Site icon InMarathi

बहुजनांचा आवाज बनून ९६००० प्रकरणांत न्यायदान करणारा पडद्यामागील ‘जय भीम’!

k chandru featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एकीकडे सूर्यवंशीसारखा कमर्शियल मसाला चित्रपटातून पोलिसांच्या शौर्याला सेलिब्रेट केलं गेलं तर दुसरीकडे amazon prime सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून जातीयवादावर टिकात्मक भाष्य करणारा जय भीमसारखा बोल्ड सिनेमा रिलीज केला गेला.

एका सिनेमात पोलिसांची कर्तव्यदक्षता दाखवली गेली तर दुसऱ्या सिनेमातून कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली गरीब पीडित लोकांच्या छळ करणाऱ्या पोलिसांचं चित्रण केलं गेलं!

 

 

गेल्या काही वर्षांपासून दाक्षिणात्य सिनेमातून असे विषय बेधडकपणे हाताळले जात आहेत. कर्णन, असुरन, जलीकट्टू, कालासारख्या सिनेमातून समाजातल्या विषमतेवर भाष्य केलं गेलं, आणि लोकांनी अक्षरशः ते सिनेमे डोक्यावर घेतले.

नुकत्याच आलेल्या जय भीम या तामीळ सिनेमालासुद्धा लोकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला, समाजाचं दाहक वास्तव आणि एका आदिवासी जमातीच्या व्यथा मांडणारा हा सिनेमा साऱ्या बहुजन लोकांचं नेतृत्व करू पाहतो.

हा सिनेमा एका खऱ्या व्यक्तीच्या आयुष्यावरून प्रेरित आहे हे फार कमी लोकांना ठाऊक असेल. सुपरस्टार सूर्याने ज्यांची भूमिका या सिनेमात निभावली अशा निवृत्त न्यायाधीश के.चंद्रू यांच्याविषयीच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

जय भीम या सिनेमात के. चंद्रू यांनीच लढलेल्या एका केसचा संदर्भ घेतला असून त्याच्याभोवतीच या सिनेमाची कहाणी फिरते. १९९५ मध्ये तेव्हा के.चंद्रू हे एक वकील म्हणून मद्रास हाय कोर्टात प्रॅक्टिस करत होते. तेव्हा इरूलर समुदायाच्या एका शोषित स्त्रीवर झालेल्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता.

एक सामाजिक कार्यकर्ता ते वकील आणि नंतर थेट हाय कोर्टचे जज म्हणून कायम आदिवासी समाजाची बाजू मांडणाऱ्या के चंद्रू यांनी कायम त्या समुदायाची बाजू खंबीरपणे मांडली आणि त्यांना न्याय मिळवून दिला.

 

ज्या आदिवासी स्त्रीच्या पतीला खोट्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली त्याच पतीला सोडवण्यासाठी habeas corpus या कायद्याअंतर्गत के. चंद्रू यांनी मद्रास हाय कोर्टात याचिका दाखल केली, पण त्या माणसाचा पोलिस कोठडीतच मृत्यू झालेला हे सिद्ध व्हायला १३ वर्षं उलटली.

ही केस दाबण्यासाठी के चंद्रू तसेच त्या पीडित महिलेला पैशांचं आमिष दाखवलं गेलं, पोलिसांकडूनसुद्धा चंद्रू यांच्यावर दबाव आणला गेला, पण या सगळ्याला न जुमानता चंद्रू यांनी लढा दिला आणि त्या स्त्रीला न्याय मिळवून दिला!

वकिलीनंतर जेव्हा त्यांच्यावर न्यायदानाची जवाबदारी आली तेव्हा त्यांनी त्यांच्या ६ वर्षांच्या कारकिर्दीत अशा ९६००० हून अधिक केसेसचा निकाल लावला आणि पीडित लोकांना न्याय दिला.

वकिल म्हणून किंवा न्यायाधीश म्हणून काम करताना त्यांनी कधीच पैशाकडे बघितलं नाही. सामाजिक विषमता, स्त्रियांवरील अत्याचार या सगळ्याला वाचा फोडून पीडित लोकांना न्यायालयाचे दरवाजे खुले करण्याचे कामच चंद्रू यांनी त्यांच्या कारकिर्दीत केले.

“मला ५ स्टार वकील कधीच बनायचं नव्हतं त्यामुळे मी पैशाचा कधीच मागे लागलो नाही.” असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.

 

 

न्यायाधीश म्हणून काम करताना त्यांच्या कोर्टात त्यांना ‘माय लॉर्ड’ असं वकील कधीच म्हणत नव्हते, शिवाय त्यांना देऊ केलेली खासगी सुरक्षासुद्धा त्यांनी नाकारली कारण याचं नंतर स्टेटस सिम्बल होतं ज्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर नकळत होतो असं त्यांचं म्हणणं होतं!

एका मागास मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या चंद्रू यांनी कॉलेजमध्ये असतानाच कम्यूनिस्ट पार्टीचे कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली. पार्टीचं काम करताना त्यांची कित्येक मंजुरांशी फॅक्टरी कामगारांशी ओळख झाली, दलित आणि मागास कामगारांच्या कुटुंबांच्या व्यथा त्यांनी फार जवळून अनुभवल्या.

यामुळेच सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठवणं हे चंद्रू यांचं लक्ष्य बनलं. १९७३ मध्ये चंद्रू यांनी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. चंद्रू यांची पार्श्वभूमी आणि स्टुडंट लीडर म्हणून तयार झालेली प्रतिमा यामुळे त्यांना सर्वप्रथम हॉस्टेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता.

शिक्षण घेताना आणि पदवी मिळाल्यानंतरचे काही दिवस चंद्रू यांनी Row & Reddy नावाच्या एका फर्ममध्ये काम करायला सुरुवात केली. तब्बल ८ वर्षं या फर्मसोबत काम केल्यानंतर त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली.

 

 

२००६ साली त्यांची मद्रास हाय कोर्टचे न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली आणि २००९ साली ते तिथे परमॅनेन्ट झाले. न्यायाधीश म्हणून काम करताना त्यांनी चोखपणे न्यायदान केले, आणि त्यांचे निर्णय आजही चर्चिले जातात.

अंगणवाडी सेविका असो किंवा कोणत्याही मागासवर्गीय लोकांचा प्रश्न असो किंवा महिलांना पुजारी म्हणून मान देण्याचा निर्णय असो, प्रत्येक बाबतीत तटस्थ विचार करूनच चंद्रू यांनी न्यायदान केले आणि त्यांनी त्यांच्यापरीने सामाजिक विषमता कमी करायचा प्रयत्न केला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

ज्या लोकांना स्वतःच्या न्याय्य हक्काविषयी काहीच माहिती नाही अशा कित्येक लोकांसाठी जस्टीस चंद्रू हे देवदूतच होते. न्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी कायदेविषयक कित्येक पुस्तकं लिहिली.

नुकतंच त्यांनी ‘Listen to My Case: When Women Approach The Courts of Tamil Nadu’ हे पुस्तक लिहिलं असून त्यात त्यांनी त्यांचे वेगवेगळे अनुभव आपल्यासोबत शेअर केले आहेत.

 

 

अशा रिअल लाईफ हीरोला ‘जय भीम’ सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर आणणाऱ्या फिल्ममेकर्सचे आणि सुपरस्टार सूर्याचे आभार मानावे तितके कमीच आहेत, आता याही सिनेमाचा बॉलिवूडने रिमेक नाही केला म्हणजे मिळवली!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version