Site icon InMarathi

किशोर कुमारने ग्रीन सिग्नल दिला आणि ‘कुली’चं ते गाणं त्यांच्याऐवजी या गायकाने गायलं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

रफी  आणि किशोर या दोन नावांनंतर हिंदी सिनेमाचं पार्श्वगायन संपतं असा तो काळ होता आणि त्याच काळात एक नाव झपाट्यानं लोकप्रिय बनलं, शब्बीर कुमार. प्रती रफी समजला जाणारा आवाज असणारे शब्बीर कुमार ऐंशीच्या दशकात आघाडीचे गायक बनले.

अमिताभला किशोर आणि रफी दोघांनी आवाज दिला असला तरीही अमिताभला खर्‍या अर्थानं आवाज शोभला तो किशोर कुमार यांचाच.

 

 

मुकद्दर का सिकंदरमध्ये जोहराच्या कव्वालीत जेंव्हा सिकंदर व्याकूळ होऊन इसके आगे की अब दास्तान मुझसे सून म्हणतो तेंव्हा तो किशोर वाटत नाही तर हळवा सिकंदरच वाटतो.

हे ही वाचा जेव्हा ‘करोडपती’ बिग बी कुमार विश्वास यांच्याकडे केवळ “३२ रुपये” मागतात तेव्हा…!

के पग घुंगरू बांध मिरा नाची थी हे कमाल नटखट गाणं असो किंवा आज रपट जाए हे पावसातलं रोमॅंटिक गाणं, ते अमिताभच गातोय इतकं किशोरनी अमिताभच्या आवाजात गायलं आहे. तेरे जैसा यार कहां म्हणणारा हळवा विजयही किशोरनी असा काही गळ्यातून उतरवला आहे की अमिताभला पडद्यावर बघून आणि किशोर ऐकून भरून येतं.

अमिताभ त्याच्या सर्वोच्च स्थानावर असताना पडद्यावर अमिताभचा आवाज किशोर कुमारच होते. मात्र अमिताभ राजकारणात गेल्यानंतर त्याचं फिल्मी करियर काहीसं थांबलं राजकारण फारसं न जमल्यानं पुन्हा एकदा होम पिचवर आलेल्या अमिताभनं यावेळेस किशोर कुमार यांच्याबरोबरच नवे आलेले आवाजही स्विकारले.

शब्बीर कुमार आणि मुहम्मद अझिझ ही ती दोन नावं. रफीच्या जाण्यानं हिंदी सिनेसंगीतात एक पोकळी निर्माण झालेली होती. ही पोकळी अंशत: हे दोघे भरून काढत होते.

 

 

रफीचे चाहते रफीच्या आवाजाला इतके भुकेले होते की त्यांनी रफीचा भास असलेले हे दोन आवाजही स्विकारले. दोघांची करियर बहरु लागली होती.

कुली हा सिनेमा आजही अनेक कारणांनी चर्चेत आहे. अमिताभला झालेला तो अपघात त्याला आयुष्यभर पुरला आहे. अशीच एक चर्चा या सिनेमाच्या गाण्याबाबतही तेंव्हा रंगली होती.

मनमोहन देसाई हे रफीचे जबरस्त फॅन होते. कुलीच्या संगिताचं काम चालू असतानाच या चित्रपटाचे संगितकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी शब्बीर कुमारचा आवाज ऐकला होता.

शब्बीर ऑर्केस्ट्रामधून गात असतानाच लक्ष्मीकांत प्यारेलालजींनी त्याला ऐकलं आणि त्यांनी मनमोहन देसाईंच्या कानावर ही गोष्ट घातली. मनमोहनजींनी शब्बीरना स्टुडिओत बोलवून त्यांच्या वाजाची चाचणी घेतली आणि त्यांनाही हा आवाज पसंत पडला.

कुलीचा अख्खा अल्बम शब्बीरकडे आला. शब्बीरच्या करियरसाठी ही अत्यंत महत्वाची घटना होती. मनमोहन देसाई, लक्ष्मिकांत प्यारेलाल आणि पडद्यावर साक्षात अमिताभ. शब्बीरसाठी अक्षरश: सुवर्णसंधी दारी चालून आली होती.

