Site icon InMarathi

ते दोघे ९ वर्षं जिवंत होते, हे भारतीय न्यायव्यवस्थेचं अपयश म्हणावं का?

nithari featured inmarathi 2

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

विकृत मनोवृत्ती ही आपल्या समाजाला लागलेली एक कीड आहे. लहान मुलांचं अपहरण करून त्यांना त्रास देणे, स्वतःची वासना भागवण्यासाठी किंवा कोणत्यातरी देवी देवतांना बळी देण्यासाठी त्यांचा जीव घेणे अशा गोष्टी आपल्या स्वतंत्र, सुरक्षित आणि सुशिक्षित देशात अजूनही घडतात हे आपलं दुर्दैव आहे.

काही वर्षांपूर्वी ‘संघर्ष’ नावाचा एक सिनेमा आला होता ज्यामध्ये आशुतोष राणा या गुणी कलाकाराने अशाच एका विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीचा रोल केला होता.

सिनेमा बघतांना हे पात्र इतकं भयानक वाटायचं की, काही लोकांना ते निर्दयी पात्र अतिशयोक्ती वाटलं होतं. पण, जर आपण २००६ मध्ये नॉएडा येथे घडलेल्या ‘निठारी हत्याकांड’ची माहिती वाचली तर असे विकृत लोक जगात असू शकतात हे मान्य होईल.

 

 

मोनिंदर सिंग आणि सुरींदर कोली ही त्या दोन विकृत लोकांची नावं आहेत ज्यांच्या घरामागे २९ डिसेंबर २००६ रोजी १९ सापळे सापडले होते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात या दोघांनी फासावर लटकवलं आहे.

ही समाधानाची बाब आहे. पण, असं कृत्य करण्यामागे गुन्हेगारांची काय मानसिकता होती? काय होतं हे प्रकरण? सतर्क राहण्यासाठी जाणून घेऊयात.

गाझियाबाद येथील सीबीआय कोर्टाने ‘सर्वात क्रूर गुन्ह्यांपैकी एक’ म्हणून उल्लेख केलेल्या या केसचा प्रमुख गुन्हा ‘पिंकी सरकार या वीस वर्षीय मुलीवर बलात्कार आणि तिचा खून’ हा होता. मोनिंदर सिंग आणि सुरींदर कोली या दोन्ही गुन्हेगारांवर त्यापूर्वी अशा १५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे ज्यामध्ये लहान मुलांचं अपहरण करणे हा त्यांच्या गुन्हेगारीचा एक पॅटर्न सीबीआयच्या निदर्शनास आला होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सर्व पुराव्यांच्या अभावी निठारी हत्याकांडचा तपास पूर्ण होण्यासाठी आणि निकाल लागण्यासाठी पीडितांच्या नातेवाईकांना २००६ ते २०१५  अशी नऊ वर्षे वाट बघावी लागली होती.

काय होत्या या तपासातील प्रमुख घटना?

डिसेंबर २००६ : नॉएडामधील काही लोकांना मोनिंदर सिंग पंढर यांच्या घराजवळ काहीतरी संशयास्पद घटना घडतांना दिसल्या. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबद्दल सांगितलं. पोलिसांना घराजवळच्या जागेचा तपास करतांना हाडांनी भरलेली ४० पाकिटं सापडली ज्यामध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश होता. मोनिंदर सिंग पंढर आणि सुरींदर कोली यांना पोलिसांनी अटक केली.

 

 

लोकांचा वाढता आक्रोश बघून ही केस सीबीआयकडे सुपूर्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. सीबीआय ने केस हातात घेतल्यानंतर असं लक्षात आलं की, दोन पोलीस या गुन्ह्याच्या तपासात अडथळा निर्माण करत आहेत. त्या दोन्ही पोलिसांना बडतर्फ करण्यात आलं.

जानेवारी २००७ : मोनिंदर सिंग पंधेर आणि सुरींदर कोली यांची गांधीनगर पोलीस स्टेशन येथे नार्को टेस्ट घेण्यात आली. सीबीआयने निठारी गावात जाऊन या प्रकरणाची सखोल तपासणी केल्यावर त्यांना अजून काही हाडांच्या पिशव्या घरात आणि घराखालील पाईपलाईनमध्ये सापडल्या.

