Site icon InMarathi

ग्लासभर पाणी आणि एका वेड्यामुळे (!) शक्य झालं विमानाचं सेफ emergency लँडिंग…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

विमानात महत्वाची असते ती नेव्हिगेशन सिस्टिम. समजा विमान जमिनीपासून हजारो किमी उंचावर असतानाच प्रवासादरम्यान, जर ही यंत्रणाच बंद पडली तर? याचबरोबर विमानातील वीजपुरवठा करणारी यंत्रणाही खंडीत झाली तर?

पुढे या विमानाचं आणि त्यातल्या प्रवाशांचं काय होईल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरजच नाही. मात्र असा बिघाड झालेलं विमान, वैमानिक प्रवाशांसहित सुखरुप जमिनीवर उतरवतात आणि जमिनीवरचा एक देवदूत त्याच्या वेडेपणामुळे हे घडवून आणतो हे चमत्काराहून कमी नाही.

तो अगदी नेहमीसारखाच सामान्य दिवस होता ७ सप्टेंबर २०१०…  मॉस्को, रशियातल्या उदाचनी विमानतळावरही प्रवाशांची नेहमीसारखीच वर्दळ होती. मॉस्कोहून डोमोडेदोव्हो आंतरराष्ट्रीय विमान तळाकडे प्रस्थान करण्यासाठी टी यू-५४ ॲलोरोसा फ्लाईट नंबर ५१४ तयार होतं.

सर्वकाही ठरलेल्या वेळेनुसार घडत होतं. विमानाने अगदी ठरलेल्या वेळेत हवेत उड्डाण केलं. वैमानिकांनी रितीनुसार प्रवाशांचं स्वागत करून हवामान चांगलं असल्यानं कोणतीही अडचण न येता प्रवास सुखकर होऊन सुनिश्चित वेळेत विमान डोमोडेदेव्हो विमानतळावर उतरणार असल्याचं सांगितलं.

 

===

हे ही वाचा – विमानात बसल्यावर मोबाईल ‘फ्लाईट मोड’ वर सेट करतात – कारण जाणून घ्या!

===

नेमका काय प्रसंग उद्भवला

हे विमान वीस वर्षापासून विना तक्रार प्रवास करत होतं. कधीही कोणताही बिघाड न झालेलं उत्तम स्थितीतलं असं हे विमान नेहमीच्या सुरक्षा तपासण्यानंतरच प्रवासाला सिध्द झालेलं होतं.

सर्व काही सुरळीत सुरु असतानाच अचानक विमानातील विद्युत यंत्रणा बंद पडली. यामुळे विमानातील नेव्हिगेशन यंत्रणा आणि इंधन पंपही बंद पडले. जे इंधन शिल्लक होतं ते केवळ अर्धा तास पुरेल इतकंच होतं.

याचाच अर्थ असा की विमान आणि प्रवासी वाचविण्यासाठी वैमानिकांकडे केवळ तीस मिनिटांचा वेळ होता. विमान त्याच्या निश्चित स्थानावर पोहोचणार नव्हतं हे पक्कं होतं. मग दुसरा मार्ग उरला तो म्हणजे, जवळच्या एखाद्या धावपट्टीवर आपत्कालिन लॅण्डिंग करणं.

वैमानिक या पर्यायावर विचार करत असतानाच आणखीन एका दुर्दैवी योगायोगाची भर पडली, आता विमानाचे फ्लॅप्स आणि संपर्कासाठी वापरली जाणारी रेडिओ यंत्रणाही बंद पडली.

अक्षरश: भगवान भरोसे परिस्थिती निर्माण झालेली असली, तरीही वैमानिक जोडी अनुभवी होती आणि धैर्याचीही…

 

 

सुटकेचा श्वास सोडत असतानाच दुसरी दुर्दैवी बातमी समजली. ती अशी होती, की धावपट्टी असली तरीही ती वापरात नसलेली बंद पडलेली होती.

