Site icon InMarathi

ही असली वक्तव्य करणाऱ्या धर्मगुरूंना, संत-महात्मे का म्हणायचं, असा प्रश्न पडतो…

kalicharan 1 im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राष्ट्रपिता महात्मा गांधींना शिव्यांची, दुषणांची लाखोली वाहत चक्क बापुंचा मारेकरी नथुराम गोडसेचा उदोउदो करण्याचा विकृत प्रयत्न तथाकथित संत कालिचरण महाराज याने केला आणि देशभरात एकच रण माजलं. कालिचरणने लावलेल्या आगीची झळ राजकारण, समाजकारण या सगळ्याच क्षेत्रांना बसली.

कालिचरणच्या या वक्तव्यामुळे गदारोळ सुरु असतानाच अनेकांंनी उत्सुकतेपोटी कालिचरण नेमका आहे तरी कोण? याचाही इंटरेनटवरून शोध घेतला. स्वतःला हिंदु धर्माचे रक्षक म्हणवणाऱ्यांकडून अशा प्रकारची लज्जास्पद वक्तव्य केली जाणं, केवळ धक्कादायक विधानं करत प्रकाशझोतात येणं असे दुष्कृत्य करणारे कालिचरण हे काही एकमेव नाहीत.

 

 

यापुर्वीसुद्धा अनेक कथित संत, धर्मगुुरु, महंत यांची जीभ घसरली असून आपल्या पदाचा, भूमिकेचा मान न राखता त्यांनी विचित्र विधानं केली होती. धर्माचे, संस्कृतीचे पाईक म्हणवणाऱ्यांकडून अशा पद्धतीची विधानं ऐकल्यानंतर यांना खरंच संत, महंत का म्हणावं असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

. कालिचरण

आठवीत शिक्षण अर्धवट सोडलेला अभिजीत धनंजय सराग म्हणजेच लोकप्रिय कालीचरण महाराज. अध्यात्माकडे ओढा असल्याने त्यानी कालिमातेची आराधना सुरु केली आणि नाव बदलून थेट कालिचरण केले. एकीकडे अध्यात्मासाठी संन्यास घेतल्याचे म्हणताना दुसरीकडे राजकारणाच्या मोहापायी त्यांनी २०१७ साली निवडणूक लढवली आणि हारही पत्करली.

 

 

गेल्या काही महिन्यांपुर्वी त्यांनी गायलेली शिवस्तुती सोशल मिडीयावर ट्रेन्ड झाली आणि ते प्रकाशात आले, मात्र रायपुर येथे पार पडलेल्या धर्मसंसदेत त्यांची जीभ घसरली. पुढचा मागचा कोणताही विचार न करता,”फाळणीसाठी गांधीच जबाबदार असून त्यांच्यामुळेच मुस्लिमांना आरक्षण मिळाले” असं म्हणत त्यांनी गांधींना लाखोली वाहिली. एवढचं म्हणून ते थांबले नाहीत उलट ”गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंना मी दोन्ही हात जोडून नमस्कार करतो, धन्यवाद देतो” अशीही मुक्ताफळं त्यांनी उधळली.

त्यांच्या या वक्तव्यावर देशभरातून संताप व्यक्त केेला जात असून त्यांच्या अटकेची मागणीही जोर धरत आहे.

२. यति नरसिहानंद

धर्म संसद या कार्यक्रमाचं आयोजन एक धार्मिक नेते यति नरसिंहानंद यांनी केलं होतं. त्यांच्यावर यापूर्वीही प्रक्षोभक भाषणांनी हिंसेला समर्थन दिल्याचा आरोप करण्यात आले आहेत.

 

 

या परिषदेतही त्यांनी हिंदू धर्माचे रक्षण करायचे असेल तर त्याकरिता हाती शस्त्र घ्या, मु्स्लिम पंतप्रधान बनू नये यासाठी हा संघर्ष गरजेचा असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे परिषद गाजली.

३. धर्मगुरु आचार्य प्रमोद कृष्णम

काही वर्षांपुर्वी राजकीय वर्तुळात असहिष्णुता निर्माण झाली असतानाच त्यात आग ओतणारं विधान धर्मगुरु आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केले होते.

