Site icon InMarathi

दिग्दर्शकाची चाणाक्ष नजर… आणि ‘हा’ सुपरहिट डायलॉग तयार झाला!

cid acp pradyuman inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

भारतीय टेलिव्हिजनवरची सर्वात दीर्घकाळ प्रसारित झालेली मालिका, म्हणून सीआयडीचा उल्लेख केला जातो. दोन दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलेल्या या मालिकेतील अनेक संवाद कल्ट बनले आणि आजच्या मीमचं खाद्य सुद्धा! यापैकीच एक असा संवाद आहे, जो कधी वापरलाच जाणार नव्हता.

आज तोच कडक डायलॉग या मालिकेची ओळख बनला आहे…!!

ते सोनी वाहिनीचे सुरवातीचे दिवस होते. स्टार आणि झी या दोन खाजगी वाहिन्यांनी एव्हाना चांगलाच जम बसवला होता. टेलिव्हिजनच्या जन्मापासून केवळ दूरदर्शन ही एकमेव वाहिनी माहित असणार्‍या भारतीय प्रेक्षकांसाठी हा बदल सुखावह होता.

 

 

सेन्सॉरच्या मुठीतून मोकळा झालेला थोडा मोकळाढाकळा कंटेट या खाजगी वाहिन्यांमुळे घराघरात पोहोचला होता. असं जरी असलं तरीही अजूनही दूरदर्शनच्या कौटुंबिक मनोरंजनाचा साच्यातून मालिका बाहेर आलेल्या नव्हत्या. मानवी नातेसंबंध हाच मालिकांचा गाभा होता.

अशातच भारतीय टेलिव्हिजन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणखी एक नवी वाहिनी आली. ३० सप्टेंबर १९९५ या दिवशी सोनी इंडिया घराघरात दिसू लागलं.

सुरुवातीच्या काळात जुन्याच मालिका डब होऊन प्रसारित केल्या जात होत्या. या वाहिनीचं भविष्य फार बरं नसेल असा जाणकारांनी अंदाज लावला.

===

हे ही वाचा – टीव्ही मालिकांना “डेली सोप्स” म्हणण्यामागचं ‘हे’ कारण वाचून आश्चर्य वाटेल!

===

याची कारणं दोन, सोनीची ज्यांच्याशी स्पर्धा होती, त्या दोन्ही वाहिन्यांचे प्रस्थापित नेटवर्क होते. दुसरं म्हणजे जे जे लोकांना आवडतं ते ते या दोन वाहिन्यांनी सोनीच्या जन्माआधीच दाखवून झालेलं होतं. प्रेक्षकांना आपल्याकडे खेचायचं तर नवं काहीतरी करणं गरजेचं होतं.

सोनीच्या लक्षात आलं, की एक असा सेगमेंट आहे ज्याकडे इतर वाहिन्यांचं अद्याप लक्ष गेलेलं नाही. हा सेगमेंट होता, क्राईम. याआधी फक्त दूरदर्शननं हा जॉनर यशस्वीपणे हाताळला होता. व्योमकेश बक्षी आणि करमचंद या दोन मेगा सिरियल देऊन प्रेक्षकांची या सेगमेंटमधली आवड दूरदर्शननं पक्की केलेली होती.

 

 

सीआयडीचा बोलबाला

१९९८ मधे सोनी वाहिनीने त्यांची ‘सीआयडी’ ही गुन्हेगारी जगतावर आधारित तपास मालिका आणली. शिवाजी साटम हे मराठी आणि हिंदीतलं नावाजलेलं नाव मुख्य भूमिकेसाठी निवडण्यात आलं.

अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि मग सीयाडीचा घोडा असा काही उधळला की पुढची सलग वीस वर्षं कोणत्याही ‘क्राईम शो’ला त्यानं आपली जागा घेऊ दिली नाही. या सेगमेंटमधली सर्वात दीर्घकाळ प्रसारित झालेली ही मालिका आहे.

