Site icon InMarathi

“मुख्यमंत्र्यांनी कामं करायची, की ‘आमचं मनोरंजन’?” जनता करतेय सवाल!

uddhav thackeray swabal inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

महाविकास आघाडीमधील मतभेद नवे नाहीत. सध्या या मतभेदांमध्ये स्वबळाची चर्चा होताना दिसतेय. यावरून सध्या २ गोष्टी फारच चर्चेत आहेत. शरद पवार यांनी पटोलेंना स्पष्ट विचारणा केल्याचं दिसतंय. ‘तुम्ही स्वबळावर लढणार असाल, तर तसं आधीच सांगा, म्हणजे आम्ही सुद्धा तयारी करतो’ हे शरद पवारांचं वक्तव्य महत्त्वपूर्ण ठरतंय.

मात्र याहून अधिक चर्चा आहे, ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाना यांना लागवलेल्या टोल्याची.

 

 

काल व्यासपीठावरूनच त्यांच्या नेहमीच्या मिश्किल शैलीत मुख्यमंत्र्यांनी नाना पटोलेंना टोला लगावला. “थोरात साहेब, तुम्ही बिनधास्त जेवायला बोलवा, आम्ही ‘स्वबळावर’ जेवायला येऊ” अशी प्रतिक्रिया देत नाना यांना उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिल्याचं म्हटलं जातंय.

मुख्यमंत्री महोदयांचं हे वाक्य काही जनतेला फारसं रुचलेलं दिसत नाही. इतक्या महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने असे बाष्कळ विनोद करू नयेत, अशी जनतेची अपेक्षा आहे. विनोद निर्मितीच्या प्रयत्नात ते स्वतःचंच हसं तर करून घेत नाहीत ना, असाही प्रश्न जनता विचारतेय.

अशी घटना पहिल्यांदा घडलेली नसून याआधी सुद्धा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असे विनोद करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केलेला आहे. त्याही वेळी त्यांना ट्रोल करण्यात आलंय, हे वेगळं सांगायची गरज नाहीच. नेमके काय काय किस्से घडलेत, त्यांची जरा उजळणी करूयात, नाही का?

 

 

पावसावरील निबंध

सगळ्यात पहिल्यांदा तर थेट मागच्या वर्षीच्या पावसाळ्याची आठवण लोकांना झाली आहे. नुकतीच अनलॉकची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली होती, आणि त्याविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी लाईव्हच्या माध्यमातून आजूबाजूच्या परिस्थितीचं वर्णन केलं होतं.

पावसाळा आला, की सगळीकडे हिरवळ असते, झाडांना नवीन अंकुर फुटतात असं निसर्गाचं वर्णन मुख्यमंत्री महोदयांनी सुरु केलं, आणि पावसाळी निबंध नकोय असं म्हणत जनतेने ट्रोलिंगच्या माध्यमातून तोंडसुख घेतलं.

 

 

काळी जादू

मध्यंतरी म्युकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी या रोगाने जोर धरला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन गेलेल्या लोकांच्या मागे हे शुक्लकाष्ठ लागत होतं. याविषयी बोलताना सुद्धा, शब्दांची कोटी करण्याचा मोह उद्धव ठाकरेंना आवरला नाही, आणि एक नवं साधन जनतेच्या हाती पडलं.

 

 

काळी जादू, काळी विद्या हे ऐकलं होतं पण आता काळी बुरशी सुद्धा आली आहे, असं म्हणत त्यांनी केलेलं वक्तव्य ट्रोलिंगचा विषय ठरलं नसतं तरच नवल.

ब्लॅक बेल्ट

काळ्या रंगाबद्दल सुद्धा ते एकदाच बोलले होते असं नाही. या काळ्या रंगाच्या बेल्टचं त्यांनी दिलेलं उदाहरण सुद्धा तुम्हाला आठवत असेल. मुलं स्वसंरक्षणासाठी ज्युडो कराटे शिकतात, त्यात प्राविण्य मिळालं की ब्लॅक बेल्ट मिळतो. तोच ब्लॅक बेल्ट आता सेल्फ डिफेन्सच्या मोहिमेमध्ये तोंडावर लावायचा आहे, म्हणजेच आपल्याला मास्क लावायचा आहे.

 

 

मुख्यमंत्र्यांनी ब्लॅक बेल्ट आणि मास्कची केलेली तुलना काही सामन्यांना रुचली नाही, आणि पुन्हा एकदा हा मुद्दा सोशल मीडियाने ट्रोलिंगसाठी उचलून धरला.