देशातील जनता जेवढी मुजाहिद्दीनच्या अतिरेक्यांंना घाबरते, तितकीच मोदींनाही घाबरते, असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांची तुलना थेट अतिरेक्यांशी केली होती. मोदींच्या एकाधिकारशाहीवर त्यांनी वारंवार टिका केली होती.

 

 

भाजपचे खासदार साक्षी महाराज तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही त्यांनी जळजळीत टिका केली होती. साक्षी महाराज बलात्कारी असून योगी आदित्यनाथ हे गुंड आहेत असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर अश्लिल भाषेत टिका केली होती.

४. साध्वी प्रज्ञा

वादग्रस्त महंत, धर्मरक्षक यांच्या यादीत साध्वी प्रज्ञा यांचे नाव आले नाही तरच नवल! आजपर्यंत आपल्या धक्कादायक विधानांमुळेच त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. साध्वी प्रज्ञा यांच्या वादग्रस्त विधानांचा पाढा बराच मोठा आहे.

लोकसभेत एसपीजी दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त असे म्हटले होते. तर निवडणूकीदरम्यान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जाहीर सभेत ‘वेडी’ म्हणून संबोधलं होतं.

 

 

मुंबई हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत त्यांनी खुलेआम लज्जास्पद विधान केले होते. इतरांच्या मनात भिती रहावी यासाठी करकरेंनी शाळेत आपल्या शिक्षकांची बोटे छाटल्याचे त्यांनी म्हटले होते. मला शिकवणाऱ्या शिक्षकांची बोटे ही करकेरेंनीच छाटल्याचा हवालाही त्यांनी दिला. कोणत्टयाही पुराव्याविना शहीद अधिकाऱ्याबाबत त्यांनी केलेल्या या विधानांवरून बराच गदारोळ झाला होता. मालेगाव खटल्यात माझ्यावर चुकीचे आरोप करणाऱ्या करकरे यांना शिक्षा मिळालीच असं म्हणत त्यांनी आरोपांची परिसीमा गाठली होती.

५. इंदुरीकर महाराज

आपल्या किर्तनासाठी प्रसिद्ध असलेल्या इंदुरीकर महाराजांची जीभही अनेकदा घसरली. आपल्या लोकप्रियतेचा वापर हा प्रबोधानासाठी करण्याऐवजी त्यांनी अनेकदा धक्कादाय विधानांनी वादंग निर्माण केले.

कोरोचा हाहाकार माजला असताना प्रशासन लसीकरणासाठी प्रबोधन करत होते, सामान्य रांगेत उभे राहून लसीकरणात सहभागी होत असताना इंदुरीकर महाराजांनी मात्र यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही. कोरोना हे थोतांड असून मन खंबीर ठेवा असा अजब सल्ला त्यांनी दिला होता.

केवळ एवढंच नााही तर यापुर्वीही आपल्या किर्तनातून त्यांनी अनेकदा स्त्रियांवर टिका केली होती. सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यामुळं त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

 

 

 

किर्तनकार, साध्वी, संत, महंत यांसारख्या उपाध्या या केवळ पदव्या नसून जनप्रबोधनासाठी पेललेलं शिवधनुष्य असतं. समाजाच्या उद्धारासाठी, लोककल्यासाठी अध्यात्माच्या मदतीने काम करण्याची जबाबदारी असलेली ही मंडळीच जेंव्हा अशा प्रकारची धक्कादायक विधानं करतात, बिनबुडाचे आरोप करतात, त्यावरून नवे वाद निर्माण करतात तेंव्हा यांचा मुळ उद्देश हरवल्यासारखा वाटतो.

आज देशात कोरोना, महागाई, बेरोजगारी यांसारखे अनेक गंभीर प्रश्न आ वासून उभे आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सोडवणे गरजेचे असताना नव्या वादांना जन्म देणारे कथित धर्मगुरु, महाराज यांवर कायद्याचा तरी अंकुश हवा असं वाटतं का? कमेंट करा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version