Site icon InMarathi

“अधिक मुलं होऊ द्या”, ७ मुलांचा बाप असलेला एलॉन मस्क असं का म्हणतोय? वाचा

elon image inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“मंगळावर जाण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे, कृपया मुलं जन्माला घाला”, हे वाक्य वाचून काहींनी कपाळावर हात मारला असेल तर काहींना हसू आवरलं नसेल, मात्र ही कोणतीही व्हॉट्सअपवरील विनोदी पोस्ट नाही की फेसबूकवर मारलेली कोपरखळी नाही, तर हे विधान केलंय जगातील हुशार, यशस्वी आणि महत्वकांक्षी उद्योगपती असलेल्या एलॉन मस्क यांनी!

आता तुम्हाला वाटेल ही त्यांची चूक असावी किंवा पब्लिसिटी स्टन्ट, मात्र तुमच्या या दोन्ही शंका चुकीच्या असून त्यांनी अभ्यासाव्दारे त्यांचं हे मत मांडलं आहे.

 

 

लोकसंख्येत आघाडीवर असलेल्या चीनच्या पाठोपाठ भारताने नंबर लावला आहे. एकूणच या दोन्ही देशांमध्ये फोफावलेली लोकसंख्या ही जगाची गंभीर समस्या बनत असताना इलॉन मस्कसारख्या हुशार माणसाने जास्तीत जास्त मुलांना जन्म देण्याचा सल्ला नेमका का बरं दिला असावा असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना?

नेमकी भनगड काय?

टेस्ला कंपनीचा संस्थापक असलेला इलॉन मस्क हा आपल्या कार्यक्षमतेसाठी ओळखला जातोच, मात्र त्यापेक्षाही जास्त स्पेसेक्स या त्यांच्या प्रकल्पामुळे त्याची महत्वकांक्षी वृत्ती गौरवली जाते.

याच टेस्ला फॅन क्लब या ट्विटर हॅंडलला प्रतिसाद देताना एलॉन मस्क याने एक ट्विट केलं आणि त्यावरून अनेकांनी भुवया उंचावल्या.

आपल्या ट्विटमध्ये एलॉन मस्क म्हणतो, “सध्या झपाट्याने लोकसंख्या ढासळत चालली आहे. मात्र ही समस्या किती गंभीर आहे याचा अंदाज अजूनही अनेकांना आलेला नाही. त्यामुळे ही समस्या वेळेत ओळखून आपण त्यानुसार नियोजन करणं गरजेचं आहे”.

 

 

 

 

गमतीची बाब ही की एलॉन हा स्वतः सध्या ७ मुलांचा पालक आहे. त्यामुळे या ट्विटची सुरुवात करताना “मी स्वतः एक नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे” असंही त्याने प्रामाणिकपणे कबूल केलं आहे.

हे ही वाचा – ऑनलाईन शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारा एलॉन मस्कचा कानमंत्र तरुणांसाठी फायदेशीर!

मुलं जन्माला घालायची, पण कशासाठी?

‘हम दो, हमारे दो’ चा नारा देणा-या भारतात एलॉनचा हा दावा हास्यास्पद वाटणं स्वाभाविक आहे. याबाबत नुकताच योगीसरकारने कुटुंब नियोजन विधेयकाचा घाट घातला आहे. माझी मुलं, माझी जबाबदारी म्हणत उत्तरप्रदेश सरकारने दोन पेक्षा अधिक मुलं असणा-यांना सरकारी नोकरीत ‘नो एन्ट्री’ असल्याचं जाहीर केलं आहे.

एकीकडे भारतीय सरकार कुटुंब नियोजनाचे धडे देत असताना दुसरीकडे जगातील सर्वात हुशार उद्योजक मुलांना जन्म देत लोकसंख्या वाढवण्याबाबत सांगतोय. अशावेळी नेमकं ऐकायचं कुणाचं? असा सवाल पडला असेल तर आधी एलॉन मस्क असं का म्हणतोय? हे समजून घेणं गरजेचं आहे.

