंटेंटला सरसावलो आहोत पण तरी कथानकातले बोल्ड सीन्स तुमचं कॅरेक्टर डेव्हलप करत नसतील तर ते बोल्ड सीन्स अश्लीलतेकडेच झुकतात.

जसे गेम ऑफ थ्रोन्सच्या पहिल्या सीझनमध्ये येणारे काही न्यूड सीन्स त्या पात्रांना न्याय देण्यासाठी किंवा त्या पात्रांची मानसिकता आपल्या मनात पक्की करण्यासाठी दिले गेले आहेत त्याप्रकारे बोल्ड सीन्स समोर आले तर काही वाटत नाही.

गेहराइयांमधले बोल्ड सीन्स ही बरेचसे गाण्यांमध्येच आहेत आणि त्या सीन्सप्रमाणे ती गाणीदेखील फार बेचव आणि अनावश्यक वाटली. यातलं एकही गाणं लक्षात ठेवण्यासारखं नाही, थोडंफार बॅकग्राऊंड म्युझिक ठीक ठाक आहे पण तेही असं काही अचंबित करणारं नाहीये.

 

 

बाकी सिनेमॅटोग्राफी पाहता सिनेमा तुम्हाला नेत्रसुख नक्की देईल, पण सिनेमाचं नाव बघता जे मानसिक समाधान आपल्याला मिळायला पाहिजे ते मिळत नाही.

बाकी अनन्या पांडेचा अभिनयाचा प्रयत्न ठीक होता, धैर्य कारवाचासुद्धा अभिनय जेवढयास तेवढा होता, सिद्धांत चतुर्वेदीनेसुद्धा त्याची भूमिका उत्तम साकारली आहे, दीपिका पदूकोण अजूनही तिच्या डिप्रेशनच्या फेजमधून बाहेर पडली नाहीये असच वाटतंय.

बाकी सिनेमातले एक दोन सरप्राइज मी आत्ता सांगणार नाही, रजत कपूर नेहमीप्रमाणेच छोट्याशा भूमिकेत भाव खाऊन गेला आहे.

 

 

सिनेमातल्या पात्रांमध्येच काही खोली नसल्याने हे सगळं कथानक फार उथळ वाटतं शेवटची काही मिनिटं सोडली तर.

या शेवटच्या काही मिनिटांसाठी तुम्हाला हा अडीच तासांचा सिनेमा पाहायचा असेल तर amazon prime वर तुम्ही बघू शकता. सिनेमा अगदीच टाकाऊ आहे असं नाही पण शकुन बत्रा याने थोडा विचार करून कथेत काही छोटे बदल केले असते तर सिनेमा नक्कीच आणखीन आवडला असतं!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version