Site icon InMarathi

नेहरू ते ठाकरे, राजकारण्यांचं विठुरायाशी नेमकं नातं आहे तरी काय? वाचा हे ६ किस्से

vithhal temple inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गेल्या वर्षी आषाढीच्या शासकीय महापूजेसाठी ‘मातोश्री ते पंढरपूर’ असा लांबचा पल्ला गाठणाऱ्या श्री व सौ ठाकरेंची जबरदस्त चर्चा झाली. इतकी की सोशल मिडीयावर पांडुरंगाचा गजर होत असताना त्यातही मुख्यमंत्र्यांनी स्वतःचं गाडी चालवल्यामुळे कौतुकाचे सुर अधिक ऐकू येत होते.

कोरोनाच्या नियमांकडे बोट दाखवत ड्रायव्हरलाही सुट्टी देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या म्हणण्याप्रमाणे ‘स्टिअरिंग’ आपल्याच हाती घेतलं आणि ठाकरे दाम्पत्य शासतीय पुजेसाठी विठुरायाच्या गाभार्यात पोहोचले.

 

 

यावर्षीही नियमानुसार पुन्हा मुख्यमंत्री दाम्पत्याच्याच हस्ते शासकीय महापुजा होणार असल्याने यंदा कोणता नवा ट्रेन्ड दिसणार? याबाबत सोशल मिडीया आणि नेटकऱ्यांमध्ये  चर्चा रंगू लागली आहे. मात्र विठुरायाच्या महापुजेचा मुहुर्त साधत गेल्या वर्षी केवळ ठाकऱ्यांनीच प्रसिद्धीची संधी मिळवली, किंवा शासकीय महापुजेत केवळ ठाकरेंच्याच किस्साची चर्चा रंगली होती असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग इतिहासात डोकवायलाच हवं.

सावळ्या रुपाच्या ओढीने हजारो किलोमीटर चालणारे वारकरी, वारीतील हरिनामाचा गरज आणि पंढरपुरातील कळसाचे दर्शन एवढ्यापुरताच हा सोहळा मर्यादित नाही, कारण यापलिकडे ‘वारी आणि राजकारण’ यांचं वर्षानुवर्षांचं नातं फारस कुणाला ठाऊक नाही.

 

 

यावर्षी वारीच्या परवानगीवरूनही राजकारण केल्याची ओरड असली तरी वारीतील राजकीय रंग खूप जुना आणि गडद आहे.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून नांदी

स्वातंत्र्यापुर्वी ब्रिटीशांचे राज्य असतानाही पंढरपुरच्या विठुरायाची वारी अविरत सुरु होती. एरवी भारतीयांवर निर्बंध लावणाऱ्या इंग्रज सरकारने वारीला कधीही मज्जाव केला नाही. उलट वारीसाठी २००० रुपयांच अनुदान ब्रिटींशांच्या तिजोरीतून दिले जायचे.

यावेळीही पुजेचा मान हा ब्रिटीश सरकारमधील हिंदू अधिकाऱ्यांना किंवा कलेक्टरला दिला जायचा. मात्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर हा मान मंत्र्यांच्या हाती देण्याची प्रथा सुरु झाली.

 

 

 

तत्कालीन महसूलमंत्री राजारामबापु पाटील हे विठुरायाची शासकीय महापुजा करणारे मंत्रीमंडळातील पहिले नेते ठरले. तेंव्हापासून हा मान सरकारच्या हाती सोपवण्यात आला.

वसंतदादांच्या पत्नीला विठुराया पावला

वसंतदादा पाटील यांच्या सरकारातील काही आमदार फुटल्याने सरकार पडलं आणि त्यांचं मुख्यमंत्रीपदही गेलं. त्यावेळी त्यांच्या पत्नी मंत्री शालिनीताई पाटील यांनी विठुरायाच्या गाभा-यात रुख्मिणीच्या चरणी धाव घेत वसंतदादांसाठी नवस केला.

 

 

“प्रामाणिकपणे काम करणा-या माझ्या पतीला पुन्हा पद मिळू दे, मी पाच तोळ्याचं मंगळसुत्र तुझ्या पायी वाहीन” या त्यांच्या हाकेला रखुमाईने प्रतिसाद दिला आणि पुन्हा मुख्यमंत्री झालेल्याा वसंतदादांसह शालिनीताईंनीही आपला नवस फेडला.

वसंतदादा आले आणि कर रद्द केला 

विठूमाऊलीच्या ओढीने येणाऱ्या वारकऱ्यांना पंढपुरात येताच यात्राकर द्यावा लागायचा. मुळातच रिकाम्या हाती वारकऱ्यांना या कराचा चांगलाच फटका बसायचा मात्र शासकीय महापुजेसाठी वसंतदादा पाटील पंढरपुरात आले आणि ही परिस्थिती पाहिली.

 

 

वारक-यांची ही अवस्था पाहताच आपल्या सत्तेचा वापर करत वसंतदादांनी पंढरपुरातील यात्राकर रद्द केला. इतकंच नव्हे तर आळंदी, देहू येथिल यात्राकरही त्यांनी रद्द केला.

हे ही वाचा – विठुराया! आस्तिक-नास्तिक गरीब-श्रीमंत, सर्व भेदांपलीकडचा सर्वांचा “देव”

नेहरुंमुळे मंदिराचा उंबराच बदलला

१९५३ साली माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दर्शनासाठी पंढरपुत गाठलं, मात्र गाभाऱ्यात येण्यापुर्वीच एका उंबऱ्यात अडखळून त्यांना ठेच लागली. अपशकून घडल्याच्या अनेक तक्रारी नाकारत त्यांनी दर्शन घेतलं, मात्र त्यानंतर ज्या उंबऱ्याला ते अडखळले तो उंबराच काढून टाकण्यात आला.

 

 

त्याजागी बसवलेला दगडी उंबरा आजही पाहता येतो.

पांडुरंगाने इंदिरा गांधींना उपवास घडवला

पंढरपुरात राजकीय सभेसाठी आलेल्या इंदिरा गांधीबद्दलचा हा किस्सा अनेक ठिकाणी नोंदवण्यात आला आहे. पहाटे पाच वाजता सभा आटोपल्यानंतर नास्तिक असूनही त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी नाश्ता मागवला मात्र त्यात सवयीने अंडी होती. त्यांच्याभोवती असलेल्या गोतावळ्यात अनेकांचा एकादशीनिमित्त उपवास होता.

 

 

विठ्ठलाच्या नगरीत येऊन उपवासाला अंडी खाणं इंदिरा गांधींना न पटल्याने फक्त दूधावर दिवस काढत नकळत त्यांनाही उपवास घडला.

लाल बहादूर शास्त्रीचं दर्शन हूकलं

लाल बहादूर शास्त्री दर्शन घेण्याठी पंढरपुरात दाखल झाले होते, मात्र त्यावेळी महाराष्ट्रात कॉलराची साथ बळावल्याने त्याची लस घेतल्याशिवाय कुणालाही पंढरपुरात जाण्याची परवानगी दिली गेली नव्हती. त्यामुळे लाल बहादूर शास्त्रींना दर्शन न घेता परतावे लागले असाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो.

 

 

उभ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठुरायाच्या चरणी सगळेच लीन आहेत. आषाढीचा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही भाविक पंढरपुरची वाट धरतात.

मागील वर्षापासून ही वारी कोरोनाच्या सावटाखाली होत असली तरी जगावर पसरलेलं कोरोनाचं हे संकट लवकर टळू दे हीच प्रार्थना विठुरायाच्या चरणी अर्पण करूयात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version