Site icon InMarathi

राष्ट्रपती भवनाचा थेट ‘अतिरेकी कॅम्प’ असा उल्लेख – जबाबदार होते हे वादग्रस्त राष्ट्रपती!

gianai zail singh inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. लोकांनी लोकांसाठी एकत्र येऊन केलेलं प्रशासन म्हणजे आपलं सरकार हे आपण जाणतो. राष्ट्रपती, पंतप्रधान, खासदार, मुख्यमंत्री, आमदार, महापौर, नगरसेवक असे आपल्याकडे राजकीय पद आणि हा त्यांचा उतरता क्रम आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार, राज्यपाल आणि मुख्यमंत्री, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील मतभेद हे आपल्याला काही नवीन नाहीयेत. ज्या पक्षाकडे बहुमत त्या पक्षाकडे देशाचं, सर्व पदांचं ‘रिमोट कंट्रोल’ हे आपण प्रत्येक सरकारमध्ये बघतच असतो.

स्वतंत्र भारताचे ७ वे राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंघ हे एक असंच व्यक्तिमत्व आहे. ५ मे १९१६ रोजी फरीदकोट, पंजाब मध्ये त्यांचा जन्म झाला होता. फरीदकोटच्या तत्कालीन राजाच्या नियमांचा विरोध केल्यामुळे त्यांना लहानपणीच जेलमध्ये जावं लागलं होतं.

 

 

अमृतसरच्या शाहिद सीख मिशनरी कॉलेज मधून ‘गुरू ग्रंथ साहिब’चं अध्ययन केल्यामुळे त्यांना ‘ज्ञानी’ ही उपाधी प्रदान करण्यात आली होती.

===

हे ही वाचा शिक्षकी पेशा, दुर्गापूजा आणि सिक्रेट डायरी : वाचा, प्रणबदांच्या १३ “अज्ञात” गोष्टी!

===

राजकीय प्रवास :

आपली राजकीय कारकीर्द ज्ञानी झैल सिंघ यांनी काँग्रेससोबत सुरू केली. काँग्रेस सोबतच का? याची एक छोटी कथा आहे. १९४६ मध्ये फरीदकोटमध्ये एका कार्यक्रमाच्या वेळी ज्ञानी झैल सिंघ यांना तिरंगा फडकवण्यापासून रोखण्यात आलं होतं.

हे न सहन झालेल्या ज्ञानी झैल सिंघ यांनी जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहून फरीदकोटला बोलावलं होतं. ज्ञानी झैल सिंघ यांना लोकांचा असलेला पाठींबा बघून जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना कॉग्रेसमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं.

१९४९ मध्ये त्यांनी काँग्रेस कडूनच अर्थमंत्री म्हणून काम बघितलं आणि १९५१ मध्ये कृषीमंत्री हे पद त्यांनी भूषवलं होतं. १९७२ ते १९७७ या काळात ज्ञानी झैल सिंघ हे काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्री होते.

मुख्यमंत्री असताना त्यांनी लोकांना केवळ धार्मिक कार्यक्रमांमध्ये गुंतवून ठेवलं. हायवे, टाऊनशीप यांना ‘गुरू गोविंद सिंघ’ यांचं नाव दिलं. राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांसाठी त्यांनी पेन्शन सुरू केली.

१९८० मध्ये ज्ञानी झैल सिंघ यांची ७ व्या लोकसभेत इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय गृहमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.

 

 

१९८२ मध्ये ज्ञानी झैल सिंघ यांची राष्ट्रपतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. राजकीय पद भूषवत राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेल्या ज्ञानी झैल सिंघ यांची लोकांच्या मनात प्रतिमा मात्र ‘काँग्रेसच्या हातातील खेळणं’ अशीच होती. राष्ट्रपती म्हणून त्यांचं पूर्ण करिअर हे वादग्रस्त होतं.

राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकल्यावर ज्ञानी झैल सिंघ यांनी हे विधान केलं की, “काँग्रेसचं नेतृत्व मला जे काही सांगेल ते मी करेन. उद्या मला झाडू मारायला जरी सांगितलं तरीही मी ते काम आनंदाने करेल.” या विधानाने लोकांनी घ्यायचा तो अर्थ बरोबर घेतला.

राष्ट्रपती म्हणून वादग्रस्त कारकीर्द :

२५ जुलै १९८२ रोजी ज्ञानी झैल सिंघ यांनी राष्ट्रपती पदाचा पदभार सांभाळला. इंदिरा गांधी या त्यावेळी पंतप्रधान पदावर विराजमान होत्या.

१९८४ मध्ये ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ या नावाने सुरू होणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या शीख अतिरेक्यांना सुवर्ण मंदिरात मारण्याच्या मनसुब्याला ते राष्ट्रपती असून सुद्धा अडवू शकले नाहीत.

३१ मे १८९८४ म्हणजे ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ सुरू होण्याच्या एक दिवस आधी ज्ञानी झैल सिंघ आणि इंदीरा गांधी यांची बैठक झाली होती आणि तरीही ते हे ऑपरेशन थांबवू शकले नव्हते.

 

 

निरागस शीख लोकांना ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये आपला जीव गमवावा लागला होता. अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचा अपमान झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण शीख समुदाय तेव्हा ज्ञानी झैल सिंघ यांच्या विरोधात गेला होता.

