Site icon InMarathi

कर्णधारपदाबद्दल अचानक निर्णय; जेव्हा या ६ कर्णधारांनी तडकाफडकी पद सोडले…

dhoni and ganguly inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

विराटने टी-२० फॉरमॅटचं कर्णधारपद सोडायचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्याआधी त्याने प्रशिक्षक रवी शास्त्री, BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्याशी चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणजेच हा निर्णय तडकाफडकी घेतला असावा असं वाटत नाही. असं असूनही, सामान्य मंडळींची सुरु असलेली चर्चा भलतीच आहे. विराटने घेतलेला निर्णय अचानक घेण्यात आला असल्याची चर्चा काही ठिकाणी झाली.

आता धोनीने csk टीमच्या कर्णधारपदाची धुरा रवींद्र जडेजाच्या खांदयावर सोपवली आहे, csk म्हंटल कि एकच नाव डोळ्यासमोर यायचं ते म्हणजे महिंद्र सिंग धोनी. यामुळे आता क्रिकेट वर्तुळात चांगलीच रंगणार….

 

 

याआधी काही भारतीय कर्णधारांच्या कारकिर्दीत हे असे कठोर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. कधी स्वतः त्या खेळाडूने तर कधी निवडसमितीने हे निर्णय घेतले आहेत. आज जाणून घेऊयात अशाच काही कर्णधारांबद्दल…

१. कपिल देव

कपिल देव यांनी १९८३ चा विश्वचषक भारताला जिंकवून दिला. होय कपिल देव यांनीच जिंकून दिला असं म्हणायला हरकत नाही. कारण कर्णधार म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केलीच, त्याशिवाय १७५ धावांची ती दर्जेदार खेळी आजही लोकांना लक्षात आहे. अंतिम सामन्यात टिपलेला झेल सुद्धा विस्मरणात जाणार नाही.

 

 

पुढच्या म्हणजेच १९८७ च्या विश्वचषक स्पर्धेत मात्र भारतीय संघाला उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. हा पराभव भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप आणणारा ठरला. कपिल देव यांची कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतरही १९९४ पर्यंत ते  भारतासाठी खेळत होते.

२. मोहम्मद अझरुद्दीन

भारतीय संघाची १९९२, १९९६, १९९९ अशा सलग ३ विश्वचषकात धुरा वाहणारा भारताचा कर्णधार म्हणजे, मोहम्मद अझरुद्दीन! त्याची कारकीर्द त्यानंतरच्या काळात वादग्रस्त ठरली. मात्र, मध्यंतरीच्या काळात आणखीही काही चढउतार त्याच्या कारकिर्दीत येऊन गेले.

 

 

१९९६ साली अझर चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. त्याचदरम्यान सचिनचा उदय होऊ लागला होता. मग अझरकडून कप्तानी गेली आणि ती माळ सचिनच्या गळ्यात पडली. त्यानंतर पुढे काय झालं, ते बघुयातच…

३. सचिन तेंडुलकर

सचिनला कुणी ‘गॉड ऑफ क्रिकेट’ म्हटलं, तर कुणी आणखी काही उपाधी दिली. तो एक अत्यंत अप्रतिम खेळाडू होता याबद्दल कुणाचंही दुमत नसेल. पण तो जितका उत्तम खेळाडू होता, तितकेच धब्बे त्याच्या कर्णधारपदावर लागले आहेत, असं म्हटलं तरी ते अगदीच चुकीचं ठरणार नाही.

 

 

अझरकडून सचिनकडे कर्णधारपदाचा मुकुट आला खरा, पण तो काटेरी ठरला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध यजमानपदाचे कसोटी सामने आणि तिरंगी मालिकेत भारताने विजय मिळवला. पण त्यानंतर यशाचं दान सचिनच्या पदरात पडलं नाही.

 

 

१९९७ साली त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि मोहम्मद अझरुद्दीन पुन्हा एकदा भारतीय संघाचा कर्णधार झाला.

४. सौरव गांगुली

भारतीय संघाला जिंकायला शिकवणारा, आक्रमक बनवणारा कर्णधार म्हणून गांगुलीकडे पाहिलं जातं. कपिल देव यांनी मिळवलेल्या घवघवीत यशानंतर, गांगुलीने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला घेऊन जाण्याची किमया केली. अशा या चांगल्या कर्णधाराचा शेवट मात्र फार चांगला झाला नाही.

 

 

ग्रेग चॅपल आणि सौरव गांगुली यांचे वाद तर सर्वश्रुतच आहेत. ‘दादाचा सर्वाधिक अपमान जर कुणाकडून झाला असेल, तर तो ग्रेग चॅपलकडून’ असं म्हणणारी सुद्धा अनेक मंडळी आजही भेटतील. २००५ साली दादाला संघाबाहेर करण्यात आलं. केवळ कप्तानीच नाही, तर त्याच्या संघातील जागेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं होतं.

५. राहुल द्रविड

सौरव गांगुली भारताचा कर्णधार झाला, तेव्हा उपकर्णधारपदाची माळ द्रविडच्या गळ्यात पडली. साहजिकपणे, गांगुलीची संघातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर कप्तानी द्रविडकडे आली.

 

 

द्रविडने २५ कसोटी आणि ७९ वनडे सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा वाहिल्यानंतर द्रविडला सुद्धा हा ताण सहन होईनासा झाला असंच म्हणायला हवं. २००७ साली विश्वचषकात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. त्यानंतर द्रविडने हे शिवधनुष्य खाली ठेवायचा निर्णय घेतला.

६. महेंद्रसिंग धोनी

तो दिवस आजही अनेकांना आठवत असेल. २०१४ साली भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला आणि अचानक एक वेगळीच बातमी येऊन धडकली. माहीने थेट कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. पुढच्या सामान्यापासून उर्वरित ३ सामन्यांमध्ये विराटने कर्णधारपदाचा काटेरी मुकुट त्याच्या डोक्यावर घेतला.

 

 

वनडे आणि टी-२० चं कर्णधारपद सुद्धा त्याने तसं अचानकच सोडलं. जानेवारी २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्धची मालिका सुरु होण्याआधीच त्याने कप्तानी सोडण्याचा आणि केवळ खेळाडू म्हणून उपलब्ध राहण्याचा निर्णय कळवला होता.

हे होते ते ६ कर्णधार, ज्यांचं कर्णधारपद अचानकपणे दुसऱ्या खेळाडूच्या नशिबात दान देऊन गेलं. कधी हे निर्णय चुकले, कधी अगदी योग्य ठरले… या यादीमधील सगळ्यात वाईट शेवट कुणाच्या कर्णधारपदाचा ठरला असं तुम्हाला वाटतं. कमेंटमधून नक्की कळवा…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version