Site icon InMarathi

बॉलिवूडच्या देवदासची बोल्ड ‘पारो’; खरंतर तिला सैन्यात भरती व्हायचं होतं!

mahie gill featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

नव्वदच्या दशकांतल्या तद्दन मसालापटांना प्रेक्षक कंटाळले होते. वेगळ्या हाताळणीचे हिंदी सिनेमे बनू पहात होते. बजेटनं लहान असणार्‍या या चित्रपटांची हाताळणी वेगळी असल्यानं प्रेक्षकांनी हा बदल उचलून धरला. ज्याप्रमाणे ऐंशीच्या दशकांत मॅटीनी मुव्हीज बनत असत त्याच धर्तीवर या हटके मुव्हिज बनू लागल्या होत्या.

एरवीचा गोड गुडीगुडीपणा सोडून पात्रं बोल्ड बनली होती. अनुराग कश्यप नावाचं वारं बॉलिवुडमधे घोंगावू लागलं होतं. कश्यप स्कूलनं इंडस्ट्रीला अनेक गुणी अभिनेते, लेखक, दिग्दर्शक दिले. यापैकीच एक नाव म्हणजे, तिग्मांशू धुलिया. नव्वदच्या दशकातील बहुचर्चित अशा बॅण्डीड क्विनचं कास्टींग करणारं नाव म्हणजे तिग्मांशू.

 

 

थिएटरची पाश्र्वभूमी असणार्‍या तिग्मांशूला कलाकारांची, अभिनयाची चांगली पारख आहे. त्यानं केलेल्या या कास्टींग नंतर इतिहास रचला. काही काळ इंडस्ट्रीत काम केल्यानंतर इथे फारसं काही घडत नाही हे बघून त्यानं टेलिव्हिजनकडे मोर्चा वळवला.

इथे मात्र नशिबानं त्याला चांगलीच साथ दिली. त्यानं मागे वळून पाहिलंच नाही. तरीही तिग्मांशू हे नाव सर्वमुखी व्हायला अजूअ थोडा काळ जायला हवा होत आणि मग अनुरागच्या वास्सेपूरनं हा योग आणला. वासेपूरनं तिग्मांशूची ओळख नव्यानं करून दिली.

अनुराग आणि तिग्मांशू नावाची वादळं नवे सिनेमे बनवायचा झपाटा लावत असतानाच तिकडे चंदीगढमधल्या गिल या जमिनदार घराण्यातली एक मुलगी आर्मीत करियर करायचं स्वप्न बघत होती आणि त्या दृष्टीनं तिचे प्रयत्नही चालले होते.

घरची शेतीवाडी भरपूर, आजोबा सैन्यात, वडील सरकारी नोकरीत आणि आई शिक्षिका अशी कौटुंबिक पाश्र्वभूमी असणार्‍या माहीला मात्र आर्मीतच जायचं होतं. तिच्या आईनं एनसीसी केलेलं होतं. त्यामुळे घरात एक प्रकारची सैनिकी शिस्त पहिल्यापासूनच होती

 

हे ही वाचा यशस्वी होण्यासाठी नाव बदलण्यापासून डी कंपनीशी संबंध जोडणारी बोल्ड अभिनेत्री!

आईचे गूण माहीत पूरेपूर उतरले असल्यानं तिलाही पहिल्यापासूनच आर्मीतच जायचं होतं. एनसीसी करतानाच महिला ही परिक्षा देण्याची संधी लाभली.

माहीसोबत भारतातून १६ मुलींची निवड झालेली होती. पंजाब, हरियाणा, हिमाचल आणि चंदीगढ असा मिळून एक केडर मानला जातो ज्यातून माहीची निवड झाली.

निवड फेरीतून जाता जाता अखेरीस केवळ दोन मुली उरल्या. ज्यात एक माही होती. अंतिम मुलाखतीत दोघींना एकच प्रश्न विचारण्यात आला की, समजा तुमच्यासमोर पाकिस्तानसारखा शत्रू आहे तर तुम्ही काय निवडाल? गन की शांतता प्रस्ताव?

माहीसोबतच्या मुलीनं निरागस आणि प्रामाणिकपणे सांगितलं की ती शांताता प्रस्ताव निवडेल. माहीनं सांगितलं की ती गन निवडेल. निवड करणार्‍या पॅनलनं माहीसोबतच्या मुलीला सल्ला दिला की तुला शांतता प्रस्थापित करायची असेल तर तु सौंदर्यस्पर्धेत भाग घे. इथे समोर शत्रू उभा राहिला तर गन घेणंच अपरिहार्य आहे.

अशा रितिनं या उत्तरामुळे माहीची निवड झाली. गंमतीशीर योगायोग असा की हीच माही नंतर सौंदर्याच्या जोरावर चक्क फिल्म इंडस्ट्रीत गेली.

 

 

तिची निवड झाली आणि ती चेन्नईला प्रशिक्षणासाठी रवाना झाली. या प्रशिक्षणा दरम्यानच तिला एका गंभीर अपघाताला सामोर जावं लागलं. एकदा पॅरासेलिंग सरावा दरम्यान फ्रीफॉल झाला. या अपघातातून ती अगदी थोडक्यात मरता मरता वाचली.

