Site icon InMarathi

क्रिकेटविश्वातला ‘काळा दिवस’ : जेव्हा क्रिकेट ‘हरलं’ आणि टीव्ही चॅनल्स ‘जिंकली’!

1992 world cup featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

क्रिकेट सामन्यात कोणत्याही कारणाने व्यत्यय आला की ‘डकवर्थ लुईस’ यांनी क्रिकेटसाठी तयार करून दिलेला नियम लावून सामना हा निकाली काढला जातो हे आपण सर्वांनाच माहीत आहे.

‘डकवर्थ लुईस’ यांचा ‘रेन रुल’ फॉर्म्युला कसा काम करतो? कोणत्या संघाला विजयाच्या जवळ नेईल आणि कोणत्या संघाला विजयापासून दूर ठेवेल? याचा मात्र कोणीही अंदाज लावू शकत नाही.

 

हे ही वाचा डकवर्थ लुईस नियम आणि त्याचा क्रिकेटमध्ये कसा उपयोग केला जातो याबाबत तुम्हाला नक्कीच ठाऊक नसणार

आपली टीम जिंकली, की आपल्याला तो नियम योग्य वाटतो आणि आपली टीम हरली की खराब असा हा काहीसा हा नियम आहे. ‘डकवर्थ लुईस’ यांचा नियम हा फक्त नावानेच माहीत आहे असं सर्व क्रिकेट खेळाडू आणि समालोचक सुद्धा सांगतात.

‘डकवर्थ लुईस’ यांच्या नियमावर बेतलेला ‘रेन रुल’ हा १९९२ च्या क्रिकेटच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक चर्चेत आला होता. २२ मार्च १९९२ रोजी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या वर्ल्डकप सेमीफायनल मॅच सिडनी येथे खेळली गेली होती.

पावसाने व्यत्यय आणलेल्या या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या १ बॉलमध्ये २२ रन्स असं आव्हान मिळालं होतं. हा सामना इंग्लंडने जिंकला होता. पण, स्टेडियममधील आणि टीव्हीवर ही मॅच बघणारा प्रत्येक व्यक्ती त्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाच्या नशिबासाठी हळहळ व्यक्त करत होता.

 

 

क्रिकेट विश्वातील सर्वात दुर्दैवी समजला जाणारा हा सामना कसा झाला होता? ‘रेन रुल’ ने कसं दक्षिण आफ्रिकेला विश्वचषकापासून दूर ठेवलं? जाणून घेऊयात.

उपांत्य फेरीचा सामना :

दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार केप्लर वेसल्सने नाणेफेक जिंकल्यावर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. उपांत्य किंवा अंतिम सामन्यात कोणताही संघ हा नाणेफेक जिंकल्यावर धावांचा पाठलाग करतांना येणारं दडपण टाळण्याकरता प्रथम फलंदाजी करणं पसंत करत असतो.

पण, दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या आधी झालेल्या ३ यशस्वी पाठलागमुळे नाणेफेक जिंकून पहिली बॉलिंग घेतली असं स्पष्टीकरण कर्णधार केप्लर वेसल्सने दिलं होतं.

 

 

काही अंशी हा निर्णय दक्षिण आफ्रिका संघाला १९९२ वर्ल्डकपच्या बाहेर घेऊन जाणारा ठरला असं म्हणता येईल. प्रतिभावान खेळाडू असूनही आजवर एकही विश्वचषक न जिंकू शकलेल्या दक्षिण आफ्रिका संघ आणि क्रिकेटचे चाहते ही मॅच कधीच विसरणार नाहीत हे नक्की.

सामन्याच्या सुरुवातीलाच पावसाने नमन लावल्याने हा सामना ४५ ओव्हरचा करण्यात आला होता. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत २५२ धवांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवलं होतं.

डोनाल्ड आणि मेरिक प्रिंगल यांच्या भेदक गोलंदाजीने इंग्लंड संघाच्या प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या होत्या. २५३ धावांचा पाठलाग करतांना दक्षिण आफ्रिकेच्या टीमने साजेशी सुरुवात केली होती.

अँड्र्यू हडसन आणि जॉण्टी ऱ्होड्स यांनी ४६ आणि ४३ रन्सचं योगदान देऊन टीमला चांगली सुरुवात करून दिली होती. दक्षिण आफ्रिकेच्या ठराविक अंतराने विकेट्स पडत होत्या. पण, त्यांनी रन्सचा ओघ सुद्धा अपेक्षित गतीने सुरू ठेवला होता. सामना बघणाऱ्या प्रत्येकाला या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड वाटत होतं.

