Site icon InMarathi

भारतीय तरुणांना गोवा रोड ट्रिपचं स्वप्न दाखवणारा “दिल चाहता है” २० वर्षाचा झाला!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

१० ऑगस्ट – ही तारीख बॉलीवूडसाठी खूप म्हत्वाची आहे. कारण, आजच्या दिवशी २० वर्षांपूर्वी ‘दिल चाहता है’ हा सर्व ट्रेंड बदलणारा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

“हिरो हा काहीही करू शकतो” हा समज त्याआधी पर्यंत बॉलीवूडच्या निर्मात्यांनी लोकांच्या मनात इतका भरून ठेवला होता की, तो समज खोडून काढण्यासाठी २००१ हे वर्ष उजाडायची आपल्याला वाट बघावी लागली होती.

या सिनेमातील एका हिरोची गोव्याहून परत येतांना फजिती होते, एका हिरोला दुसऱ्या व्यक्तीला मारल्यावर हाताला लागतं, आपल्या गर्लफ्रेंडची माफी मगतांना एक वाक्य सुद्धा बोलता न येणं, कॉलेज नंतर मित्रांची होणारी ताटातूट हे सगळं बघतांना प्रेक्षकांना आपण आपलं आयुष्य पडद्यावर बघत आहोत असं वाटलं.

 

 

दिग्दर्शक फरहान अख्तरच्या कॉलेजमध्ये असतांना लिहिलेल्या डायरी मधून साकारलेला ‘दिल चाहता है’ हा सिनेमा कित्येक लोकांचा बॉलीवूडच्या सर्वात आवडत्या सिनेमांपैकी एक आहे, आणि नेहमीच राहणार.

“हम लोगो की ठोकर मे है ये जमाना” हे गाणं असलेल्या या सिनेमाने तरुणाईला जसे आहात तसे राहण्याचा एक मार्ग दाखवला होता. एक उथळ, एक संयमी आणि एक वास्तववादी अश्या तीन मित्रांची अशी कथा,

त्याचं असं सादरीकरण बॉलीवूडच्या प्रेक्षकांनी याआधी कधीच अनुभवलं नव्हतं. अजून काय मुद्दे आहेत जे ‘दिल चाहता है’ ला इतकं ‘स्पेशल’ ठरवतात? हे या सिनेमाच्या २० वर्षपूर्तीच्या निमित्ताने जाणून घेऊयात.

१. ‘दिल चाहता है’ या सिनेमासाठी याआधी हृतिक रोशन आणि अभिषेक बच्चन यांना विचारण्यात आलं होतं. पण, त्या दोघांनीही हा सिनेमा नाकारल्यानंतर आमिर खान आणि सैफ अली खान यांच्याकडे फरहान अख्तरने विचारणा केली.

 

 

अक्षय खन्नाने सिनेमाला लगेच होकार दिला होता. आमिर खानची भेट होण्यासाठी मात्र दिगदर्शकाला तब्बल १० महिने वाट बघावी लागली होती. सोनाली कुलकर्णीचा रोल हा आधी इशा कोपिकर करणार होती. पण, तसं घडलं नाही.

२. आमिर खानचा रोल हा आधी अक्षय खन्नाला ऑफर करण्यात आला होता. पण, परफेक्शनिस्ट आमिर खानने पूर्ण स्क्रिप्ट ऐकल्या नंतर आकाश आणि सिद या पात्रांची अदलाबदल केली.

३. आपल्या सर्वांचं आवडतं सिनेमाचं टायटल गाणं ‘दिल चाहता है’ हे फरहान अख्तर, जावेद अख्तर आणि शंकर-एहसान-लॉय यांनी लोणावळ्यात बसून लिहिलं, तयार केलं होतं. फरहान अख्तरने या आधी शंकर महादेवन यांच्या जगप्रसिद्ध ‘ब्रेथलेस’ गाण्याच्या व्हिडिओचं दिगदर्शन केलं होतं.