सीबीआयने या दोन्ही आरोपींना गाझियाबाद कोर्टासमोर हजर केलं. १४ दिवसांच्या सीबीआय कोठडीत या दोघांना टाकण्यात आलं.

 

 

सीबीआयचा तपास सुरू असल्याने ही पोलीस कोठडी मे २००७ पर्यंत वाढवण्यात आली. या तपासाच्या दरम्यान, ‘रिम्पा हैदर’ या १५ वर्षीय मुलीचा खून, ७ वर्षीय मुलगी ‘आरती’चा खून, ‘दीपाली मर्डर केस’, ‘रचना लाल मर्डर केस’ अशी नवीन प्रकरणं समोर आली आणि मोनिंदर सिंग पंढर, सुरींदर कोली यांच्या पोलीस कोठडीत भर पडत गेली.

सप्टेंबर २००९ : अलाहाबाद हायकोर्टने या दोन्ही गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली होती. पण, सुरींदर कोलीच्या नातेवाईकांनी या निर्णयाविरुद्ध दिल्ली सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचं ठरवलं.

ऑक्टोबर २०१४ : सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली. या दोन्ही नराधमांना फाशी होईपर्यंत ३ महिन्यांचा कालावधी लागला.

 

 

जानेवारी २०१५ : वकिलांच्या समूह जो की ‘मृत्युदंड’ घोषित झालेल्या प्रकरणांचा अभ्यास करत असतो त्यांनी, “मोनिंदर सिंग पंधेर हा प्रमुख मारेकरी आहे आणि सुरींदर कोलीने केवळ गुन्हा घडण्यास मदत केली आहे” हा युक्तिवाद सांगून सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली. पण, ही विनंती सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

मोनिंदर सिंग लहान मुलांना का मारत होता? हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. विकृत मनोवृत्ती असलेला हा माणूस नरभक्षक होता. दीड वर्ष तो नॉएडा जवळील निठारी या गावात मुलांना गायब करायचा, मारायचा आणि त्यांचा मांसाहार करायचा.

त्याच्या घराजवळ एक मोठी विहीर होती. लहान मुलं तिकडे खेळतांना गेली की परत कधीच आपल्या घरी पोहचायचे नाही. अशिक्षित ग्रामस्थांनी असा समज केला होता की, विहिराच्या शेजारी भूत आहे. त्यामुळे मुलं गायब होत आहेत.

२४ डिसेंबर २०१२ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. लाल यांनी मोनिंदर सिंग पंधेर आणि सुरींदर कोली यांना दोषी ठरवतांना हे वाक्य वापरले होते की, “आरोपींची मानसिक स्थिती अशी होती की, त्यांना रोज नवीन माणसाला जीवे मारण्याची आणि त्याचा मांसाहार करण्याची इच्छा व्हायची. अशी व्यक्ती ही समाजासाठी धोकादायक असते.

 

 

या दोघांच्या मानसिकतेत सुधारणा होण्याची कोणतीही शक्यता आम्हाला जाणवत नाहीये. मोनिंदर सिंग पंधेर आणि सुरींदर कोली यांच्यामुळे मृत्यू पावलेल्या लोकांच्या आत्म्याला तेव्हाच शांती मिळेल जेव्हा या दोघांना मृत्यूदंड दिला जाईल. त्यासाठी हे न्यायालय या दोघांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावत आहे.”

निठारी हत्याकांडमध्ये न्याय झाला. पण, १९ लोकांना जीवे मारणाऱ्या दोन लोकांना ९ वर्ष जिवंत राहता आलं ही सामान्य नागरिकांच्या दृष्टीने आपल्या न्यायव्यवस्थेची त्रुटी म्हणावी लागेल.

असे लोक आणि अशा वृत्तीचा खात्माच होत राहो जेणेकरून लोक कोणत्याही भीतीशिवाय समाजात राहू शकतील.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version