‘चोकर्स’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात मात्र कोणतंही दडपण घेतल्यासारखं वाटत नव्हतं. दक्षिण आफ्रिका पहिल्यांदा १९९२ च्या विश्वचषकच्या अंतिम फेरीत पोहोचणार अशी आशा त्यांच्या देशवासियांमध्ये निर्माण झाली होती.

 

 

४३ व्या ओवरमध्ये जेव्हा दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १३ बॉल मध्ये २६ धवांची गरज होती तेव्हा इंग्लंडच्या प्रेक्षकांनी विजयाची आशा सोडून दिली होती. पण, दक्षिण आफ्रिका हा सामना जिंकेल हे नियतीला मंजूर नव्हतं.

दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून सहज हा सामना जिंकण्याच्या परिस्थितीत असतांना अचानक पावसाला सुरुवात झाली. आधीच पावसाने उशीर झालेल्या या सामन्यात अजून १२ मिनिटं पाऊस झाला आणि सामना निर्धारित वेळेच्या पुढे जाणार होता.

पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात याची परवानगी नसते. विश्वचषक सामन्यात तर नाहीच. पाऊस थांबला आणि काही वेळात आतापर्यंत झालेल्या मॅचचा पूर्ण डेटा ‘डकवर्थ लुईस’ च्या फॉर्म्युलाला देण्यात आला.

हे ही वाचा क्रिकेटमधील हे ११ जबरदस्त रेकॉर्डस् तोडणं केवळ अशक्य मानलं जातं!

प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने दिलेलं आव्हान, प्रतिस्पर्धी संघाच्या पडलेल्या विकेट्स, शिल्लक असलेली वेळ, चेंडू ही सर्व माहिती दिल्यावर ‘डकवर्थ लुईस’चा प्रोग्राम हा दुसऱ्या वेळी फलंदाजी करणाऱ्या संघाला सुधारित आव्हान देत असतो.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचा या पद्धतीवर इतका विश्वास का आहे? हा एक संशोधनाचा विषय आहे.

पावसामुळे पिचवर टाकलेले कव्हर थोड्या वेळात काढण्यात आले. ओल्या झालेल्या ‘आऊट फिल्ड’ वरून ‘ड्रायर’ फिरवण्यात आले. स्टेडियम मध्ये बसलेल्या लोकांनी आपल्या छत्र्या बंद केल्या आणि सर्वांची नजर ही मोठ्या स्क्रीन कडे होती.

एखादा बॉम्ब येऊन पडावा तसं स्क्रीनवर दक्षिण आफ्रिकेला १ बॉल मध्ये २२ रन्स हे सुधारीत आव्हान देण्यात आलं. पूर्ण स्टेडियम मध्ये “ओह…” असा आवाज घुमू लागला. इतक्या वेळ दक्षिण आफ्रिकेच्या खेळासाठी टाळ्या वाजवणारे हात आता लोक डोक्याला लावून बसले होते. हे असं कसं शक्य आहे?

 

 

पण, कोणालाही हा नियम बदलणं शक्य नव्हतं. जे घडतंय ते चुकीचं घडत आहे हे सर्वांना माहिती होतं. पण, कोणीही काहीच करू शकत नव्हतं. ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या या सामन्यात प्रेक्षक सुद्धा ‘शांत’ होते असं म्हणावं लागेल.

दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज मॅकमिलन आणि रिचर्ड्सन मैदानावर उतरले. इंग्लंडच्या खेळाडूंना आता विजयाची खात्री झाली होती. केवळ एक औपचारिकता म्हणून हा एक चेंडू टाकला जाईल हे एव्हाना सर्वांच्या लक्षात आलं होतं.

बॉलिंग करतांना निर्धारित वेळेत ४५ षटक न पूर्ण करण्याचा फटका सुद्धा दक्षिण आफ्रिकेला बसला होता असं सुद्धा क्रिकेट समालोचक सांगत होते.

तो १ चेंडू टाकण्यात आला. लढवय्या दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजाने १ रन पळून काढला आणि स्कोर २३२ पर्यंत नेऊन ठेवला. विजयश्री इंग्लंडकडे गेली होती. दक्षिण आफ्रिकेने हा सामना २० धावांनी गमावला होता.