 

 

शब्बीर कुमारचं खरं नाव आहे, शब्बीर शेख. बडोद्यात संगीतातलं करियर घडवत असतानाच रफीचा  चाहता असणार्‍या शब्बीरला तेंव्हाच्या प्रख्यात मेलडी मेकर्स या ऑर्केस्ट्रानं शोधलं. त्यानंतर तो मुंबईत आला. त्यानंतर रफीचा आवाज म्हणून त्याला अनेक कार्यक्रम मिळत गेले.

संगीतकार उषा खन्नानी त्याला तजुर्बा (१९८१) चित्रपटाद्वारे पहिल्यांदा पार्श्वगायनाची संधी दिली. हा सिनेमा फारसा चालला नाही आणि शब्बीरचं नावही पुढे आलं नाही.

कुली सिनेमातली सर्व गाणी शब्बीरला मिळालेली असली तरी एक गाणं मात्र किशोर कुमारच्या आवाजात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सिनेमाचं टायटल सॉन्ग असणारं ‘सारी दुनिया का बोझ हम उठाते है’ हे ते गाणं.

 

 

मात्र झालं असं की या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्यावेळेस किशोर कुमार फारच थकलेले होते. सतत गाऊन त्यांच्या आवाजावर परिणाम झालेला होता आणि या गाण्यात जी एनर्जी अपेक्षित होती ती येत नव्हती.

अखेर असं ठरलं की जे गाणं रेकॉर्ड झालेलं आहे ते तसंच ठेवून चित्रीकरण करून घ्यावं कारण अमिताभच्या तारखा मिळणं कठीण असायचं. केवळ गाण्यासाठी शुटींग पुढे ढकलण्यात शहाणपणा नव्हता.

त्यामुळे शुटींग पूर्ण करण्यासाठी किशोरदांच्या गाण्याचं डमी गाणं म्हणून वापर करायचा आणि नंतर पुन्हा एकदा हे गाणं रेकॉर्ड करून चित्रपटात घ्यायचं. चित्रीकरण पूर्ण झालं आणि या गाण्यासाठी पुन्हा प्रयत्न चालू झाले.

दरम्यान किशोरदा रेकॉर्डिंगमधे इतके व्यस्त झाले, की या एका गाण्यासाठी प्रयत्न करुनही त्यांना वेळ देता येईना. दोन तीनदा रेकॉर्डिंग पुढे ढकलावं लागलं, ऐनवेळेस रद्द करावं लागलं. इकडे प्रदर्शनाची तारिख जवळ येत चाललेली. मनमोहन देसाई प्रचंड तणावात आले.

 

 

अखेर त्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलालजींना सांगितलं की हे गाणंही आपण शब्बीरकडून गाऊन घेऊ. संगीतकार जोडी यानुसार शब्बीर यांच्याकडे गेली आणि त्यांना सांगितलं की जे एक गाणं किशोरदा गाणार होते तेही आता तूच गायचं आहेस.

हे ऐकल्यावर शब्बीरना आनंदच झाला मात्र त्यांनी या ऑफरला नकार दिला. किशोर कुमारसारख्या महान गायकाला पहिल्याच चित्रपटात रिप्लेस करणं त्याला मनापासून पटत नव्हतं.

हे ही वाचा “हे गाणं माझ्याऐवजी रफीकडून गाऊन घ्या” असं किशोरदांनी म्हणण्यामागची रंजक कथा!

संगीतकार जोडीनं खूप विनवण्या केल्यावर अखेर शब्बीर कुमारनी एक अट घातली की जर किशोरदा स्वत: त्याला हे सांगतील तर तो तयार आहे. त्यांनी परवानगी दिली तरच मी हे गाणं गाईन अन्यथा नाही.

अखेर या दोघांचं फोनवर संभाषण करवलं गेलं. किशोर कुमारनी त्याला सांगितलं की शब्बीर तू या चित्रपटातली सात गाणी गायलेली आहेसच. तू खूप चांगला गायला आहेस आणि हे आठवं गाणंही तू गा माझी काहीही हरकत नाही.

 

 

हे ऐकल्यावर आणि किशोर कुमारकडून हिरवा सिग्नल मिळाल्यावर शब्बीरनी गाणं गायलं मात्र त्यांना कायम ही खंतही राहिली की पडद्यावर किशोर कुमार या नावासोबत आपलं नाव झळकलं असतं ती सोन्यासारखी संधी हुकली.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version