गंमत म्हणजे एसीपी प्रद्युम्न हे सुरुवातीच्या सहा भागांमध्ये एसीपी नव्हतेच. सातव्या भागात त्यांना बढती मिळून मग ते एसीपी बनले आणि तिथून पुढे सीआयडी म्हणजेच एसीपी प्रदुम्न ही ओळख पक्की झाली.

 

===

हे ही वाचा – ‘ते’ मूर्ख बनवणार आणि आपण बनत राहणार! ‘सो कॉल्ड नवी मालिका’ही त्याच वळणावर

===

शिवाजी साटम यांचं व्यक्तिमत्व पोलिस खात्यातील अधिकार्‍याला साजेसं असल्याने प्रेक्षकांनी त्यांना एसीपीच्या भूमिकेत लगेचंच स्विकारलं. त्यांची भूमिका इतकी जीवंत असायची की अनेकांना ते खरंच पोलिस खात्यात असल्याची जणू खात्री होती.

एसीपींचा सहाय्यक असणारा ‘दया’ हा त्याच्या भूमिकेतून जितका लोकप्रिय झाला नाही, तितका तो एसीपींच्या एका डायलॉगमुळे झाला.

बरोबर… एसीपींच्या तोंडचे, ‘कुछ तो गडबड है दया’ आणि ‘दया दरवाजा तोड दो’ हे दोन संवाद आजही सोशल मीडियावरील मिम्सच्या जगात अक्षरश: धुमाकूळ घालतात. मात्र इतका लोकप्रिय आणि कल्ट डायलॉग मूळ स्क्रिप्टचा भागच नव्हता हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

 

 

असा झाला डायलॉडचा जन्म

त्याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिवाजी साटम हे जे एसीपी प्रद्युम्नचं पात्र साकारत होते त्याची देहबोली ठरविताना आज त्यांची स्टाईल म्हणून प्रसिध्द असलेली ‘कुछ तो गडबड है दया’ म्हणताना फॅन चालू असल्यासारखी हात हलविण्याची पध्दतही मूळ पात्रात नव्हती.

त्याचं असं झालं, की एकदा शोचे निर्माता दिग्दर्शक असणार्‍या बी. पी. सिंग यांच्यासोबत शिवाजी साटम यांची काही चर्चा चालू होती. बराच वेळ झाल्यानंतर अचानक शिवाजी साटम यांच्या लक्षात आलं की बीपी विचारात शिवाजींकडे बराच वेळ झाला अगदी टक लावून अगदी निरखून बघत आहेत.

शिवाजींनी जेव्हा त्यांना विचारलं, की काय बघत आहात इतका वेळ? त्यावर बी पी सिंह म्हणाले, की तू बोलताना तुझं म्हणणं मांडताना हाताची एका विशिष्ट पध्दतीनं हालचाल करत आहेस. ही हालचाल तुला तुझ्या प्रद्युम्नच्या पात्रासाठी वापरता येईल का?

शिवाजींनी होकार दिला. पण तोंडी असणारा संवाद आणि हाताची हालचाल असं जमून आलं तरच या सिग्नेचर हालचालीला अर्थ येणार होता.

बोलता बोलता संवाद इम्प्रोवाईज करताना ‘दया कुछ तो गडबड हैं’ हा संवाद आणि त्यासोबत आपसूकपणे बीपींना अपेक्षित अशी हाताची हालचाल झाल्यावर ही प्रद्युम्नची स्टाईल म्हणून पुढे पक्की करण्यात आली.

 

 

सीआयडी प्रद्युम्न म्हणलं की, पंख्यासारखा हात हलवत, डोळे बारीक करून ‘दया कुछ तो गडबड है’ असं बोलणारे शिवाजी साटम डोळ्यासमोर येतात. एका कल्ट पात्राची आणि त्याच्या स्टाईल, संवादाची ही गोष्ट.

तुमच्या-आमच्या सगळ्यांच्या आवडत्या या डायलॉगच्या जन्माची गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल, तर ती मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका…

===

हे ही वाचा – बालपण पुन्हा जगायचंय? : तुमच्या प्रिय बालपणी घेऊन जाणाऱ्या “टाईममशीन” मालिका…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version