Site icon InMarathi

असामान्य कौशल्यासोबत अंगभूत ‘लहरीपणा’ घेऊन आलेला अस्सल मुंबईकर बॅट्समन..

rohit sharma inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

गांगुली, सचिन आणि मी…असे आम्ही पुढच्या महिन्यात होणाऱ्या T २० वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही… नवीन खेळाडूंना संधी उपलब्ध करून द्या.

अशा काहीतरी आशयाचा ई मेल तेव्हाचा कॅप्टन द्रविडनी BCCI ला पाठवल्याची बातमी सकाळ सकाळ वाचली होती. ह्या तिघांशिवाय टीम बनूच शकत नाही वगैरे इमोशनल विचार मनात येत होते आणि गेल्या १०-१२ वर्षाच्या क्रिकेटच्या आठवणी मनावर ‘फॉलोऑन’ लादत होत्या पण त्याचबरोबर ‘इंडियन क्रिकेट नीड्स तू मूव्ह ऑन’ वगैरे मॅच्युअर विचार ही मनात येत होते.

(मॅच्युअर विचार इंग्लिशमध्येच कसे काय येतात देव जाणे), पण अशा विचार येण्यामागे, पहिल्यांदाच होणारा २०-२० ओव्हर्सचा वर्ल्ड कप आणि टीम इंडियाचा नवीन लूक ह्याबद्दल असणारी उत्सुकता कारणीभूत असावी.

टीम अनाऊन्स झाली! युवी, धोनी वगैरे ओळखीचे होतेच. पण एक नाव वाचलं …… रोहित शर्मा फ्रॉम मुंबई!! “मुंबई क्रिकेट? अर्रे एक नंबर? आपल्याला पहिल्यापासूनच मुंबई क्रिकेटसाठी सॉफ्ट कॉर्नर.. शितावरून भाताची परीक्षा करण्यात आपली पीएचडी…

 

cricketcountry.com

एका फटक्यात … ‘रोहित म्हणजे पुढचा सचिन वगैरे.. शेवटी आपली मुंबई बॅट्समन आहे बॉस’ वगैरे बोलून मी हवेत गोळीबार करून टाकला होता!

टी २० वर्ल्ड कप सुरु झाला. माझी अनाउन्समेंट त्याच्यापर्यंत पोचली की काय असं वाटण्याइतकं तो एकदम जबाबदारीने आफ्रिकाविरुद्ध मॅचमध्ये खेळला! पहिल्या काही मॅचेस मध्ये त्याला चान्स मिळाला नव्हता, पण सेमी फायनलला जाण्यासाठी अशा ‘मस्ट विन’ गेम मध्ये तो खेळला आणि ते सुद्धा एक मॅच्युअर प्लेयरसारखा. टीमला गरज असताना आणि परिस्थितीला अनुरूप असा.

४ आउट ६० अवस्था असताना हा नवखा आला आणि काहीही प्रेशर जाणवू न देता धोनी बरोबर एक अतिशय महत्वाची पार्टनरशिप केली.

करियरच्या सुरवातीलाच आपले खांदे मोठी जबाबदारी उचलण्यासाठीच आहेत हे दाखवून दिलं! आणि सर्वात महत्वाचं होतं – T२० आहे म्हणून उगाचच हाणामारी न करता शांतपणे पीचचा आदर करून ४० बॉल ५० रन्स केले! ह्या सामन्यानंतर पुढे फायनलसुद्धा खेळला.

पहिल्या मॅच मध्ये शांतपणे खेळणारा, पाकिस्तान विरुद्ध मात्र आपल्या भात्यामधले विविध फटके मारत होता आणि पुन्हा एकदा टीमला उपयोगी अशा १५ बॉल ३० रन्स काढून आपण एक परिपक्व खेळाडू आहे हे दाखवून दिलं! ह्या २-२ छोटया पण महत्वपूर्ण इनिंगमुळे धोनीचा काय, माझाही रोहितवरचा विश्वास वाढला!

त्याची बॅटिंग म्हणजे स्वछ नैसार्गिक गुणवत्तेनी वाहणारी, बघितल्या बघितल्या मन प्रसन्न करणारी नदी आहे….असं काहीसं मला वाटून गेलं!

