Site icon InMarathi

फाशीनंतरही दोन तास जिवंत राहिलेल्या खतरनाक गुन्हेगाराची स्टोरी…

ranga billa inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय गुन्हे इतिहासात नोंदवलेलं नाव म्हणजे रंगा-बिला जोडी. या दोघांची फाशी हा देशातला गाजलेला खटला होता. भारतीय नेवी अधिकार्‍याच्या मुलांच्या अपहरण आणि खुनाच्या गुन्ह्त अटक झालेल्या या जोडगोळीनं दहशत माजवली होती.

सत्तरच्या दशकात वृत्तपत्रांतून, बातम्यातून प्रसिद्ध झालेली रंगा-बिल्ला हॊ जोडगोळी थरकाप उडविणारे गुन्हे करत होती. साठच्या दशकात भुरट्या चोर्‍या करत गुन्हेगारी क्षेत्रात दाखल झालेली ही जोडगोळी पुढच्या अवघ्या दहा वर्षांत देशातील कुख्यात गुन्हेगार बनले होते.

पोलिस यंत्रणेच्या डोक्याची उडती शीर बनलेली ही नावं पोलिसांनी सापळे रचूनही सतत हातून सुटत होती आणि नवनविन गुन्हे करत सुटली होती.

कुलजिंत सिंग (रंगा) आणि जसबिर सिंह (बिल्ला) अशी नावं असणारे हे गुन्हेगार अपहरण, खंडण्या यात सरावले होते.

 

 

एव्हाना त्यांच्या गुन्ह्यांच्या चर्चा देशाच्या सीमा पार करून विदेशातही रंगू लागल्या होत्या. या बातम्यांनी अधिकच चेकाळत आणि पोलिसांना हूल देण्याची नशा चढलेले हे दोघे अक्षरश: पोलिसांसाठी बदनामी करणारे बनले होते. मात्र १९७८ ला त्यांनी असा एक गुन्हा अजाणता केला की देशाच्या मुख्यमंत्र्यांना यात लक्ष घालावं लागलं आणि पोलिस यंत्रणेला अहोरात्र काम करत या जोडीच्या मुसक्या आवळाव्याच लागल्या.

असा कोणता गुन्हा त्यांनी केला की तो त्यांच्या आयुष्याचा अखेरचा गुन्हा ठरला?

२६ ऑगस्ट १९७८ ची संध्याकाळ! सव्वासहाच्या सुमारास गीता (१६) आणि संजय (१४) चोप्रा ही भावंडं आकाशवाणीच्या युवावाणी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली. धौला कुआं या परिसरातील ऑफिसर्स एनक्लेव्ह मधे वास्तव्यास असणार्‍या भारतीय नौदल अधिकारी मदनमोहन चोप्रा यांची ही मुलं!

रात्री कार्यक्रम संपल्यावर नऊ वाजता वडील त्यांना घ्यायला आकाशवाणी केंद्रावर जाणार होते. मुलांचा कार्यक्रम ऐकायला म्हणून रात्री आठ वाजता रेडिओ लावल्यावर गीताऐवजी दुसरीच मुलगी सहभागी झाल्याचं त्यांना लक्षात आलं. सुरवातीला आपण चुकीचं रेडिओ केंद्र लावलं असं त्यांना वाटलं. नंतर काहीतरी ऐनवेळचा कार्यक्रमातला बदल असेल आणि मुलांचा कार्यक्रम रहित झाला असेल म्हणून त्यांनी दूर्लक्ष केलं आणि वडील मुलांना घ्यायला रेडिओ केंद्रावर गेले.

ठरलेल्या जागी मुलं उभी नसल्यानं आधी त्यांनी इकडे तिकडे शोधलं मात्र नंतर ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली असता त्यांना कळलं की ठरलेला कार्यक्रम रद्दही झालेला नव्हता आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुलं केंद्रावर पोहचलीच नव्हती.

चुकामूक होऊन मुलं घरी पोहोचलीत का? हे विचारायला घरी फोन केला असता मुलांच्या आईनं नकार दिला. आता मात्र काहीतरी गंभीर घडलेलं असावं अशी शंकेची पाल चुकचुकली आणि मुलांचा शोध घेणं सुरू झालं.

