Site icon InMarathi

इंदिरा गांधींच्या एका अत्यंत विश्वासू माणसाने त्यांच्याकडून नमाज पठण करवून घेतलं होतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

राजकारणात प्रत्येक मोठ्या व्यक्तीचा कुणीतरी खास, विश्वासू असा साथीदार असतोच असतो. उदाहरण घ्यायचं झालंच तर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं उदाहरण आपण घेऊ शकतो.

हे दोघेही गुजरात विधानसभेपासून एकत्र आहेत त्यामुळे मैत्री हा एक कॉमन पॉइंट आपण येथे धरू शकतो. मध्यंतरी गुजरातचे माजी खासदार अहमद पटेल यांचे निधन झाले. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कोणी सर्वाधिक जवळ होते तर ते अहमद पटेल.

अशी विविध उदाहरण आपण देऊ शकतो. पण, जेव्हा जेव्हा इंदिरा गांधींचा विषय निघतो तेव्हा त्यांचा मुलगा संजय गांधी यांच्या नंतर जर कोणाचं नाव येत होतं, तर ते म्हणजे आर के धवन.

 

 

इतर जोड्यांमध्ये आपण जी नावं पाहिली ते एक तर आमदार-खासदार हुद्द्यावर असलेली मंडळी होती किंवा राजकारणात त्यांचा जम बसलेला आहे. पण धवन त्याला अपवाद ठरतात.

धवन हे इंदिरा गांधी यांचे स्वीय सचिव होते. पण राजमहालाच्या दरबानापेक्षा त्यांचा रुबाब काही कमी नव्हता.

आर के धवन हे इंदिरा गांधी यांच्या एवढ्या विश्वासातील होते की त्यांच्या सांगण्यावरून इंदिरा गांधी यांनी चक्क नमाज अदा केली होती. आज त्याच आर के धवन आणि त्या नमाज घटनेबद्दल आपण बघणार आहोत.

हे ही वाचा असं काय घडलं…? की इंदिरा गांधींनी या सिनेमावर थेट बंदी घातली!

आर के धवन तसे सरकारी कार्यालयातले स्टेनोग्राफर. एक दिवस त्यांचे नातेवाईक त्यांना थेट इंदिरा गांधींना भेटायला घेऊन गेले. शिफारस एवढी तगडी होती की इंदिरा गांधींनी धवन यांना आपल्या सहाय्यकांमध्ये ठेवून घेतले.

एक दिवस इंदिरा गांधी आपल्या ऑफिसमध्ये काम करत असताना त्यांना त्यांचा चष्मा मिळत नव्हता. लागलीच धवन यांनी त्यांच्या खिशातून नवा कोरा चष्मा काढून इंदिरा गांधींच्या हातात ठेवला.

इंदिरा यांनी विचारले असता धवन यांनी उत्तर दिले की,चष्मा शोधण्यासाठी वेळ जाऊ नये म्हणून त्यांच्यासाठी आधीच चार-पाच चष्मे त्यांनी तयार करून ठेवले आहेत.

धवन यांच्या काम करण्याच्या पद्धतीने इंदिरा एवढ्या प्रभावित झाल्या की त्यांनी धवन यांना थेट आपला स्वीय सचिव म्हणून नेमणूक केली.

 

 

त्यानंतर धवन यांनी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही असं सांगितलं जातं. इंदिरा गांधींना कोण भेटणार, कोण नाही. फोनवर त्यांच्याशी चर्चा कधी करायची याचे निर्णय धवनच घेत असत.

धवन खुश तर इंदिरा खुश आणि धवन नाराज तर इंदिरा गांधी तुमच्या आवाक्याच्या बाहेर,असा एकंदरीत विषय होता. तर, धवन यांचा इंदिरा गांधींवर किती प्रभाव होता हे १९८० साली घडलेल्या घटनेवरून समजते.

त्या वर्षी झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधींना पराभव पाहायला लागला होता, त्यामुळे इंदिरा गांधींचे मन शांत राहावे म्हणून धवन विविध बाबा, मौलवी यांना इंदिरा गांधींकडे घेऊन येत असत. त्यामध्येच एक मौलाना होता-जमील इलियासी.

