Site icon InMarathi

अटलजींचा आवाज दाबण्यासाठी इंदिराजींना बॉबी सिनेमाचा आधार घ्यावा लागला होता!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी… भारतीय राजकारणातील दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्व ! दोघांवरही भारतीयांनी खूप प्रेम केले. दोघांनीही आपापल्या पक्षाची आणि देशाची उच्चतम पदे भूषविली. पण राजकारणामध्ये दोघंही दोन ध्रुवांवर होते.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१९७५ ते १९७७ या काळात इंदिरा गांधी यांनी २१ महिने देशावर आणीबाणी लादून भारतीय लोकशाहीतील काळा अध्याय घडवला. १९७७ च्या जानेवारीमध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी मागे घेऊन निवडणुका घोषित केल्या. यावेळी विरोधी पक्षांनी इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्षाविरुद्ध कंबर कसून प्रचार केला.

आणीबाणीमुळे देशातील नागरिक इंदिरा गांधींवर नाराज होते. संजय गांधी आणि त्यांच्या साथीदारांनी सक्तीचे कुटुंब नियोजन आणि इतर बाबींमध्ये केलेल्या दडपशाहीचाही या नाराजीमध्ये मोठा वाटा होता. यामुळे विरोधी पक्षांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळू लागला.

या काळातच दिल्ली येथील रामलीला मैदानात अटलबिहारी वाजपेयी यांची सभा होती. या सभेला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल काँग्रेस पक्षामध्ये काळजीचे वातावरण होते.

आणीबाणीपुर्वीच्या काळात जयप्रकाश नारायण यांच्या अशाच सभांमुळे देशातील वातावरण काँग्रेसविरुद्ध तापले होते आणि त्यामुळे इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादण्याचा निर्णय घेतला होता.

 

 

आता पुन्हा अशाच सभांमुळे जनता खवळून उठू नये यासाठी इंदिरा गांधी यांनी दडपशाहीचा थेट मार्ग न अवलंबता आडमार्गाचा वापर करण्याचे ठरवले.

त्यावेळचे माहिती व प्रसारणमंत्री असलेल्या व्ही. सी. शुक्ला यांना इंदिरा गांधी यांनी बोलावून घेतले. विरोधी पक्षांच्या या सभेला लोकांचा प्रतिसाद कमी मिळावा म्हणून काय करता येईल यावर चर्चा झाली.

या चर्चेनंतर शुक्ला यांनी त्यावेळी लोकप्रिय असलेला राज कपूर यांनी दिग्दर्शित केलेला ‘बॉबी’ हा चित्रपट दूरदर्शनवर दाखवला जाईल अशी घोषणा केली. पण इंदिरा गांधी आणि सी. शुक्ला यांच्या या वाकड्या चालीचा काही उपयोग झाला नाही.

 

जनतेने घरी बसून बॉबी चित्रपटातील ऋषी कपूर आणि डिंपल यांची प्रेमकहाणी पाहण्याऐवजी अटलबिहारी यांची मंत्रमुग्ध करणारी वाणी ऐकणे पसंत केले. हजारोंच्या संख्येने आलेल्या नागरिकांनी रामलीला मैदान ओसंडून गेले.

सभा दुपारी चार वाजता सुरू झाली. इतर वेगवेगळे वक्ते भाषणे करत होते पण लोकांना अटलजींच्या भाषणाविषयी उत्सुकता होती. काही कारणामुळे अटलजी सभेत पोहोचायला रात्रीचे नऊ वाजले. पण पाच तास लोक त्यांच्यासाठी थांबून राहिले होते.

अटलजी भाषणाला उभे राहिल्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. त्यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध शैलीमध्ये भाषणाला काव्यमय सुरुवात केली. ‘बडी मुद्दत के बाद मिले है दिवाने, कहने सुनने को बहुत है अफसाने’ आणीबाणीच्या काळात अनेक नेते, कार्यकर्ते, नागरिक तुरुंगामध्ये दीर्घकाळ डांबलेले होते.

 

 

दडपशाहीच्या अनेक घटना झाल्या होत्या. त्या संदर्भातील या ओळी ऐकताच पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर झाला. अटलजींना एक विराम घेऊन पुढील ओळी म्हटल्या, ‘‘खुली हवा मे जरा सांस तो ले ले, कब तक रहेगी आजादी कौन जाने?’’

निवडणुकांमध्ये योग्य निवड झाली नाही तर होणाऱ्या संभाव्य हुकूमशाहीच्या शक्यतेबद्दलच्या या ओळींनी श्रोत्यांच्या मनातील लोकशाही जिंकविण्याचा निर्धार पक्का झाला.

अटलजींच्या वक्तृत्वाने लोकांवरती गारूड केले. कडाक्याच्या थंडीमध्येही हजारो लोक या भाषणामुळे प्रभावित होऊन गेले. निवडणुकांचे निकाल लागले तेव्हा स्वतः इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांचा दारुण पराभव झाला.

 

 

काँग्रेस पक्षाला केवळ ५४२ पैकी केवळ १५३ जागांवर विजय मिळाला. जनता पक्षाला २९८ जागांवर विजय मिळून त्याने बहुमताने सरकार स्थापन केले. इंदिरा गांधी यांनी भारतीय जनतेला ओळखण्यात आणि अटलजींच्या लोकप्रियतेला जोखण्यात चूक केली.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा : 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version