 

 

सव्वा सहा वाजता घरातून बाहेर पडल्यावर असं काय घडलं होतं की दिल्लीसारख्या शहरातून भारतीय नौदल अधिकार्‍याची मुलं गायब झाली?

काय घडलं त्या दोन तासांत?

एखाद्या थरारपटात शोभावा असा घटनाक्रम घडल्याचं नंतरच्या तपासणीत आढळून आलं. अगदी चित्रपटात शोभावा असा पोलिसी ढिला कारभारही यात घडला. मात्र याची जबर किंमत चोप्रा कुटुंबाला भोगावी लागली.

घरातू बाहेर पडल्यावर पावसाची भुरभुर सुरु झाल्याने मुलांनी लिफ्ट मागितली. महेंद्रसिंग नावाच्या या व्यक्तीनं त्यांना जवळच असणार्‍या धौला कुआंपर्यंत लिफ्ट दिली. नंतर काय घडलं काही कल्पना नाही मात्र नंतर जेंव्हा या गुन्ह्याचा तपास सुरू झाला तेंव्हा रस्त्यावरच्या चारपाच प्रत्यक्षदर्शीनी एका फियाट कंपनीच्या कारमधे एक मुलगी ड्रायव्हरशी झटापट करताना पाहिली होती.

 

 

बाबूलाल नावाच्या व्यक्तीनं सायकलवरून उडी मारून कारच हॅण्डल पकडून दार उघडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, त्यानं ताबडतोब पोलिस कंट्रोल रूमला याची कल्पना दिली आणि कारचा नंबरही दिला, हा नंबर होता HRK ८९३० मात्र दुर्दैव हे की त्यावेळेस ड्युटीवर असणार्‍या ऑपरेटरनं हा नंबर MRK 8930 असा चुकीचा नोंदवून घेतला.

पुढे इंद्रजीत सिंग नावाच्या एका व्यक्तीला कारमधील जखमी मुलगा मुक्याने विनवणी करून सांगत होता की तो संकटात आहे. या जबाबदार व्यक्तीनं, संशय आल्यानं आपल्या स्कुटरवरून या कारचा पाठलागही केला मात्र सिग्नलवर या कारनं त्याला हुलकावणी दिली.

त्या व्यक्तीनं या कारचा नंबर अचूक टिपून घेत दक्ष नागरिकासारखा पोलिसांना दिला. येथे आपल्या हद्दीत घटना घडली नाही असं म्हणून पोलिसांची ढिलाईही दिसली.

नंतर एका कारमधून दोन जखमी व्यक्तींनी विलिंग्डन हॉस्पिटलमध्ये जात आपल्याला भुरट्या चोरांकडून झालेल्या मारहाणीत एकाच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याचं सांगितलं. ऑन ड्युटी कॉन्स्टेबल रणबीर सिंग यानं त्यांना घेऊन घटनास्थळाला भेट दिली असता या दोघांनी सांगितलेल्या लुटमारीचे कोणतेच पुरावे त्यांना सापडले नाहीत. डॉक्टरांच्या परवानगी शिवायच या दोघांनी हॉस्पिटल सोडलं.

पोलिसांनी त्यांना सकाळी परत येऊन वर्दी द्यायला बजावलं होतं मात्र हे दोघे गेले ते परत आलेच नाहीत. त्यांच्या कारबाबत आरटीओमध्ये चौकशी केली असता हा नंबर एका स्कुटरचा असल्याचं आढळलं. आता मात्र दिसतंय तितकं साधं प्रकरण नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं होतं आणि नेमकं काय घडलं असावं या दिशेनं तपास फ़िरू लागला.

 

हे ही वाचा – या कारणामुळे फाशी देण्याआधी गुन्हेगाराला शेवटची इच्छा विचारली जाते!

इकडे बेपत्ता मुलांचा शोधही सुरू होता मात्र हाती काहीच लागत नव्हतं. ज्या विलिंग्डन हॉस्पिटलमधे रंगा-बिल्ला गेले होते तिथेही वडिलांनी अपघाती नोंद आहे का? याचा तपास केला मात्र हाती काहीच लागलं नव्हतं.