४. ‘कोई कहे केहता रहे’ हे गाणं प्रीती झिंटाला इतकं आवडलं होतं की, तिने या गाण्यात सहभागी होण्यासाठी फरहान अख्तरकडे विनंती केली होती. पण, ती त्या कॉलेजची नसल्याने दिगदर्शकाने हे मान्य केलं नाही.

 

 

५. करण जोहरने आमिर खान वर ‘दिल चाहता है’ मध्ये काम करण्यावरून टीका केली होती. हा सिनेमा चालणार नाही, असं करणचं मत होतं. हा सिनेमा त्याच्या ‘टिपिकल’ पठडीतला नसल्यासने करणला तसं वाटलं असावं.

६. फरहान अख्तरने हा सिनेमा ३ मैत्रिणींना घेऊनसुद्धा त्यावेळीच ठरवलं होतं, आणि नुकतंच त्याने प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ आणि आलिया भट यांना घेऊन ‘जी ले जरा’ या त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे!

 

 

७. सिनेमातील घड्याळ्याच्या काट्यांवर चालणारा सुबोध तुम्हाला आठवत असेलच. ‘असद दादरकर’ या फरहान अख्तर च्या मित्राने हा रोल केला होता. प्रत्यक्ष आयुष्यात असद हा सिनेमातील आमिर खान म्हणजेच ‘आकाश’ सारखा आहे असं फरहान अख्तरने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

८. ‘दिल चाहता है’ ची पूर्ण कथा, संवाद हे आधी इंग्रजी मध्ये लिहिण्यात आले होते आणि मग त्यांचं हिंदीमध्ये भाषांतर करण्यात आलं होतं.

सिनेमात निखळ मैत्रीचं दर्शन घडवून देणारा आमिर खान शुटिंगनंतर मात्र आपल्या हॉटेल च्या खोलीत एकटाच ऑनलाईन बुद्धिबळ खेळत बसलेला असायचा.

 

 

९. ‘दिल चाहता है’ च्या आधी फरहान अख्तरने एक रोमँटिक कथा लिहिली होती. पण, त्या कथेला कोणताही निर्माता मिळत नव्हता. ‘दिल चाहता है’ चं मूळ नाव फरहान अख्तर ने ‘हम तीन’ असं ठेवलं होतं.

१०. सैफ अली खान जेव्हा गोव्याहून ट्रकमध्ये बसून मुंबईला परत येतो आणि एका उशीवर बसलेला असतो, या पाच मिनिटांच्या सीनचं शुटिंग करण्यासाठी २ तास लागले होते. कारण, तो सीन ऐकूनच सेट वरील प्रत्येकाला हसू अनावर होत होतं. शॉट ओके झाल्यावर सुद्धा युनिट किती तरी वेळ हसतच होतं.

११. जितका प्रतिसाद डिसीएचला शहरांमधून मिळाला होता तितका छोट्या गावातून मिळाला नव्हता. कारण, ही कथा शहरात राहणाऱ्या ३ श्रीमंत मुलांची होती. जे की मर्सिडीज कार घेऊन गोव्याला सुट्टीसाठी जाऊ शकतात. स्टाईल म्हणून हनुवटीच्या वर छोटी दाढी ठेवतात, जी की आजही शहरी भागात लोकप्रिय आहे.

 

 

१२. ‘दिल चाहता है’ नंतर गोवा मधील पर्यटकांची संख्या कितीतरी पटीने वाढली होती. गोव्यात शुटिंग झालेला ‘चपोडा किल्ला’ हा आजही ‘दिल चाहता है’ चा किल्ला म्हणूनच ओळखला जातो.

आपल्या या आवडत्या सिनेमाबद्दल आपण कितीही लिहू, वाचू शकतो. कारण, हा सिनेमा परत बघणे हेसुद्धा तितकंच आनंददायी आहे. बॉलीवूडमध्ये असेच सिनेमे तयार होत रहावेत, “यही हमारा दिल चाहता है”.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version