इलियासी दिल्लीच्या कस्तुरबा गांधी रोडवरच्या मशिदी मधील मौलवी. इलियासीने भविष्यवाणी केली की जर त्याच्या सांगण्याप्रमाणे इंदिरा वागल्या तर येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा प्रचंड विजय हा निश्चित आहे.

 

 

इलियासीने सांगितल्या प्रमाणे धवन यांनी त्याने दिलेला गंडा (तोटका) घराच्या छतावर बांधला. इलियासी याने इंदिरा गांधींना सांगितले की ३५० पेक्षा जास्त सिट तुम्ही जिंकणार आहात. त्यानंतर मात्र हा गंडा काढायला मला बोलवा.

त्या निवडणुकीत इंदिरा गांधी ३५३ सिट जिंकून पंतप्रधान झाल्या होत्या. आणि त्या धामधुमीत त्या इलायसीने सांगितलेलं विसरून गेल्या आणि त्याच काळात संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.

त्यानंतर पुन्हा इलियासी इंदिरा गांधींच्या घरात प्रकट झाला. आपल्या हातून तो गंडा न उतरवल्यामुळे इंदिरा गांधींना या विचित्र घटनेतून जावं लागतं आहे असं त्याचं म्हणणं होतं.

सोनिया गांधी यांच आत्मचरित्र लिहिणारे रशीद किडवाई सांगतात, इंदिरा एवढ्या दुखावल्या गेल्या होत्या की इलियासी सांगेल ते करायला त्या तयार होत्या आणि त्या इलियासीला त्यांच्या अत्यंत विश्वासु अशा आर के धवन यांनी आणल्यामुळे त्यांना त्यात काहीही शंका नव्हती.

इलियासी यांनी अल्लाहची मेहेरनजर पडावी म्हणून नमाज अदा करा असा सल्ला दिला. पण इंदिरा यांना इस्लामिक प्रार्थना पद्धती माहीत नसल्यामुळे त्यांना यात अडचण निर्माण झाली. पण नंतर इलियासीला बघून बघून त्यांनी नमाज अदा करायला सुरुवात केली.

 

 

धवनसुद्धा तेव्हा तिथेच असत आणि त्यांनी सुद्धा याला विरोध केला नव्हता. आर के धवन यांची ताकद दिसून आली ती आणीबाणीच्या काळात.

धवन यांच्या सांगण्यावरून मोठमोठ्या नेत्यांना जेलमध्ये डांबण्यात आले होते. या धरपकडीमध्ये धवन यांनी आजारी आणि वृद्ध नेत्यांना सूट दिली होती. पण त्यामागे सुद्धा त्यांची मोठी खेळी होती.

धवन त्या नेत्यांकडून इंदिरा गांधी यांचा वीस कलमी कार्यक्रम मान्य असल्याचे सही करून घेत असत. हे वीस कलमी कार्यक्रम मान्य करणे म्हणजे इंदिरासमोर आत्मसमर्पण करण्यासारखेच होते.

आणीबाणीमध्ये संजय गांधी जिथे उघडपणे दिसत होते तेच आर के धवन पडद्याआड काम करत होते. इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा धवन तिथेच होते. अंग रक्षकांचे टार्गेट इंदिरा असल्यामुळे धवन दुर्लक्षित झाले आणि बचावले.

 

 

इंदिरा यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी धवन यांनाच सोबत ठेवून सत्ता चालवली होती. काँग्रेसमध्ये असे अनेक नेते आहेत जे धवन यांचे बोट धरून राजकारणात सत्तेच्या शिड्या चढत गेले.

२०१८ मध्ये वयाच्या ८१ व्या वर्षी धवन यांनी अखेरचा श्वास घेतला. सत्ता कशी राबवतात हे इंदिरा गांधी यांनी दाखवून दिले, पण पडद्याआड सत्ता कशी राबवायची हे धवन यांनी दाखवून दिले होते.

===

हे ही वाचा इंदिरा गांधींसमोर झुकलेले राष्ट्रपती : बस्स हीच आहे यांची आठवण…!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version