अखेर मुलं बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांनी एका गुराख्याला दोन अज्ञात मृतदेह आढळले. पोलिसांना खबर लागताच पालकांकडून मृतदेहांची ओळख पटविण्यात आली. वडिलांनी प्रेसमधे जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना घडलेल्या घटनेबाबत वार्तांकन करायला संगितलं कारण गुन्हेगार अजूनही मोकाट फ़िरत होते. यानंतर तपासाला थोडा वेग आला.

१ ऑगस्ट रोजी मजलिस पार्क येथे वर्णन केलेल्या वाहनाशी मिळती जुळती कार सापडली, तपासा अंती लक्षात आलं की नंबर प्लेटसहित सगळं नकली होतं आणि कार चोरली होती.

वृत्तपत्रात बातमी आल्यानंतर एम एस नंदा आपणहून पोलिसस्थानकात आले आणि त्यांनी या दोन मुलांना घटना घडली त्या दिवशी लिफ्ट दिल्याचं सांगून ओळख पटवली.

या घटनेला मिडियानं लावून धरलं आणि पंतप्रधान कार्यालयाला या घटनेची दखल घ्यावी लागली. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी या लक्ष घालत तपास काम वेगानं आणि अधिक सजगतेनं करत वाट्टेल ते झालं तरी आरोपींना पकडण्याचे सक्त आदेश दिले.

 

 

या घटनेनंतर दोन महिन्यांनी काल्का एक्सप्रेसमधल्या सैनिकांच्या राखीव बोगीत दोन व्यक्ती आल्या. एका सैनिकाला यांना कुठेतरी पाहिल्याचा संशय येऊ लागला. पेपरमधल्या बातमीतला यांचा फोटो आणि ज्या गुन्ह्यासाठी त्यांचा तपास चालू होता ते सगळं त्याला आठवलं आणि या दोघांच्या मुसक्या बांधल्या गेल्या. सीमेचं रक्षण करणार्‍या सैनिकांनीच अखेर दहशत माजविणार्‍या या गुन्हेगारांनाही पकडलं.

या दोघांवर खटला चालवला गेला आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. हायकोर्टातली यांची याचिका फेटाळून लावत फाशी निश्चित झाली.

मात्र प्रत्यक्ष फाशीच्या दिवशी घडलेला प्रकार आणखीनच विपरित होता. फाशीनंतर दोन तासांनी यांचा मृत्यू झाल्याची खातरजमा करण्यासाठी अधिकारी फाशीच्या खोली गेले असता त्यांना धक्का बसला कारण रंगाला फाशी झालीच नव्हती. तो जिवंत होता.

 

 

केवळ पलायनातच नव्हे तर फाशीतही पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न रंगाने केला, फाशी देताना चलाखपणे त्यातून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र इथे नियतीने आपली खेळी खेळली होती. लहानग्यांचा अनानुष खून करणा-या रंगाला आपल्या कर्माचे भोग भोगावे लागलेच. ज्या पद्धतीने रंगाच्या हातून त्या दोन लहान मुलांनी आपला जीव गमावला, त्यावेळी त्यांना झालेल्या यातना, जीवाची झालेली तडफड हे सारं काही रंगाला एकदा नव्हे तर दोनदा सोसावं लागलं.

पहिल्या फाशीचा प्रयत्न फसल्याने पुन्हा एकदा फाशीचा फास आवळला गेला आणि कायद्यानं त्याला त्याची शिक्षा पूर्ण करायला लावली.

 

हे ही वाचा – महाराष्ट्राला हादरवून सोडणारा हा खटला आजही अनेकांची झोप उडवतो!

गीतावर आधी बलात्कार केल्याचं त्यांनी सांगितलं होतं मात्र नंतर हा कबुलीजबाब त्यांनी मागे घेत केवळ अपहरण केल्याचं सांगितलं. खंडणीसाठी अपहरण करताना त्यांना आपण नौदल अधिकार्‍याची मुलं उचलली आहेत याची कल्पनाच नव्हती आणि ते कळल्यावर त्यांचं धाबं दणाणलं होतं. या भितीतूनच पुढे त्यांनी या मुलांना मारून टाकण्याचा निर्णय घेतला.

हा खटला केवळ भारतातच नाही तर देशाबाहेरही गाजला. गीता आणि संजय यांच्या नावानं भारत सरकारनं बालशौर्य पुरस्कार देण्यास सुरवात केली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version