रोहित…तसा जन्मानी बनसोडचा म्हणजे नागपूरकर. पण बालपणापासून मुंबईकरच आणि तसं ही ‘मुंबई क्रिकेटचे’ गूण अंगात भिनण्यासाठी मुंबईत जन्म घेणं महत्वाचं नसत, पण आयुष्यातली पहिली रन किंवा पहिली विकेट ही मुंबईत काढलेली असावी लागते! मग ती गल्लीमधली असो वा शिवाजी पार्कवर…!!

घरची परिस्थिती अत्यंत साधारण असलेल्या रोहितच बालपण मात्र गेलं बोरिवलीला, काकाकडे. तिकडेच लागलेली क्रिकेटची गोडी आणि शाळेत कोच म्हणून मिळालेले ‘लाड’ सर अशा २ खांबांच्या आधाराने रोहित नामक खेळाडू घडत गेला.

 

celebritykick.com

मुंबई क्रिकेटचे संस्कार, साहजिकच आलेला मुंबई क्रिकेट स्पेशल खडूसपणा, अंडर १९ मधली जोरदार कामगिरी ह्या अशा अनेक गोष्टींमुळे नैसर्गिक गुणवत्तेच्या नदीचा आता समुद्र झाला होता आणि त्याच्या उसळणाऱ्या लाटांचा पहिला अनुभव घेतला तो २००५ साली, सेंट्रल झोननी!

रोहितच्या बॅटमधून १४२ रन्स निघाल्या होत्या!! अर्थातच अससोसिएशन मध्ये त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पुढच्याच वर्षी म्हणजे २००६ ला इंडिया ए आणि रणजी अशा दोन्ही महत्वाच्या स्पर्धांमध्ये (हो,तेव्हा आयपीएल नसल्यामुळे रणजी ला महत्वाचं मानलं जायचं ) त्याला संधी मिळाली आणि डेब्यू केला.

रणजीच्या पहिल्या काही मॅचेस फेल गेल्यानंतर मात्र त्याने अचानक चंद्रकलेप्रमाणे गिअर वाढवला आणि गुजरातच्या टीमला ‘रोहित-वादळाचा’ एक भयानक अनुभव दिला, चौफेर टोलेबाजी करत २०० रन्स मारल्या!

समुद्राच्या पोटात कश्या अफाट गोष्टी लपलेल्या असतात, अगदीच तसं रोहित कडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे शॉट्स लपलेले असतात, कुठलाही शॉट खेळल्यावर अर्जुनाच्या धनुष्यातून बाण सुटल्यासारखं वाटत. काहीही असलं तरी रोहितकडे बघताना मात्र बॅटिंग मात्र एकदम सोप्पी गोष्ट आहे वाटून जातं… !

२००६ मध्ये वन डे आणि २००७ मध्ये टी २० मध्ये पदार्पण केल्यानंतर तो टीम मध्ये चांगलाच स्थिरावला होता, पण CB सिरीज फायनलला सचिनबरोबर केलेली शतकी पार्टनरशिप त्याच्या करियरमधला माईलस्टोन आहे असा मला फार वाटतं!

भारतानं ऑस्ट्रेलियामध्ये ट्राय सिरीज जिंकणं फार क्वचित! त्यात टीम अडचणीत असताना ६६ ची छोटी पण अतिशय महत्वपूर्ण अशी इनिंग खेळून त्यानी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवायचं हे आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलं! त्या पार्टनरशिपमध्ये रोहितची बॅटिंग समोरून बघताना ‘पुढची पिढी तयार झाली आहे, आता बॅट सोडायला आपण मोकळे’ असं सचिनला नक्कीच वाटलं असेल!

 

oneindia.com

करियर मध्ये एका मागोमाग भरती सुरु असताना अचानक ओहोटी लागल्यासारखं झालं. मागून आलेले कोहली आणि रैना हे पुढे गेले. एवढच काय तर २०११ च्या वर्ल्ड कप टीमसाठी सिलेक्शन ही नाही झालं, पण ह्या सगळ्या अपयशानी डगमगेल तो समुद्र कसला.

ओहोटीनंतर भरती तर येणारच… काही दिवसांनी इंडियन बॅटिंग लाईन-अप मध्ये ‘ओपनर’ ची जागा रिकामी होती, रोहितने त्वरित ती जबाबदारी उचलली…मधल्या फळीचा आता तो…’आघाडीचा’ झाला!!

