Site icon InMarathi

एकाच कुटुंबातल्या ११ सदस्यांच्या रहस्यमयी मृत्यूचं कोडं CBI ने सोडवलं खरं, पण…

indianexpress.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

भारतीय न्यायव्यवस्थेवर आपल्या सर्वांचा पूर्ण विश्वास आहे. शेवटी सत्याचाच विजय होतो हे आपलं ब्रीदवाक्य आहे. पण, काही प्रकरणं फार वर्ष न्यायप्रविष्ठ असूनही जेव्हा त्यांचा निकाल लागत नाही तेव्हा वरील दोन्ही वाक्यांवरील विश्वासाला नकळत तडा बसल्यासारखं वाटतं.

दिल्लीतील ‘जेसिका लाल’ हे प्रकरण असंच होतं, ज्यामध्ये खून कोणी केला हे शेवटपर्यंत कळलंच नाही. दिल्लीमधील तलवार केस हे सुद्धा वादग्रस्त ठरलेलं प्रकरण होतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आज आम्ही ‘बुरारी’ प्रकरणाबद्दल सांगणार आहोत. इतर गूढ केस मधील आणि या गुन्ह्यात इतकाच फरक आहे की, त्यावेळी मृतांची संख्या १ होती. पण, २०१८ मध्ये दिल्ली मध्येच घडलेल्या ‘बुरारी हत्याकांड’ मध्ये चंदावत या एकाच परिवारातील ११ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

 

 

त्यांचा मृत्यू हा आत्महत्या होती की खून याची चर्चा बरीच दिवस सुरू होती. पण, नंतर प्रकरण शांत झालं. काय झालं होतं? जाणून घेऊयात.

१ जुलै २०१८ ची सकाळ ही उत्तर दिल्ली मधील बुरारी या भागासाठी भयानक बातमी घेऊन आली होती. बुरारी या भागात राहणाऱ्या चंदावत कुटुंबातील १५ ते ७७ वयोगटातील ११ जणांनी आत्महत्या केली होती असं प्रथमदर्शनी पोलिसांना जाणवत होतं.

‘बुरारी हाऊस’ या नावाच्या चंदावत यांच्या घरात पोलिसांना एक चिठ्ठी सापडली होती ज्यामध्ये “मनुष्याचं शरीर हे शाश्वत नाहीये. तुमच्या भीतीवर मात करायची असेल तर फक्त तुमचं तोंड आणि डोळे बंद करा” अशी विचित्र ओळ लिहून ठेवली होती.

गीता ठकराल या बुरारी परिवाराच्या नातेवाईक असलेल्या व्यक्तीचं मात्र असं मत होतं की, “आम्ही सुशिक्षित कुटुंब आहोत. आम्ही कोणत्याही बाबा किंवा फसव्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. ही केस आत्महत्या नसून आमच्या परिवारातील लोकांचा खून झालेला आहे. आमच्या घरातील मुलीचं लग्न ठरलं होतं. आम्ही त्या लग्नाची तयारी करत होतो. आमच्या घरात कोणतीच आर्थिक विवंचना सुद्धा नव्हती.”

चंदावत कुटुंबाच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. दिल्ली पोलिसांनी ही मागणी मान्य केली आणि त्यांनी सीबीआयला अशी विनंती केली की, त्यांनी या प्रकरणाचा छडा लावतांना मानसिक पातळींवर सुद्धा अभ्यास करावा आणि मगच आपला अहवाल सादर करावा.

m.economictimes.com

 

सीबीआयने आपल्या अहवालात असं लिहिलं की, ” चंदावत कुटुंबातील व्यक्तीचं शव विच्छेदन आणि मानसिक सर्वेक्षणानंतर असं समोर आलं आहे की, हा एक अपघात आहे. एक धार्मिक विधी पार पाडत असतांना या लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यांच्यापैकी कोणाचाही आत्महत्या करण्याचा विचार नव्हता.”

सीबीआयने या निर्णयावर येण्याआधी चंदावत कुटुंबाच्या मित्रांचीसुद्धा चौकशी केली होती. सीबीआयने मृतांचं केलेलं मानसिक सर्वेक्षण हे सांगतं की, मृत्यू होत असतांना त्या व्यक्तीची मानसिक स्थिती कशी होती? यासाठी ती व्यक्ती सेवन करत असलेल्या सर्व औषधांची, डॉक्टरांची खरी माहिती पोलिसांना देणं गरजेचं असतं.

