Site icon InMarathi

‘परदेसी परदेसी’ म्हणत अनेकांना वेड लावणाऱ्या या अभिनेत्रीला एक चूक महागात पडली!

pratibha sinha featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

१९९६ साली आलेल्या ‘राजा हिंदुस्थानी’ हा चित्रपट बहुतेक सगळ्यांना आठवत असेलच. करिष्मा कपूर, आमिर खानचा हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता.

राजा हिंदुस्थानी तसा बऱ्याच कारणांसाठी चर्चेत राहिला होता. त्यापैकी एक कारण म्हणजे या चित्रपटातील बहुचर्चित किसिंग सीन होय. करिष्मा कपूरने एका मुलाखतीत सांगितले होते की हा सीन शूट करताना त्यांना फारच त्रासाला सामोरे जावे लागले होते.

 

 

कारण जिथे या सीनचे शूटिंग झाले त्या ऊटीमध्ये तेव्हा वातावरण खूप थंड होते आणि आमिर खानने थंडीमुळे हा सीन शूट करायला तीन दिवस घेतले. या चित्रपटामुळे करिष्मा कपूरचे चाहते वाढले.

किसिंग सीनशिवाय या चित्रपटातील लक्षात राहणाऱ्या गोष्टी म्हणजे यातील श्रवणीय गाणी! हा चित्रपट येऊन २५ वर्षे होऊन गेली तरीही अजून या चित्रपटातील “आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके” किंवा “पूछो जरा पूछो” किंवा “कितना प्यारा तुम्हे रब ने बनाया” ही गाणी अनेकांची तोंडपाठ आहेत.

या चित्रपटातील सर्वात गाजलेले गाणे म्हणजे “परदेसी परदेसी जाना नहीं” हे आहे यात दुमत नाही. गीतकार समीरनी लिहिलेले,संगीतकार नदीम-श्रवण यांनी संगीतबद्ध केलेले व उदित नारायण, अलका याज्ञीक आणि सपना अवस्थी यांनी गायलेले हे गाणे त्याकाळी प्रचंड लोकप्रिय ठरले होते.

या गाण्यात करिष्मा कपूर आमिर खान यांच्याबरोबरच आणखी एक अभिनेत्री होती. ती अभिनेत्री म्हणजे मागच्या पिढीतील प्रतिभावान अभिनेत्री माला सिन्हा यांची मुलगी प्रतिभा सिन्हा होय.

 

हे ही वाचा “मी ‘हॉट’ सीन्स देते, हे बॉयफ्रेन्डला सांगत नाही”, या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!

आपल्यापासून आपली प्रेयसी कायमची लांब जाणार आणि ती परत भेटण्याची शक्यता नाही या कल्पनेने कासावीस झालेला नायक त्याच्या मनातील व्यथा यागाण्यातून मांडतो.

चित्रपटाची कथा तशी १९६५ सालच्या शशी कपूर आणि नंदा ह्यांच्या ‘जब जब फुल खिले’ या चित्रपटाशी मिळतीजुळती होती. श्रीमंत मुलगी फिरायला एका पर्यटनस्थळी येते आणि ती तिथेच गाईड असलेल्या गरीब हरहुन्नरी मुलाच्या प्रेमात पडते.

मग घरच्यांच्या विरोध, त्यांच्या विरोधात जाऊन केलेलं लग्न, मुलगी आणि मुलाच्या आर्थिक स्थितीतील , राहणीमानातला फरक , त्यातून उद्भवणाऱ्या समस्या, घरच्यांनी दोघांचे नाते तोडण्याचा प्रयत्न करणे आणि शेवटी प्रेमाचा विजय होऊन शेवट गोड होणे अशी ही चित्रपटाची थोडक्यात घडणारी कथा आहे.

काहीतरी वेगळे करण्यासाठी प्रसिद्ध असलेला आमिर खान सुरुवातीला या चित्रपटाची ‘टिपिकल’ मसाला असलेली कथा ऐकून हा चित्रपट करण्यासाठी तयार नव्हता. परंतु चित्रपटाचे दिग्दर्शक धर्मेश दर्शन ह्यांनी आमिर खानला चित्रपटाच्या व्यावसायिक यशाची खात्री दिल्यावर आमिर खान हा चित्रपट करण्यास तयार झाला.

या चित्रपटासाठी सुरवातीला ऐश्वर्या राय, जुही चावला आणि पूजा भट ह्यांना विचारण्यात आले होते परंतु शेवटी करिष्मा कपूरला चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि तिच्या कारकिर्दीत हा चित्रपट मैलाचा दगड ठरला.

यापूर्वी आमिर खान, करिष्मा कपूर ह्यांनी १९९४ सालच्या ‘अंदाज अपना अपना’ मध्ये एकत्र काम केले होते. राजा हिंदुस्थानी जरी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला असला तरी त्यानंतर ही जोडी एकत्र कधी दिसली नाही.

