Site icon InMarathi

नवरात्रीच्या नऊ रंगांची प्रथा कशी सुरु झाली? यामागे आहे एक “मार्केटिंग” डोकं

nau rang inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

“नवरात्रीचा सण मोठा, आनंदाला नाही तोटा!” ही उक्ती नवरात्रीच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव! नऊ दिवस देवीचा जागर केला जातो. देवीची मनोभावे पूजा केली जाते.

महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठं आहेत. याठिकाणी तर नवरात्रीत एक विशेष उत्साह असतो. देवीला नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात. रंगीत फुलांची आरास केली जाते. सगळीकडे चैतन्याचं.. प्रसन्न वातावरण असतं.

 

 

 

गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रउत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सार्वजनिक मंडळांमध्ये देवीची स्थापना केली जाते. नऊ दिवस विविध स्पर्धा ठेवल्या जातात. यानिमित्ताने लोक एकत्र येतात आणि एकजुटीची भावना वाढीस लागते.

नवरात्रीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ‘नऊ रंग’. नवरात्र उत्सव महिलांसाठी जास्त खास असतो. यामागचं कारण आहे ‘नऊ रंगांची उधळण’ नऊ दिवस नऊ वेगवेगळे रंग ठरवले जातात आणि बायका त्याच रंगाचे ड्रेस किंवा साड्या नेसतात.

शाळा कॉलेजपासून अगदी ऑफिसपर्यंत सगळ्या ठिकाणी बायका हे रंग फॉलो करताना दिसतात. सकाळच्या वेळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर जर कोणी वरून पाहिलं, तर संपूर्ण प्लॅटफॉर्मवर एकच रंग दिसून येतो.

 

 

ऑफिसमधल्या बायकांचे ग्रुप प्रत्येक दिवशी खास फोटोसेशन करतात. अनेक ठिकाणी तर स्पर्धांचं आयोजनही केलं जातं.

पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का? की ही नऊ रंगाची प्रथा का सुरु झाली? कोणी सुरु केली? यामागे काही गमतीशीर कथा आहे का? चला पाहूया.

पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांच्यामते या नऊ रंगामध्ये कोणतेही धार्मिक कारण नाही. हे रंग परिधान केले नाही तर कोणतेही पाप किंवा पुण्य लाभत नाही. देवीचा कोपही होत नाही. समाजात एकीची भावना वाढीस लागते हेच यामागचं महत्त्वाचं कारण असावं. त्यानिमित्त लोक एकत्र येतात आणि लोकांमध्ये आनंद पसरतो.

साधारण २००४ मध्ये मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात नऊ दिवस देवीला नऊ वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसविण्यात आल्या होत्या. तेव्हापासून कदाचित ही परंपरा सुरु झाली असावी असं म्हटलं जातं.

 

 

याशिवाय आपल्याकडे प्रत्येक वार एका देवतेचा असतो. त्या देवतेला अनुसरून त्या दिवसाचा रंग ठरवलं जातो असेही म्हटले जाते.

रंगाची ही परंपरा ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वर्तमानपत्राने सुरु केली असंही सांगितलं जातं. वाचकसंख्या वाढवण्यासाठी हा प्रयोग करून बघण्यात आला होता. नऊ दिवसांचे नऊ वेगळे रंग पेपरमध्ये छापण्यात आले होते. या प्रयोगाला उत्तम प्रतिसाद लाभला आणि हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात नऊ रंग दिसायला लागले.

मार्केटिंग स्ट्रॅटेजी असो किंवा काहीही.. यामुळे समाजात एकजुटीची भावना वाढीस लागते आणि सुरक्षितता निर्माण होते. शेवटी सण हे आनंदासाठीच असतात की!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version