विमान कोठेतरी जाऊन आदळणारच होतं, तरीही ते उतरवण्याचा आणि शक्यतो सुरक्षित उतरवण्याचा अखेरचा प्रयत्न करण्याचा निर्णय वैमानिकांनी घेतला. विचार करण्यात खर्च करायला वेळही उरला नव्हताच.

===

हे ही वाचा – विमानाच्या काचा गोल असण्यामागचं हे ‘शास्त्रीय’ कारण तुम्हाला ठाऊक नसेल!

===

लोकांनी वेडा ठरवलं पण…

याचवेळेस जमिनीवर या ऐंशी प्रवाश्यांसाठी एक देवदूत हजर होता, त्याचं नाव होतं- सरजी सोतनिकोव्ह. इज्माचं हेली पॅड, जिथे विमान उतरवण्याचा अखेरचा प्रयत्न होणार होता त्या धावपट्टीची देखभाल करण्याचं काम त्याच्याकडे होतं.

विमानांसाठी बंद पडलेली धावपट्टीदेखील सरजीनं नीट देखभाल करत राखली होती. पूर्वी याठिकाणी विमानतळ होतं मात्र त्याचा फारसा वापर न झाल्यानं ते बंद करण्यात आलं आणि तयार धावपट्टीचा हेलीपॅड म्हणून वापर सुरू केला गेला होता.

या हेलीपॅडचा मॅनेजर होता सरजी. खरंतर हेलिपॅडची देखभाल करणं इतकाच त्याच्या नोकरीचा भाग होता, मात्र कुणीही सानिगितलेल नसतानाही त्यानं विमानतळाचीही देखभाल केली.

रोज कामावर आल्यावर सर्वात आधी ते रन-वेची तपासणी करत असत. कधी गरज पडलीच, तर एखादं विमान उतरवता यावं या हेतूनं तो त्याची देखभाल अनेक वर्षं करत होता. हे काम तो विना मोबदला करत असे.

 

 

त्याच्या मित्रांनी, परिचितांनी आणि अगदी सरकारी अधिकार्‍यांनीही त्याला समजावलं होतं की तो हे कष्ट उगाचंच घेत आहे. कारण विमानतळ बंद पडल्यापासून या धावपट्टीची तशी गरज पडलीच नव्हती. त्याच्या या वेडेपणाचे थट्टाही करण्यात येत असे.

सरजीनं थोडीथोडकी नाहीत तर बारा वर्षं एकट्यानं हेलिपॅडसोबतच या धावपट्टीचीही देखभाल केली होती.

या धावपट्टीवर प्रचंड प्रमाणात गवत उगवत असे आणि सरजी हातानंच हे गवत काढून धावपट्टी स्वच्छ करत असे. याशिवाय याठिकाणी खड्डे पडून त्यात पावसाचं पाणी साठत असे. हे पाणीही सरजी काढून टाकून धावपट्टी स्वच्छ ठेवत असे. हेही कमी म्हणून की काय, आसपासच्या परिसरातले लोक या रिकाम्या धावपट्टीवर गाड्या पार्क करत असत. मात्र सरजी शांतपणे धावपट्टीची देखभाल करत असत.

कोणाचंही न ऐकता त्यांनी हे काम चालू ठेवलं होतं. त्यांना विश्र्वास होता, की कधी ना कधी या धावपट्टीचा कोणाला तरी उपयोग होईलच. असं असलं तरीही कोणतंही विमान आपत्कालीन परिस्थिती म्हणून इज्मा धावपटीवर आलं नव्हतं. मात्र आजचा दिवस वेगळा होता. इतक्या वर्षांची सरजीची मेहनत आता फळाला येणार होती.

===

हे ही वाचा – प्रत्येक विमानात राखीव असणाऱ्या या ‘खास’ सिक्रेट जागांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

===

असं पार पडलं लँडिंग

पूर्णपणे बंद पडत आलेलं आणि हाताशी अगदी तुटपुंजा वेळ असलेलं टीयू ५४ या धाव पट्टीकडे शेवटच्या आशेनं झेपावणार होतं. मात्र टीयू ५४च्या या थरारक प्रवासाचा क्लायमॅक्स इतका सहज होणारच नव्हता.

