Site icon InMarathi

“हे गाणं माझ्याऐवजी रफीकडून गाऊन घ्या” असं किशोरदांनी म्हणण्यामागची रंजक कथा!

kishore n kaka inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

फक्त रीमिक्स, रिमेक किंवा कवर व्हर्जन ऐकणाऱ्या पिढीला खरं चित्रपट संगीत कितपत ठाऊक असेल हे सांगता येणं जरा कठीणच आहे. कारण चित्रपटांप्रमाणे त्यातल्या गाण्यांचा दर्जासुद्धा घसरलेला आहे हे आपल्याला जाणवेल.

वादकांच्या मोठ्या ताफ्यासह येऊन रेकॉर्ड करणारे गायक आणि संगीतकार आता नाहीत. आता जो तो फक्त आपल्यापूरता वेळ काढून आपल्याला जमेल त्या वेळेला येऊन रेकॉर्डिंग करून जातो आणि नंतर ते तंत्रज्ञानाच्या मदतीने जोडलं जातं.

इतकी कृत्रिमता आल्यावर नक्कीच याचा कलाकृतिवर उलट परिणामच होणार, सध्याच्या पिढीतले रेहमान, अमित त्रिवेदि, शंकर-एहसान-लॉय हे असे एक्का दुक्का संगीतकार सोडले तर बाकी सगळ्यांनीच संगीताची आराधना करणं सोडून त्याचा बिझनेस करायला सुरुवात केली आहे.

 

हे ही वाचा ‘ब्रेथलेस’ गाण्याचा इतिहास: ‘शंकर-एहसान-लॉय’ हे त्रिकुट नेमकं कसं जुळलं?

६० किंवा ७० च्या दशकात सिनेसृष्टिकडे ज्या आदराने बघितलं जायचं तो आदर आता फार कमी पाहायला मिळतो. खासकरून त्या काळात घडलेले संगीतकार, गायक पुन्हा होणे नाही हे त्रिभुवनातलं सत्य आहे. कारण या मंडळींनी कधीच त्याकडे बिझनेस म्हणून बघितलं नाही.

किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश, मन्ना डे, तलत महमुद, लतादी आशाताई यांचीच गाणी गाऊन कित्येक पिढ्या मोठ्या झाल्या आहेत अगदी आत्ताची पिढीदेखील.

 

 

तसेच पंचमदा, एस.डी,बर्मन, मदन मोहन, ऑपी नय्यर, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल अशा अवलिया संगीतकरांनी तर स्वतःचं आयुष्यच या इंडस्ट्रीसाठी उत्तमोत्तम चाली देण्यासाठी खर्ची केलं.

यांच्यातसुद्धा बरीच स्पर्धा होती, त्यांच्यातही कित्येकदा खटके उडले, त्यांच्यातल्या बऱ्याच लोकांना डावललं जायचं पण त्यांनी कधीच त्याबद्दल अढी मनात ठेवली नाही.

त्या काळात एखाद्या हिरोसाठी एका गायकाचा आवाज सूट झाला किंवा लोकांना तो पसंत आला तर पुढे त्या हीरोसाठी कायम त्याच ठराविक गायकाला निवडलं जायचं, अशाच काही जोड्यादेखील लोकप्रिय झाल्या होत्या!

शम्मी कपूर, दिलीप कुमार, देव आनंद यांना मोहम्मद रफी यांनी आवाज दिला, तर राजेश खन्ना अमिताभ बच्चन यांना किशोर कुमारने आवाज दिला, राज कपूर यांना कायम मुकेश यांचा आवाज सूट व्हायचा, हे सगळं ९० च्या दशकापर्यंत सुरू होतं, अगदी शाहरुखच्या बऱ्याच गाण्यांना अभिजीत आणि सोनू निगम यांनी आवाज दिला!

 

 

एकाअर्थी या अभिनेत्यांची ओळख निर्माण होण्यासाठी याच ग्रेट गायकांचा आवाज कारणीभूत ठरला.

एकदा मात्र राजेश खन्नासाठी आवाज द्यायला खुद्द किशोर कुमार यांनी नकार दिला होता, राजेश खन्नाच्या यशात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या किशोरदांनी काका यांच्या कोणत्या चित्रपटात गायला नकार दिला होता? नेमकं काय घडलं होतं? तो किस्सा कोणता ते जाणून घेऊया.

हा किस्सा किशोर कुमार यांचे सुपुत्र अमित कुमार यांनी एका इवेंटमध्ये सांगितला होता. १९७१ च्या दरम्यान राजेश खन्ना दुश्मन या सिनेमाचं शूटिंग करत होते. सगळं ठरलेलं, गाणीसुद्धा तयार होती, चित्रपटांचे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी एका गाण्यासाठी किशोर कुमार यांची निवड केली होती.

ते गाणं होतं ‘वादा तेरा वादा’! किशोर कुमार यांना संगीतकारांनी विचारल्यावर त्यांनी सांगितलं की “तुम्ही हे गाणं  मला ऐकवलं, पण ही कव्वाली आहे, आणि कव्वाली ही माझी स्टाइल नाही, मला खूप भीती वाटते कव्वाली गायची, तुम्ही मुहम्मद रफीकडून गाणं गाऊन घ्या!”

 

 

हे जसं राजेश खन्नाला समजलं, तसं त्याने शूटिंगचं काम थांबवून गाडी काढली आणि रेकॉर्डिंग स्टुडियोकडे ते निघाले, किशोरदासुद्धा तेव्हा स्टुडियोवरच होते. किशोर कुमार यांना भेटताच त्यांनी अत्यंत गोड आवाजात “बाबू मोशाय! आप गाना नहीं गाओगे!” असं म्हणत विचारणा केली.

हे ही वाचा अनिल कपूर यांच्या मध्यस्तीमुळेच, आज हे गाणंही किशोरदांच्या आवाजात अजरामर झालं

हे ऐकून खरंच किशोर कुमार यांना नाही म्हणणं जीवावर आलं होतं. कारण किशोरदा आणि काका यांच्यातले संबंध फार घनिष्ट होते, राजेश खन्ना यांना सुपरस्टार बनवण्यात किशोर कुमार यांच्या आवाजाचासुद्धा बरोबरीचा वाटा आहे.

अखेर किशोर कुमार यांनी “प्रयत्न करून बघतो” म्हणत ते गाणं रेकॉर्ड केलं आणि काका किशोर कुमार या जोडीची पहिली कव्वाली सुपरहिट ठरली!

 

 

असाच एक किस्सा ‘हाथी मेरे साथी’ सिनेमाच्या वेळेस झाला. या सिनेमातल्या ‘नफरत की दुनिया को छोड के’ या गाण्यासाठी फार वरच्या पिचचा आवाज गरजेचा होता, आणि आपण इतक्या वरच्या स्वरात गाऊ शकणार नाही अशी किशोरदा यांना शंका होती.

अखेर यावेळेस संगीतकारांनी किशोरदा यांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांनी हे गाणं मुहम्मद रफी यांच्या आवाजात रेकॉर्ड करून घेतलं आणि चित्रपटातलं ते सुपरहीट गाणं ठरलं, आणि लोकांनी अक्षरशः ते डोक्यावर घेतलं.

अशाप्रकारे एकदा संगीतकारांनी किशोर कुमार यांची मनधरणी केली तर एकदा संगीतकारांनी किशोरदांनी दिलेला सल्ला ऐकला, यापैकी काहीच घडलं नसतं तर ती दोन्ही गाणी आज कदाचित सुपरहीट ठरलीही नसती!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version