एलॉन मस्कच्या मते घटणारी लोकसंख्या ही गंभीर बाब आहेच, मात्र त्याचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मीशन टु मार्स अर्थात मंगळमोहीमेसाठीही अधिकाधिक मनुष्यबळाची गरज आहे.

एलॉन म्हणतो, मंगळावर सध्या जीवसृष्टी नाही, मात्र पृथ्वीवरील लोकांना मंगळस्वारी घडवून आणण्याचे प्रयत्न सुरु आहे, मात्र त्यासाठी अधिकाधिक कुशल लोकसंख्येची गरज वर्तमानात आहेच, मात्र त्याहूनही अधिक गरज भविष्यात भासेल यात शंका नाही. अशा परिस्थितीत आत्ताच पृथ्वीवरील लोकसंख्येचा -हास होवू लागला तर मंगळावर सृष्टी निर्माण करणा-यांची भविष्यातही कमतरता निर्माण होईल.

 

 

एलॉन मस्कच्या स्पेसएक्सद्वारे चंद्रांसह मंगळावरही जीवसृष्टी निर्माण करण्याचा बेत आखण्यात आला आहे. त्यासाठी स्टारशीप अर्थात इतर ग्रहांवरच्या स्वारीचे नियोजनही सध्या सुरु आहे. यामध्ये कोण्या तज्ञ अंतराळवीरांना नव्हे तर सामान्यांना ही सफर घडवली जाणार आहे, याच माध्यमातून पृथ्वी वगळता इतर ग्रहांवर सृष्टी कशी निर्माण केली जाईल याचाही विचार केला जाणार आहे.

मात्र या सगळ्यासाठी आधी पृथ्वीवरील लोकसंख्या पुरेशी असणं गरजेचं आहे असं एलॉन मस्कचं म्हणणं आहे.

गेल्या वर्षापासून कोरोनाच्या वादळात अनेकांनी आपला जीव गमावला, यामध्ये तरुणांची संख्या मोठी होती. याव्यतिरिक्त इतर अनेक नैैसर्गिक आपत्तींनीही अनेक बळी घेतले, असं असताना झपाट्याने रोडावणा-या लोकसंख्येची एलॉन मस्कला काळजी वाटतीय.

 

 

यासाठी अधिक मुलं होऊ द्या, पृथ्वीला सक्षम नवी पिढी मिळू द्या असा हट्ट एलॉन मस्कने धरला आहे.

एलॉन मस्कचा उद्देश हा भविष्यासाठी, त्याच्या प्रकल्पासाठी योग्य असेलही, मात्र भारतात वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम उघड्या डोळ्यांनी पाहणारे, त्याची गंभीर फळं भोगणारे यांच्यासाठी हा सल्ला म्हणजे माकडाच्या हाती कोलीत देण्यासारखं आहे.

एकीकडे सरकार लोकसंख्या नियोजनाची ओरड करत असताना दुसरीकडे भविष्यासाठी लोकसंख्या वाढवणं म्हणजे शहाणपणा नव्हे. एलॉन मस्कच्या मताप्रमाणे भविष्याच चंद्र, मंगळ इथे जीवसृष्टी निर्माण होईल, अनेक भारतीयांना त्यात स्थान मिळेलही, मात्र त्यासाठी सध्या लोकसंख्या वाढवली तर उद्याचं उज्वल भविष्य पाहण्यापुर्वी भारताचा वर्तमानकाळ धोकादायक चित्र दाखवेल.

 

 

अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या मुलभूत सुविधांसह नोकरी, व्यवसाय संधी या आणि अशा अनेक मुलभुत गरजाही मिळवण्यासाठी आज धडपड करावी लागतीय, या सर्वांचे कारण वाढती लोकसंख्या आहे. असं असताना भविष्यातील स्वप्नांसाठी वर्तमान धोक्यात घालायचा का? हा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे.

एलॉन मस्कचा हा सल्ला आता कोणत्या देशातील किती नागरिक ऐकतात आणि त्याप्रमाणे वागतात? आणि त्याचे काय चांगले वाईट परिणाम भोगावे लागतात? याचं उत्तर येणारा काळच देईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version