गेल्या १-२ वर्षातला कोरडा दुष्काळ त्याने धुवाधार बॅटिंग करत संपवला….शांत निपचित पडलेला समुद्र खवळला… हरवलेले सगळे शॉट्स बाहेर आले आणि वन डे मध्ये २ डबल सेंच्युरी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात १७१ मग टी २० मध्ये १०० अशा अनेक मोठमोठ्या लाटांनी समोरच्या बॉलरला चोफेर भिजवलं..लाटा कसल्या एक प्रकारची सुनामीचं होती ती! आणि आता तो खरोखरचाच आपला ‘आघाडीचा’ बॅट्समन बनलाय!

मग काही ह्या पठठ्यानी मागं वळून पाहिलं नाही… वन डे असो किंवा टी २० किंवा अगदी आयपीएल असो…रोहित शर्मा हा आपला एक महत्वाचा एक्का बनला… रोहित पाहिजेच!! अर्थातच त्याचा फॅन क्लब वाढला, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारे फॉलोअर्स वाढले.

समुद्रासारखाच लहरी असलेला हा रोहित आपल्या चाहत्यांना कधीकधी मात्र भयंकर निराश करतो. अपयश हे प्रत्येक खेळाडूच्या नशिबात असतं पण ज्या प्रकारे कधी कधी हा विकेट फेकतो ते फार आश्चर्यजनक असतं.

तिथूनच तो ‘ट्रोलर्स’च टार्गेट’ बनतो. मित्राच्या ग्रुपमध्ये कसं एखादा जो जास्त जवळचा वाटतो त्याची जास्त फिरकी घेतली जाते, रोहितचा पण तसंच…कुठलाही खेळाडू जेवढा ट्रोल होत नसेल तेवढ रोहितला टार्गेट केलं जातं, त्याची थट्टा उडवली जाते, पण जे लोकं मस्करी करण्यात पुढे असतात तेच रोहितच्या एखाद्या मोठ्या इनिंग नंतर जास्त खुश असतात!

राहुल गांधी जसा कुठं काय बोलेल हे आपण सांगू शकत नाही तसंच रोहित कधी काय करेल ह्याचा नेम नाही, कधी कधी कुठले इनोव्हेटिव्ह शॉट्स बाहेर काढून बॉलरला चकित करेल किंवा कधी मिडल स्टंपवरचा बॉल लिव्ह करून स्वतःबरोबरच फॅन्सलापण आउट करून टाकेल…. कसलाच भरवसा नाही!!

 

sports.ndtv.com

त्याच्या अशाच ह्या लहरीपणामुळे करियरच्या १० वर्षानंतरसुद्धा एवढी गुणवत्ता असलेला मुलगा टेस्ट टीम मध्ये जागा पक्की करू शकला नाही हे खुपत राहतं. कोहलीसारखा अग्ग्रेसिव्ह नाही आणि पुजारा एवढा शांत नाही. दोन्हीचं मिश्रण असलेल्या रोहितमध्ये टेस्टमध्ये सुद्धा सुनामी आणण्याची ताकद नक्कीच आहे.

किंबहुना तो असा एक प्लेयर आहे जो एका सेशन मध्ये मॅच सिच्युएशन बदलून टाकेल! पण आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळतेच असं नाही!

कधी कधी उशिरा मिळते आणि त्या गोष्टीचं महत्व पटतं! रोहित च्या बाबतीत टेस्ट टीममध्ये असंच व्हावं, क्रिकेट नामक किनाऱ्यावर बसलेल्या सर्वाना रोहितनी गार वाऱ्यासारखं प्रसन्न करावं, उंच उंच लाटांनी ओलं करावं आणि आयुष्याच्या इंनिंगमध्ये कायमचा लक्षात राहणार आनंद द्यावा…. हीच सिद्धिविनायकाकडे प्राथर्ना…!!

शेवटी …. रोहित आणि रहाणे ह्यांची टेस्टमध्ये फुल्ल डे पार्टनरशिप बघणं हेच माझ्यासारख्या क्रिकेट फॅनसाठी किनाऱ्यावरची पाणीपुरी खाण्याचा आनंद देणारी असेल!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version