आधीच आई वडील तिच्या आर्मीत जाण्याच्या विरोधात होते त्यात या अपघाताची भर पडली आणि धास्तावलेल्या कुटुंबियांनी तिला घरी परत बोलवलं. खरंतर तिचं प्रशिक्षण उत्तम चाललं होतं आणि वरिष्ठांकडून तिला कायम शाबासकीही मिळत असे.

मात्र नियतीनं तिच्यासमोर वेगळंच काही मांडून ठेवलं होतं. चेन्नईहून माही चंदीगढला परतली. दिसायला सुंदर असणार्‍या माहिच्याबाबतीत पुन्हा एकदा योगायोग घडला आणि तिला तिचा पहिला पंजाबी चित्रपट मिळाला, हवाएं. त्यानंतर तिनं काही मराठी चित्रपटात कामं केली.

याच दरम्यान्न शोबिझमधे तिचा वावर चालू झाला होता आणि अशाच एका पार्टीत तिला अनुराग कश्यपनं पाहिलं. त्यावेळेस अनुराग त्याच्या देव डीच्या तयारीत होता.

 

 

कास्टींगवर विचार चालू होता आणि त्याचवेळेस त्याच्या नजरेत माही आली. तिला बघताक्षणी त्यानं पारोच्या भूमिकेसाठी तिची निवड केली. अशा रितिनं माहीसाठी हिंदी सिनेमाची दारं उघडली.

तिग्मांशू अनुरागचा लेखक होता. दोघांची वेव्हलेन्ग्थ अशी जुळली होती की अनुरागचे विचार तिग्मांशूच्या लेखणीतून येत असत. अनुरागनं तिग्मांशूला सिनेमात कामं करण्यासाठी गळ घातली. तिग्माशूचा लेखक, अभिनेता म्हणून प्रवास चालू झाला. याच दरम्यान वासेपूरचं काम चालू झालं आणि माहीची पुन्हा एकदा या चित्रपटात वर्णी लागली.

तिग्मांशूच्या डोक्यात बरेच वर्षं एक विषय घोळत होता. सिनेमात त्याला चलती आल्यावर त्यानं पुन्हा एकदा या सिनेमावर काम चालू केलं. या सिनेमाचं नाव होतं, साहेब बिवी और गॅन्गस्टर.

माहीला देव डीनंतर मुख्य भूमिकेत झळकवणारा हा चित्रपट. माहीची बोल्ड ॲण्ड ब्युटीफूल इमेज आता आणखीनच गडद झाली होती.

 

मौत से डर नहीं लगता साहब, लव्ह लेटर से लगता है

आर्मी प्रशिक्षणादरम्यान जेंव्हा पॅरासेलिंग करताना माहीला अपघात झाला तेंव्हा खाली पडताना तिला आता आपण मरणार याची भिती वाटत नव्हती तर एका वेगळ्याच गोष्टीची धास्ती वाटत होती.

झालं असं होतं की, त्यावेळेस माहीचा एक सिक्रेट बॉयफ़्रेंड होता. त्याला तिनं पाच पत्रं लिहिली होती. जी पत्र त्याला द्यायचं तिचं धाडस झालं नव्हतं आणि ती तिच्या बॅगेत होती. आपण मेलो बिलो तर ही पत्रं आपल्या आईवडिलांच्या हाती लागतील यानं ती जास्त भ्यायली होती.

माही नव्हे रिम्पी

माहीचं माही हे नाव खरं नाव नसून खरं नाव रिम्पी आहे. साधारणपणे लोकांची एक प्रचलीत नाव असतं आणि दुसरं लाडानं हाक मारायचं नाव. माहीच्या बाबतीत उलटं झालं तिला जन्मल्यापासूनच लाडाच्या नावानंच हाक मारली गेली आणि तेच प्रचलितही झालं अखेर माहीनं स्वत:च बारसं स्वत:च केलं आणि माही हे नाव ठेवलं.

 

 

पंजाबमधे पेट नाव असतंच असतं. तसंच माही जन्मल्यावर तिच्या आईच्या विद्यार्थिनिनं तिला रिम्पी म्हणलं आणि सगळेच रिम्पी करू लागले. हॉस्पिटलमधे नाव विचारल्यावर माहीच्या भावांनी रिम्पी सांगितल्यानं सर्टिफिकेटवरही तेच आलं.

रिम्पीला काहीच अर्थ नव्हता मात्र कोणी तिचं नाव बदललंच नाही. हायस्कूल, कॉलेज संपेपर्यंत रिम्पी हेच नाव घेऊन फ़िरणार्‍या माहीनं वैतागून नंतर स्वत:च स्वत:चं माही हे बारसं केलं.

===

हे ही वाचा सिनेमातल्या केवळ बोल्ड, भडक सीन्समुळेच या ७ अभिनेत्रींचा इंडस्ट्रीत निभाव लागला!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version