Site icon InMarathi

“या कारणासाठी” थिएटरमध्ये पिक्चरच्या दरम्यान इंटर्व्हल/ मध्यांतर केली जाते…

intermission inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

कोरोनाकाळाचे नियम आणि त्यांचं पालन करणं हे एव्हाना अंगवळणी पडलं आहे. याच नियमांमध्ये नुकताच झालेला एक मोठा बदल म्हणजे, सिनेमागृह सुरु झाली आहेत. लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस झाले असतील, तर तुम्ही सिनेमा बघायला थिएटरमध्ये जाऊ शकता.

अनेकांना आता चित्रपट पाहण्यासाठी थिएटर गाठण्याची इच्छा आहे. काहींनी या संधीचा लाभ घेत, थिएटरमध्ये चित्रपट पाहिले सुद्धा आहेत.

 

 

थिएटरमध्ये जाणाऱ्यांना चित्रपटांची जशी उत्सुकता असते, तशीच आणखी एक गोष्ट फारच महत्त्वाची आणि जवळची वाटते, ती म्हणजे चित्रपटामधील इंटरमिशन आणि त्यात करण्यात येणारी खाबूगिरी…!!

इंटरमिशनमध्ये खाद्यपदार्थांवर ताव मारणं हा अनेकांसाठी आवडीचा विषय असतो. पण तुम्हाला माहित आहे का, की हे इंटरमिशन म्हणजेच मध्यांतर खरंतर प्रेक्षकांसाठी सुरु झालंच नव्हतं. मग नेमकं का केलं जायचं मध्यांतर आणि आजही बॉलिवूडमध्येच हे मध्यांतर का सुरु आहे, ते आज जाणून घेऊयात.

 

 

इंटरमिशन का सुरु झालं?

असं म्हटलं जातं, की इंटरमिशन सुरु होण्यामागे तांत्रिक कारण आहे. पूर्वीच्या काळात जेव्हा चित्रपट रील्समध्ये चित्रित करण्यात येत असत, त्यावेळी इंटरमिशन ही एक अत्यंत महत्त्वाची बाब होती. प्रोजेक्टरमार्फत पडद्यावर चित्र दाखवली जात असत. अशावेळी रीळ बदलणं महत्त्वाचं होतं.

 

 

इंटरमिशनचा वेळ हा आधीचं रीळ काढून नवं रीळ लावण्यासाठी वापरण्यात येत असे. त्याशिवाय पुढचा चित्रपट दाखवणं शक्यच नव्हतं. म्हणजेच, रीळ बदलणाऱ्या माणसाच्या सोयीसाठी चित्रपटाच्या मध्यावर ब्रेक असणं आवश्यक होतं. अर्थात, हेदेखील ऐकीव कारण आहे.

बॉलिवूडमध्ये आजही सुरु आहे हीच प्रथा…

तंत्रज्ञान बदलत गेलं, आधुनिक गोष्टींना सुरुवात झाली आणि मग हळूहळू रीळ हा प्रकार वापरण्याची गरजच उरली नाही. पर्यायाने, रीळ बदलण्यासाठी घेतल्या जाव्या लागणाऱ्या इंटरमिशनची गरज उरली नाही. त्यानंतर सगळ्यांनीच इंटरमिशनची पद्धत बंद केली. चित्रपटात कुठलाही ब्रेक घेणं बंद झालं.

असं असताना सुद्धा हिंदी सिनेसृष्टी, बॉलिवूड, यांनी मात्र ही पद्धत सुरूच ठेवली. भारतीय थिएटरमध्ये तर हॉलिवूडचे चित्रपट सुद्धा इंटरमिशनसह दाखवायला सुरुवात केली.

 

 

हे चित्रपट ब्रेकसह दाखवण्यासाठी बनवलेले नसतात. त्यामुळेच अनेकदा हॉलिवूडमधला चित्रपट अर्धवट थांबलेला वाटतो. तरीही भारतीय थिएटर मात्र ‘माय थिएटर माय रुल्स’ अशा थाटात चित्रपट दाखवतात.

बॉलिवूडकर म्हणतात इंटरमिशन तर हवंच…

हॉलिवूडचे चित्रपट बनवण्याची पद्धत फारच वेगळी आहे. सुरुवात, मध्य आणि क्लायमॅक्सनंतर आकर्षक शेवट अशी साधारण त्या चित्रपटांची रचना असते. त्यामुळेच हॉलिवूडचे चित्रपट मध्यावर थांबवले तर अर्धवट थांबल्यासारखे वाटतात.

बॉलिवूडकरांचे मात्र यावर वेगळेच विचार आहेत. सुरुवात, मध्य आणि शेवट अशी तीन भागांमध्ये चित्रपटांची रचना न करता, दोन भागात दाखवण्यासाठी चित्रपट बनवले जातात. लेखक लिहितानाच कथानकाची रचना तशी करतो.

 

 

चित्रपटाच्या पूर्वार्धात चित्रपटाच्या प्लॉटची बांधणी, पात्रांची कथानकं असं सारं काही दाखवण्यात येतं. तिथून पुढे मग सिनेमाची पकड अधिक दमदार होऊ लागते. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात काय होणार याची उत्सुकता ताणून ठेवली जाते आणि अशाच सिनवर चित्रपट थांबवलेला असतो.

थोडक्यात काय, तर उत्सुकता ताणून धरणं, सतत एकाच ठिकाणी बसून चित्रपट बघताना येणारा कंटाळा घालवणं, मधल्या वेळात खाबुगिरी या गोष्टी प्रेक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत असं बॉलिवूडकरांचं म्हणणं आहे. त्यामुळेच भारतीय चित्रपटांमध्ये मात्र ही मध्यांतराची प्रथा तशीच सुरु राहिली.

 

 

हिंदी चित्रपटांमधील या इंटरमिशनला चित्रपटाचा मिनी क्लायमॅक्स म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. ही प्रथा बॉलिवूडमध्ये आज सूर आहे आणि अशीच सुरु राहील यातही शंका नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version