विश्वचषकाच्या अंतिम फेरीच्या इतक्या जवळ येऊन त्यांचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न धुळीस मिळालं होतं.

 

सामन्याचे पडसाद :

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ हा कोणत्याही स्पर्धेच्या उपांत्य किंवा अंतिम फेरीत का हारतो, ‘चोक’ होतो? याचं उत्तर या सामन्यात दडलं आहे.

या सामन्याला २९ वर्ष उलटून गेले तरीही दक्षिण आफ्रिका त्यानंतर एकदाही विश्वचषकाच्या अंतिम स्पर्धेपर्यंत पोहोचू शकली नाहीये. त्यामुळे हा सामना दक्षिण आफ्रिका आणि क्रिकेट जगतासाठी कायमच महत्वाचा मानला जातो.

उपांत्य फेरीत नशिबाने जिंकणारा इंग्लंडला अंतिम सामन्यात पाकिस्तान कडून पराभव पत्करावा लागला होता. दक्षिण आफ्रिका ही १९९२ च्या विश्वषकाचे प्रबळ दावेदार असूनही विश्वचषकाने त्यावर्षी त्यांना हुलकावणी दिली होती.

या सामन्यानंतर क्रिकेटचे ७ वर्ल्डकप झाले आहेत. त्यापैकी केवळ २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिका उपांत्यपूर्व फेरीत श्रीलंका विरुद्ध जिंकू शकली यातूनच त्यांच्यावर येणारं दडपण लक्षात येऊ शकतं.

 

 

१० मिनिटं उशिरा सुरू झालेल्या आणि १२ मिनिटं मध्ये व्यत्यय आलेल्या या मॅचने दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघावर एक डाग लावला हे त्यांचं आणि क्रिकेटचं दुर्दैव म्हणावं लागेल.

देशांतर्गत वादामुळे या आधी २२ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून लांब राहिलेल्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ आणि देशासाठी हा सामना खूप नुकसान करणारा ठरला.

असं का घडलं ?

दक्षिण आफ्रिका संघासोबत असं का घडलं यावर कित्येक वर्ष चर्चा होत राहिली. ‘अपेथाईड लॉ’ म्हणजेच रंगभेद कायदा रद्द करण्याच्या अटीवर त्यांना विश्वचषकामध्ये खेळण्यासाठी परवानगी मिळाली होती.

विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून त्यांनी आपली चांगलं क्रिकेट खेळण्याची पात्रता जगाला दाखवून दिली होती. उपांत्य फेरीच्या सामन्या आधी रंगभेद कायदा रद्द करण्यात आला होता. देशाचा पुनर्जन्म झाला होता.

 

 

क्रिकेट संघाला आपल्या देशाला विश्वचषकाची भेट द्यायची होती. पण, ‘रेन रुल’ म्हणजेच पाऊस आला तर पहिल्या फलंदाजी करणाऱ्या संघाच्या कमी रन्स केलेल्या ओव्हर ग्राह्य धरल्या जाणार नाहीत या नियमाने त्यांचा घात केला होता.

हा नियम आमलात यावा आणि मॅच ही ठराविक वेळातच संपावी हा नियम प्रसार माध्यमांनी तत्कालीन क्रिकेट बोर्डला सुचवला होता असं सांगण्यात येतं.

१९९२ च्या वर्ल्डकप नंतर पुढच्या १९९६ वर्ल्डकप मध्ये मर्यादित वेळचा हा नियम रद्द करण्यात आला. टीव्ही चॅनल्स ठराविक वेळेतच क्रिकेट मॅच प्रसारण करण्याच्या मक्तेदारीमुळे हा नियम त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कमिटीने मान्य केला होता.

पुढील काही वर्षात क्रिकेटला कोणत्याही मीडिया कंपनीच्या नियमांची भीती बाळगण्याची गरज नव्हती इतकं क्रिकेट लोकप्रिय झालं होतं. २२ मार्च १९९२ रोजी फक्त दक्षिण आफ्रिका नाही तर क्रिकेट हरलं होतं!

 

===

हे ही वाचा या बस ड्रायव्हरमुळे गांगुलीने लॉर्ड्सच्या मैदानावर टि-शर्ट काढला होता

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version