ज्ञानी झैल सिंघ यांच्यावर राष्ट्रपती पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव आणला गेला. अखिल तख्त बोर्ड समोर त्यांनी माफी मागितली आणि शीख समुदायाचा राग कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

===

हे ही वाचा ऑपरेशन ब्लू स्टार – पवित्र प्रार्थनास्थळ मुक्ततेचे थरार नाट्य

===

ज्ञानी झैल सिंघ हे स्वतः या कामामुळे इंदिरा सरकारवर इतके रागावले होते की, त्यांची नाराजी ते दूरदर्शनच्या माध्यमातून व्यक्त करणार होते. पण, त्यांना ती परवानगी राजकीय शिष्टाचारामुळे नाकारण्यात आली.

जून महिन्यात त्यांनी स्वतः सुवर्ण मंदिराला भेट दिली आणि लोकांची नाराजी दूर करण्याचा असफल प्रयत्न केला.

ऑक्टोबर महिन्यात ज्ञानी झैल सिंघ हे ओमानच्या दौऱ्यावर असतांना ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधी यांची त्यांच्याच २ शीख सुरक्षा रक्षकांनी गोळ्या मारून हत्या केली.

राजीव गांधी हे तेव्हा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. इंदिरा गांधी यांचा खून हा पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला अशी त्यावेळी चर्चा झाली होती.

 

 

ज्ञानी झैल सिंघ यांनी राजीव गांधी यांना इंदिरा गांधी यांचा मुलगा म्हणून पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा मान दिला. राजीव गांधी हे पंतप्रधानपदी विराजमान झाले आणि ३१ ऑक्टोबर दुपार पासून देशभरात शीख लोकांनी दंगली सुरू केल्या.

देशभरात जाळपोळ, दगडफेक सुरू होती. पण, हे सगळं थांबवण्यासाठी कोणताही ठोस निर्णय ज्ञानी झैल सिंघ यांनी राष्ट्रपती म्हणून घोषित केला नाही.

काही ठिकाणी शीख लोकांना वाचवण्यासाठी ज्ञानी झैल सिंघ यांनी स्वतःची कार आणि सरकारी सुरक्षा रक्षकांना पाठवलं. या घटनेमुळे लोकसभेत राष्ट्रपती भवनाचा उल्लेख हा ‘अतिरेकी कॅम्प’ असा करण्यात आला होता.

१९८४ ते १९८७ या कार्यकाळात कोणतंही विधेयक पास करतांना त्यांचा राजीव गांधी यांच्यासोबत होणारा संघर्ष हा त्यावेळच्या प्रसार माध्यमांसाठी चवीचा विषय होता.

राजीव गांधी यांनी प्रस्तावित केलेल्या इंडियन पोस्टल बिलचा त्यांनी विरोध केला होता. या विधेकानुसार प्रत्येक खासदाराच्या व्यक्तिगत पत्रव्यवहाराचा तपशीलसुद्धा सरकारकडे असणार होता.

लोकशाहीच्या विरुद्ध असलेल्या या विधेयकाचा ज्ञानी झैल सिंघ यांनी विरोध केला. हे विधेयक पास व्हावं यासाठी आग्रही असलेल्या राजीव गांधी यांची लोकप्रतिमा खराब झाली आणि त्याचा काँग्रेस पक्षाला तत्कालीन राज्य आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत चांगलाच फटका बसला होता.

 

 

‘इंडियन पोस्टल बिल’ या विधेयकानुसार, कोणत्याही विधेयकाला अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकायचा अधिकार राष्ट्रपतीकडे येणार होता. जो की ज्ञानी झैल सिंघ यांना हवा होता आणि राजीव गांधी यांचा या गोष्टीला विरोध होता.

शीख लोकांमध्ये आपली प्रतिमा अजून मलिन न होऊ देण्यासाठी काँग्रेसने ज्ञानी झैल सिंघ यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.

राजीव गांधी यांनी ज्ञानी झैल सिंघ यांना बाजूला सारण्यासाठी अकाली दलचे प्रमुख लोंगोवाल यांच्यासोबत एका कराराचा मसुदा सुद्धा तयार केला होता. पण, त्यावर शिक्कामोर्तब झालं नाही आणि ज्ञानी झैल सिंघ यांना १९८७ पर्यंत आपला राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ पूर्ण करता आला.

२५ डिसेंबर १९९४ रोजी चंदिगढ येथे ज्ञानी झैल सिंघ यांचा वयाच्या ७८ व्या वर्षी मृत्यू झाला. रुपर जिल्ह्यात त्यांच्या कारला अपघात झाला होता. चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रक सोबत हा अपघात झाला होता.

उपचारा दरम्यान ज्ञानी झैल सिंघ यांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यांच्या निधनामुळे देशात ७ दिवसीय दुखवटा पाळण्यात आला होता. एक धार्मिक व्यक्ती आणि काँग्रेसचा पक्षनिष्ठ कार्यकर्ता म्हणून आजही लोक त्यांची आठवण काढत असतात.

 

 

“ज्या पदावर तुम्ही विराजमान आहात त्याचे अधिकार तुमच्याकडे नसतील तर तो तुमच्यापेक्षा त्या पदाचा अपमान असतो.” ज्ञानी झैल सिंघ यांना हे कळलं असतं आणि त्यांनी त्यांचे विशेषाधिकार वापरून ऑपरेशन ब्लू स्टार रोखलं असतं तर किती तरी शीख लोकांचे आणि पर्यायाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे प्राण वाचवता आले असते.

===

हे ही वाचा भारताच्या राष्ट्रपती निवडणूकीमागील संपूर्ण गणित जाणून घ्या!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version