मेरी आवाज आप तक आ रही हैं

मुख्यमंत्री महोदयांचा हा संवाद आपल्याला आठवतच असेल. उद्धव ठाकरे बऱ्याचदा लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतात, हे काही आता आपल्यासाठी नवीन नाही. ‘घरात बसून राहणारा मुख्यमंत्री’ अशी टीका तर त्यांच्यावर होतंच होती. मात्र त्यांच्या या संवादातून नेटकऱ्यांनी सुद्धा त्यांना फारच धारेवर धरलं.

“अरे भाइयों और बेहेनों, मेरी आवाज आप तक आ रही हैं, लेकिन तुम्हारी आवाज नहीं आ रही” असं ते ‘लाईव्ह’वर म्हणाले आणि ट्रोलिंगच्या दुनियेत एकच हलकल्लोळ माजला.

 

 

शेतकऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’

कोरोनाच्या संकटामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना अनेक ठिकाणी राबवण्यात आली. पण, ‘सगळ्यांनाच घरून काम करणं शक्य आहे का?’ या प्रश्नाचं उत्तर एखादा लहान मुलगा सुद्धा नाही असंच देईल.

मुख्यमंत्र्यांनी मात्र, “शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात ‘वर्क फ्रॉम होम’ करता येईल का” असं वाक्य उच्चारलं, आणि ते पुढे तुफान चर्चेत आलं. खरंतर, ठिबक सिंचनासारख्या गोष्टींचा वापर, तंत्रज्ञानाचा वापर याविषयी त्यांनी नंतर मतं मांडली. असं असूनही, नेटकऱ्यांनी मात्र ते एकच वाक्य उचलून धरलं.

 

 

ये कोरोना कोरोना क्या हैं

कोरोनाचा कहर काहीसा कमी होऊ लागल्यावर लोकांच्या मनातील गांभीर्य आणि भीती कमी झाली. जणू काही कोरोनाचा धोका उरलाच नाही असं लोक वागू लागले. त्यामुळे मग पुन्हा एकदा कोविडचा प्रादुर्भाव वाढला आणि जनतेचे कान धरण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली.

 

 

लोक कसे वागतायत, तर लोकांना असं वाटू लागलंय, ‘ये कोरोना कोरोना क्या हैं, क्या हैं ये कोरोना’ असं त्यांना म्हणायचं होतं खरं; पण ‘ये तेजा तेजा क्या हैं’ या संवादाशी साधर्म्य साधणारं हे वाक्य सुद्धा लोकांनी उचलून धरलं, ते मात्र त्यांना ट्रोल करण्यासाठी!

‘किंबहुना’,  इतरही काही संवाद…

मुख्यमंत्री अगदी नेहमीच वापरात असलेला किंबहुना हा शब्द तर ट्रोलर्सच्या रडारवर नेहमीच होता, आहे आणि कदाचित कायमच राहील. एका लाईव्ह दरम्यान कितीवेळा किंबहुना या शब्दाचा उच्चार होतोय इथपासून ट्रोलिंगला सुरुवात झाली, ती आजवर सुरूच आहे.

“कधी कधी रुग्णांना कळतच नाही, की डॉक्टर आलेत की आणखी कुणी. अंतराळवीरांसारखे कपडे त्यांनी घातलेले असतात.” असं पीपीई किटचं वर्णन मुख्यमंत्री करत असतील, तर मग ‘चुकीला माफी नाही’ असं लोक तर म्हणणारच ना…

 

 

“आपण क्रिकेटमध्ये जसाचा थ्रो करतो, तसा जर कुणी कोरोना पॉझिटिव्ह असेल, तर त्याच्या श्वासोच्छवासासह त्याचा थ्रो वाढतो”, “आपण त्याला गुणाकार करू देणार नाहीच, आपणच त्या विषाणूची वजाबाकी करू” ही वाक्य सुद्धा ट्रोलिंगमधून सुटली नाहीत.

अशीच काही भन्नाट वाक्य ऐकायची असतील, तर हा व्हिडिओ नक्कीच बघायला हवा.

 

 

जनतेने मुख्यमंत्र्यांची आणि त्या पदाची खिल्ली उडवावी का? हा प्रश्न पडतोच, मात्र त्या पदावर विराजमान असणाऱ्या व्यक्तीकडून सुद्धा त्या पदाची किंमत केली जाते का? हे असे बाष्कळ विनोद, शाब्दिक कोट्या करणं त्या पदाला साजेसं आहे का? असे प्रश्न जनताही विचारते. लोक ट्रॉल करतात, पण टाळी एका हाताने वाजत नाही हेही खरंय, नाही का…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version