Site icon InMarathi

”घाटी लोकांना क्रिकेटमधलं काय कळतं?” या टिकेतून झाला ‘वानखेडे’चा जन्म

stadium 1 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘वानखेडे’ हे नाव सध्या फारच चर्चेत आहे. क्रिकेट जगतात सुद्धा वानखेडे हे नाव खूप सन्मानाने घेतलं जातं. महाराष्ट्राचे पहिले अर्थमंत्री बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या पुढाकारामुळे बांधकाम करण्यात आलेलं ‘वानखेडे स्टेडियम’ हे जगातील लोकप्रिय क्रिकेट मैदानापैकी एक आहे. हे तेच मैदान आहे जिथे बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इंडियाचं (बीसीसीआय) मुख्यालय आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्यासोबतच, वानखेडे स्टेडियम हे साक्षीदार आहे २ एप्रिल २०११ या दिवसाचं जेव्हा धोनीने षटकार मारून भारताला २८ वर्षांनी विश्वचषक जिंकवून दिला होता. भारतीय क्रिकेट इतिहासातील सोनेरी क्षणांचा सोबती असलेल्या ‘वानखेडे स्टेडियम’च्या उभारणीचा किस्सा सुद्धा तितकाच रंजक आहे. मुंबईत ‘ब्रेबॉन स्टेडियम’ असतांना त्याच्यापासून २ किलोमीटर अंतरावर ‘वानखेडे स्टेडियम’ का बांधलं गेलं असावं? जाणून घेऊयात.

 

 

१९६३ मध्ये घडलेली ही घटना आहे. दिवंगत वसंतराव नाईक हे तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्याकडे तेव्हा अर्थमंत्री सोबतच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (बीसीए) अध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली होती. राजकारणी लोकांना क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी म्हणून त्या वर्षी ‘आमदार चषक’ या क्रिकेट स्पर्धेची सुरुवात करण्यात आली होती.

या संबंधित नेमण्यात आलेली समिती आपला प्रस्ताव घेऊन परवानगीसाठी बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्याकडे आले होते. वानखेडे यांनी तो प्रस्ताव लगेच मान्य केला.

 

 

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असलेल्या वानखेडे यांचा आमदार क्रिकेट सामने हे ‘ब्रेबॉन’ स्टेडियमवर घडवून आणण्याचा विचार होता. ‘ब्रेबॉन’ स्टेडियम हे तेव्हा क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या अखत्यारीत यायचं. विजय मर्चंट हे तेव्हा क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी विजय मर्चंट यांची भेट घेण्यासाठी त्यांची वेळ मागितली.

विजय मर्चंट हे स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होते ज्यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी ‘ऑलराउंडर’ म्हणून १० टेस्ट मॅच खेळल्या होत्या. तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या विजय मर्चंट यांनी वानखेडे यांच्या भेटीत मात्र आपण व्यक्ती म्हणून आपण किती ‘अपरिपक्व’ आहोत हेच दाखवून दिलं होतं.

 

 

वानखेडे यांनी ‘ब्रेबॉन’ स्टेडियमवर सामने खेळवण्याची परवानगी तर नाकारलीच, शिवाय, वानखेडे यांना “तुमच्या सारख्या घाटी लोकांना क्रिकेटमधलं काय कळतं ?” असा प्रश्न विचारला होता. राजकारणात काम करणाऱ्या आमदारांचे क्रिकेट सामने बघण्यात, ‘ब्रेबॉन’ स्टेडियमवर घडवून आणण्यात विजय मर्चंटला काहीच रस नव्हता.

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्यातील तिकीट वाटपाच्या वादामुळेसुद्धा नकार देण्यात आला होता असं सुद्धा बोललं जातं. आजच्या सारखा सोशल मीडिया त्याकाळी असला असता तर या घटनेवरून बरेच हॅशटॅग सुरू झाले असते हे नक्की!

बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांना विजय मर्चंट यांच्या भेटीत झालेला अपमान खूप जिव्हारी लागला होता. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मालकीचं एक तरी स्टेडियम असावं असं त्यांनी या भेटीनंतर ठरवलं. मुंबईतच दुसरं क्रिकेट स्टेडियम बांधण्याचा निर्णय शेषराव वानखेडे यांनी घेतला. लक्ष्य अवघड होतं. पण, वानखेडे सरांची इच्छाशक्ती इतकी दांडगी होती आणि काम करण्याची पद्धत ही इतकी सुस्पष्ट होती की, शशी प्रभू या आर्किटेक्टच्या सहाय्याने ‘वानखेडे स्टेडियम’ हे केवळ १३ महिन्यात बांधण्यात आलं.

 

 

४५ हजार प्रेक्षकांची क्षमता असलेलं ‘वानखेडे स्टेडियम’ हे भारतातील तिसरे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळवण्याचं हक्काच्या मैदानाची भेट मुंबईकरांना मिळाली होती.

वानखेडे स्टेडियमवर सुरुवातीच्या काळात कसोटी सामने जास्त खेळवले जायचे. १९७५ मध्ये ‘भारत विरुद्ध वेस्ट इंडिज’ हा या मैदानावर खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना होता. १९९६ मध्ये वानखेडे स्टेडियमला ‘दिवस-रात्र’ सामने खेळवण्यासाठी सज्ज करण्यात आलं.

२०११ मध्ये वानखेडे स्टेडियमची पुनर्बांधणी करण्यात आली ज्यामुळे त्याची आसन क्षमता ही ४५ वरून ३३ हजार लोकांची झाली आहे.

वानखेडे स्टेडियम हे भरतीयांसाठी का विशेष आहे हे खालील ऐतिहासिक घटनांमुळे लगेच लक्षात येऊ शकतं :

१. सचिन तेंडुलकरने आपला शेवटचा २०० वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना याच मैदानावर खेळला होता.

 

हि १० क्रिकेट स्टेडियम्स एका वेगळ्याच कारणासाठी जगभर प्रसिद्ध आहेत!

“प्रेक्षक ८ तास बसू शकत नाहीत, आपण असं करूया…” टी-२० क्रिकेटची जन्मकथा…

२. सुनील गावस्कर स्टॅण्ड, सचिन तेंडुलकर स्टॅण्ड, विजय मर्चंट स्टॅण्ड सारख्या दिग्गज खेळाडूंच्या नावाने प्रेक्षकांची आसन व्यवस्था असलेलं हे भारतातील एकमेव स्टेडियम आहे.

३. एकूण २० लिफ्ट आणि पत्रकारांसाठी सुसज्ज कक्ष असलेलं हे त्या काळातील पहिलं स्टेडियम होतं. ज्याला काही वर्षांनी ‘स्व. बाळासाहेब ठाकरे प्रेस बॉक्स’ असं नाव देण्यात आलं.

४. सुनील गावस्कर यांनी वानखेडे स्टेडियमवरच (न्यूझीलंड विरुद्ध) आपली २०५ धावांची सर्वोच्च खेळी केली होती.

 

 

५. आर अश्विन ने कसोटीतील आपलं पहिलं शतक हे वानखेडे स्टेडियमवरच केलं होतं.

एका मराठी माणसाच्या अपमनामुळे अस्तित्वात आलेलं वानखेडे स्टेडियम हे भारतीय क्रिकेटला येणाऱ्या काळात अजून विजयाचे क्षण अनुभवायची संधी देईल अशी आशा करूयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version