या लॅण्डिंगआधीही विमानात आणि कॉकपीटमधे शेवटचा अंक सुरू झाला होता. विमान उतरविण्यासाठी जागा शोधत असलेलं टीयू ५४ इंधन पंप बंद करण्याच्या अवस्थेत आलं होतं. वैमानिकांना हा निर्णय घेणं भागही होतं. विमानानं एव्हाना धावपट्टी मिळू शकणारं गाव मागे टाकलं होतं मात्र याचा पत्ता वैमानिक आणि प्रवासी दोघांना नव्हता.

अखेर नाईलाजानं इज्मा नदीवर आपत्कालीन लॅण्डिंग करण्याचा निर्णय घेतला. या प्रकारच्या लॅण्डिंगचे दोन फायदे होते, एक म्हणजे विमान जंगलात किंवा निवासी वस्तीवर कोसळणार् नव्हतं आणि दुसरं म्हणजे नदीच्या बाजूने असलेल्या गावातून तातडीनं मदत मिळू शकणार होती.

या निर्णयाचा दुर्दैवी भाग हा होता की यात दहा टक्के लोकांच्याच वाचण्याची आशा होती. दुसरा कोणताच मार्ग न उरल्यानं हा कटू निर्णय घेणं भाग होतं.

आता विमान लँड होणारच होतं आणि एक चमत्कार घडला. फ्लाईट अटेण्डण्टना खाली एक चक्क एक धावपट्टी दिसली. मात्र समोर धावपट्टी दिसत असूनही त्यावर विश्र्वास ठेवणं कठीण होतं. कारण कोणत्याही नकाशावर या भागातली धावपट्टीची नोंद नव्हती.

 

 

हा भास होता की सत्य हे समजायला मार्ग नव्हता आणि वैमानिकांनी मागचा पुढचा विचार न करता त्या धावपट्टीच्या दिशेनं विमान वळवलं. फ्लॅप्स बंद पडल्यानं आता विमान २०७ प्रती किमी ऐवजी ३५०-३८० प्रती किमीनं उतरवावं लागणार होतं.

खरी परिक्षा होती ती अशी, की नेव्हिगेशन शिवाय विमान उतरवणार कसं…

तशाही परिस्थितीत वैमानिकानी शक्कल लढवली. एका ग्लासमधे पाणी भरून तो विमानाच्या डॅशबोर्डवर ठेवला, जेणेकरून विमान किती अंशात झुकलं आहे याचा अंदाज यावा.

 

 

वैमानिकांनी दोन असफल प्रयत्न केले. आता वैमानिकांना रनवेचा अंदाज आला होता. वैमानिकांनी विमान धावपट्टीवर उतरवलं. आखूड धावपट्टीमुळे विमान धावपट्टी संपवून जंगलात घुसलं. मात्र विमानातील प्रवासी तर सोडाच, विमानालाही फार काही झालं नाही.

===

हे ही वाचा – लोक विमानातून ह्या गोष्टी चोरून नेऊ शकतात याची तुम्ही कल्पनाही केली नसेल!

===

सर्व क्रु मेंबर्स, दोन्ही वैमानिक यांना त्यांच्या धैर्याच्या कामगिरीबद्दल सन्मानित केलं गेलं. सरजींनाही विशेष सन्मानाने गौरवलं गेलंच शिवाय या विमानावर एका बाजूला त्यांचा फोटो छापण्यात आला. तसेच इज्मा धावपट्टीवरही त्यांचं छायाचित्र असणारा फलक उभारला गेला.

जे गावकरी सरजींची थट्टा करत त्यांनीही सरजींचं भरभरून कौतुक केलं आणि त्यांना एक स्नो स्कूटर भेट दिली. हे विमान नंतर दुरूस्त होऊन आत्पकालीन सेवेसाठी राखीव ठेवण्यात आलं.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version