 

 

तसेच ‘परदेसी परदेसी’ ह्या गाण्यात झळकलेली प्रतिभा सिन्हा ही अभिनेत्री सुद्धा नंतर फारशी कुठे दिसली नाही. प्रतिभा सिन्हाचे करियर फारसे लक्षात राहण्यासारखे नाही.

त्यांनी फक्त १३ चित्रपट केले. त्यातलेही मोजकेच बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. प्रतिभा यांचे करियर त्यांच्या एका चुकीमुळे संपल्याची चर्चा इंडस्ट्रीमध्ये होते. त्यांची ती चूक म्हणजे त्यांनी एका विवाहित व्यक्तीवर प्रेम केले आणि हीच चूक त्यांना खूप महागात पडली.

प्रतिभा सिन्हा व संगीतकार नदीम ह्यांचे अफेअर असल्याच्या बातम्या इंडस्ट्रीमध्ये त्यावेळी पसरल्या होत्या. प्रतिभा सिन्हा यांची आई माला सिन्हाच्या कानावर जेव्हा ही बातमी आली तेव्हा त्या नाराज झाल्या. त्यांना हे नाते मान्य नव्हते. कारण नदीम यांचे लग्न पूर्वीच झाले होते तरीही प्रतिभा नदीमच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या.

 

 

आईला मान्य नसूनदेखील प्रतिभा हे नाते संपवण्यास तयार नव्हत्या. त्या व नदीम एकमेकांशी कोडवर्डमध्ये संभाषण करीत असत.

त्या नदीमला ‘एस’ तर नदीम प्रतिभा यांना “अँबेसिडर” म्हणत असत. पण असे करून देखील माला सिन्हा ह्यांना सत्य समजलेच. सत्य कळल्यानंतर माला सिन्हा खूप नाराज झाल्या आणि त्यांनी प्रतिभा ह्यांना नदीमपासून लांब चेन्नईला पाठवून दिले.

चेन्नईला गेल्यानंतरदेखील प्रतिभा नदीमबरोबर संपर्कात होत्या. चेन्नईला असताना त्यांनी एका इंटरव्यूमध्ये जाहीर केले की त्या लवकरच नदीमबरोबर लग्न करणार आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे इंडस्ट्रीत अनेकांना चर्चेला साधन मिळाले.

जेव्हा ही गोष्ट माला सिन्हा यांना कळली तेव्हा त्यांनी नदीमच्या घरी फोन करून त्यांना खडे बोल सुनावले. परंतु प्रतिभा यांनी प्रकरण सावरून घेत नदीमची माफी मागितली. परंतु काहीच दिवसांत प्रतिभा यांनी स्वतःचे वक्तव्य बदलत लग्न करत नसल्याचे मीडियात जाहीर केले.

या प्रकरणात नदीम यांना मानसिक त्रास झाला. त्यांनी मीडियाला सांगितले की ,”मी फक्त प्रतिभाची मदत करू इच्छित होतो कारण ती एक चांगली अभिनेत्री आहे. माझ्यात व प्रतिभामध्ये काहीही नाते नाही. मी माझ्या पत्नीबरोबर माझ्या आयुष्यात सुखी आहे.”

या प्रकरणातनंतर माला सिन्हा यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. तेव्हा तिथे प्रतिभादेखील उपस्थित होत्या. या पत्रकार परिषदेत प्रतिभा यांनी नदीमवर “रेप व किडनॅपिंग”चे गंभीर आरोप केले. हे ऐकून प्रत्येकाला धक्का बसला.

 

हे ही वाचा “या घटने”नंतर टॉपची सुपरहिट संगीतकार जोडी कायमची तुटली…

यावर नदीमने इंटरव्यूमध्ये असे उत्तर दिले की ,”दोघी मायलेकी मिळून माझ्या नावाचा उपयोग करून जास्तीत जास्त पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.”

नदीमबरोबरचे नाते संपुष्टात आल्यानंतर प्रतिभा यांनी चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेतला. त्यांचा अखेरचा चित्रपट २००० साली आला होता. “ले चल अपने संग” असा तो चित्रपट फारसा कुणाच्या लक्षात देखील नाही.

त्याआधी सुद्धा त्यांचे चित्रपट फारसे यशस्वी ठरले नाहीत. चित्रपटसृष्टी सोडल्यानंतर प्रतिभा यांनी प्रसिद्धीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. त्या सोशल मीडियावरदेखील नाहीत.

या प्रकरणानंतर त्यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. सध्या त्या मुंबईत त्यांच्या आईबरोबर बांद्रा येथे वास्तव्यास आहेत. प्रतिभा यांच्या एका चुकीमुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version