Site icon InMarathi

‘काडतुस साहेब’ने रणभूमीवर स्वतःचा पाय कापला, अंगावर रोमांच आणणारी शौर्यगाथा!

gurkha featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

डझनावारी सिनेमे काढणाऱ्या अक्षय कुमारची तर सध्या चंगळच आहे, २२ तारखेपासून थिएटर सुरू होणार ही बातमी ऐकताच अक्षय फक्त सिनेमाच्या घोषणा करत सुटलाय. आधी सूर्यवंशी, बच्चन पांडे, रक्षाबंधन, पृथिवराज, राम-सेतू अशा सिनेमांची घोषणा केल्यानंतर त्याने नुकतीच आणखीन एका सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणलाय तो म्हणजे ‘गोरखा’!

अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून भारतीय सैन्यातले हीरो ‘मेजर इयान कार्डोजो’ यांच्या शौर्यावर बेतलेला ‘गोरखा’ या सिनेमाची घोषणा केली आणि लगेच याबद्दल चर्चा व्हायला सुरुवात झाली.

 

 

अक्षयच्या इतर चित्रपटांप्रमाणेच हा चित्रपटसुद्धा चांगलाच हीट ठरेल कारण देशभक्तीपर असलेला हा सिनेमा एका खऱ्या वॉर हीरोच्या आयुष्यापासून प्रेरित आहे. आज या लेखातून आपण याच मेजर इयान कार्डोजो यांच्या शौर्याविषयी माहिती करून घेणार आहोत.

कोण आहेत इयान कारडोजो?

साल १९७१, ईस्ट पाकिस्तान म्हणजेच आजच्या बांग्लादेशसाठी तेव्हा युद्ध छेडलं होतं, भारत पाकिस्तान यांच्यातले संबंध बरेच विकोपाला गेले होते. ईस्ट पाकिस्तानमध्ये भारतीय सैन्य तैनात केलं गेलं आणि त्यातली पहिली तुकडी होती ती म्हणजे गुरखा रेजिमेंटची.

इयान कार्डोजो याच रेजिमेंटचा एक हिस्सा होते. जेव्हा गुरखा रेजिमेंटचा एक ऑफिसर शहीद झाला तेव्हा त्याची बदली म्हणून इयान यांची रवानगी रणभूमीवर करण्यात आली. याच दरम्यान भारताच्या पहिल्या हेलिकॉप्टर मिशनचा हिस्सा बनण्याची संधीसुद्धा त्यांना मिळाली.

सैन्यातले त्यांचे सहकारी इयान यांचं नाव नीट उच्चारत नव्हते, त्यामुळे त्याच्या आडनावावरून त्यांना ‘काडतुस साहेब’ हे टोपण नाव मिळालं.

 

जेव्हा इयान त्यांच्या तुकडीसह इच्छित स्थळी पोहोचले तेव्हा त्यांच्यावर शत्रूच्या सैन्याने गोळीबार करायला सुरुवात केली. तुकडी लहान असल्याने त्यांच्यावर दबाव खूप होता, तरी त्यांनी हार मानली नाही, रसद संपली तरी ते लढत होते.

दिवसेंदिवस परिस्थिति आणखीनच बिकट होत होती, युद्धभूमीवरची प्रत्येक बटालियन बॅकअप फोर्ससाठी वाट बघत होते. त्याचदरम्यान इयान यांच्या बटालियनच्या जवळ अडकलेल्या काही बांग्लादेशी कैद्यांना वाचवण्याची जवाबदारी गुरखा बटालियनवर आली.

त्या कैद्यांना वाचवण्यात यश मिळालं खरं पण नंतर त्या जखमी कैद्यांना सुखरूप बेस कॅम्पपर्यंत पोहोचवणं हा सर्वात मोठा टास्क होता. हे काम इयान यांच्यावर सोपवण्यात आलं, पण पुढे जे काही घडलं त्याची कोणालाच कल्पना नव्हती.

 

 

इयान जिथून कैद्यांना घेऊन जाणार होते त्या मार्गावर पाकिस्तानी सैन्याने आधीच लँड माइन्स लावले होते, इयानचा पाय चुकून एका माईनवर पडला आणि स्फोटामुळे ते काही अंतरावर फेकले गेले, रक्तबंबाळ झालेल्या इयानला नंतर बेसच्या हॉस्पिटलमध्ये आणलं, पण कॅम्पमध्ये त्यांच्यावर उपचार करायला कुणीच डॉक्टर उपलब्ध नव्हता.

थोड्यावेळाने इयान शुद्धित आल्यावर लोकांचा जीव भांड्यात पडला, पण जो पाय माईनवर पडला होता त्याची अवस्था फार गंभीर होती. इयान हे वेदनेने अक्षरशः तळमळत होते, मोरफीन किंवा इतर कोणतंही औषध तिथे उपलब्ध नसल्याने सगळ्यांनाच चिंता वाटत होती.

स्वतःचा पाय कापणारा वीर :

आता इयान यांच्यासमोर एकच पर्याय होता की पाय कापून टाकणे, पण बरोबरचे साथी यासाठी अजिबात तयार नव्हते, इयान यांनी त्यांच्याजवळची खुकरीसुद्धा त्यांना देऊ केली, पण कुणीच ते काम करण्यास धजावत नव्हतं.

अखेर इयान यांनी स्वतः खुकरी हातात घेऊन तो पाय कापला आणि तो समोरच्या सैनिकाला देऊन गाडण्याचे आदेश दिले. इयानच्या या कृतीमुळे सगळेच अचंबित होते. केवळ युद्धात टिकून राहण्यासाठी पाय कापायलासुद्धा पुढेमागे न बघणाऱ्या इयान यांनी सगळ्यांनाच प्रेरणा दिली.

 

 

एवढंच नाही तर पाय कापून झाल्यावर ते स्वतः युद्धभूमीवर उतरले आणि  त्यांनी आपल्या तुकडीचं नेतृत्वदेखील केलं.

तुटका पाय घेऊन आपल्या सैनिकांचं मनोबल वाढवून इयान रणभूमीवर टिकून होते, हूं की चु न करता इलाज करत ते युद्धभूमीवर अडून राहिले. युद्ध संपलं तेव्हा लक्षात आलं की यादरम्यान इयानच्या पायावर उपचार करणारे डॉक्टर हे खुद्द पाकिस्तानी होते.

युद्धात भारताचा विजय झाला, आपलं सैन्य परत बोलावून घेतलं आणि इयान यांच्या शौर्यगाथेने लोकांची छाती अभिमानाने फुलून आली. इयान यांच्या शौर्यसाठी त्यांना ‘सेना मेडल’ देऊन सन्मानित करण्यात आलं.

 

 

पराकोटीचं देशप्रेम, आणि देशासाठी कोणत्याही अवस्थेत युद्ध लढणाऱ्या इयान यांना एक कडक सैलूट तर व्हायलाच हवा.

त्यांच्या या शौर्याला मोठ्या पडद्यावर दाखवण्यात अक्षय कुमार आणि त्याची टीम कीती यशस्वी होतिये हे येणारा काळच ठरवेल, पण आपल्या जवानांच्या बलिदानाबद्दलची ही माहिती देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवायलाच हवी.

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version