सीबीआयच्या तपासात हे समोर आलं आहे की, ललित चंदावत याला त्याच्या मृत वडिलांकडून एक साक्षात्कार झाला होता की, सर्वांनी एक विधी करावा ज्यामध्ये स्वतःचे पाय पलंगाला बांधावेत आणि चेहरा रुमालाने झाकून घ्यावा आणि विधात्याची माफी मागावी.

हा विचित्र प्रकार त्याने घरातील इतर व्यक्तींना सांगितला आणि त्यांनी तसं केलं. हा विधी करत असतांना घरातील ११ जणांचा श्वास कोंडला गेला आणि ही घटना घडली होती.

 

newskarnataka.com

चंदावत कुटुंबाच्या घरात ही घटना घडल्यानंतर काही वर्ष या घरात ‘भुताटकी’ असल्याचा समज लोकांनी त्या भागात पसरवला होता. पण, नंतर हा समज लोकांनी खोडून काढला आणि आज त्या तीन मजली घरात कश्यप आणि एलिस हे दोन परिवार रहात आहेत.

१०७० चौरस फूट इतकं क्षेत्रफळ असलेलं हे घर उत्तर दिल्लीच्या बुरारी या भागात आहे. ललित चंदावत यांचे वडिल भोपाल सिंग यांचं २००७ मध्ये आकस्मिक निधन झालं होतं आणि तेव्हापासून ते ललित यांच्या स्वप्नात यायचे असं ललित याचं म्हणणं होतं.

कित्येक वेळेस घरातील इतर व्यक्तींनी या विधीचा स्पष्ट विरोध केला होता. पण, ३० जून २०१८ च्या रात्री ललित यांचा हट्ट खूपच वाढला आणि असं घडलं असावं असं चंदावत यांचे शेजारी सांगतात.

दिल्ली पोलीसचे ऑफिसर राजीव तोमर यांनी या घटनेचा तपास केला होता. त्यांनी ललित चंदावत यांची डायरी मधील नोंदी बघून घडलेल्या घटनांचा संबंध जोडला होता आणि सीबीआयला केस सुपूर्त केली होती.

zeenews.india.com

 

डायरी मधील नोंदीनुसार भोपाल सिंग हे राजस्थानमधून दिल्लीला स्थलांतरित झाले होते. ललित हा त्यांचा सर्वात लहान मुलगा होता. आज या परिवारातील दिनेश सिंग चंदावत हा मुलगा केवळ जिवंत आहे.

ललित चंदावत हे प्लायवूडचं दुकान चालवायचे. २००४ मध्ये ललित यांची एका अपघातात वाचा गेली आणि तिथून गोष्टी बदलण्यास सुरुवात झाली. जास्त वेळ घरातच असल्याने ललित यांची वडिलांसोबतची जवळीक वाढली आणि २००७ मध्ये त्यांचं अचानक जाणं हे ललित यांना पचलं नाही.

त्यांना वडिलांचा भास व्हायचा आणि हा विधी करण्यास वडील त्यांना विनंती करायचे. या सर्व गोष्टींमध्ये किती तथ्य आहे हे कोणीच पडताळु शकलं नाही.

 

storypick.com

 

ललित यांच्या दुकानात काम करणारा अस्लम मात्र हे सांगतो की, ललित हे प्रत्येक वाक्यात त्यांच्या वडिलांची आठवण काढायचे.

आज चंदावत कुटुंबातील दिनेश हे या घटनेत न्याय झालेला नाही म्हणून नाराज आहेत. आपला भाऊ आणि घरातील इतर १० व्यक्ती अशी चूक करू शकतात यावर त्यांचा आजही विश्वास बसत नाहीये.

माननीय न्यायालयाने तर या केसचा निकाल लावला आहे. पण, दिनेश आणि इतर लोकांच्या मनातील कित्येक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.

अंधश्रद्धांना खतपाणी घालू नये आणि मृत व्यक्तीसाठी जिवंत व्यक्तींना त्रास देऊ नये हे आपण या घटनेतून शिकू शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version