Site icon InMarathi

३३ कोटी देवांचा वास असणाऱ्या या गुहेत दडलंय विश्वाच्या अंताचं रहस्य!

patal bhuvaneshwar featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हिंदू धर्मात अशी श्रध्दा आहे की, प्रलयाचा दिवस नेमका कधी येणार आहे? याची माहिती किंवा संकेत देणारं रहस्य पाताळ भुवनेश्र्वराच्या गुहेत दडलेलं आहे. असं मानलं जातं की सर्व ३३ कोटी देवता या गुहेच्या गर्भाशयात भगवान शिवासोबत सूक्ष्म रुपात वास्तव्य करतात.

उत्तराखंडातील पिथोरागड येथील पाताळ भुवनेश्र्वर गुहा नावानं प्रसिध्द असणारं तीर्थस्थळ एका वेगळ्याच धार्मिक विश्र्वासासाठी ओळखलं जातं.

जमिनीखाली शंभर फ़ूट असणार्‍या गुहेत हे भक्तीस्थान आहे. उत्तराखंडातील कुमाऊंमधील अल्मोडाहून शेरघाटातून जाऊन १६० किमी अंतरावर एका डोंगरावर आहे.

 

 

ही पाताळभुवनेश्र्वर गुहा म्हणजे श्रध्दाळूंचं स्थान जसं आहे तसंच ते सुर कथांचं घर आहे. असं म्हणतात की या ठिकाणी गणेशाचं कापलेलं मस्तक आहे. त्याचबरोबर या गुहेत चार युगांचं प्रतिक म्हणून चार दगड आहेत. यापैकीच एका दगडाला कलियुगाचं प्रतिक मानलं जातं आणि तो दगड हळूहळू उंच होत चालला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा भगवान विष्णूंनी “दशावतार” घेण्यामागे काय उद्देश होते? वाचा, प्रत्येक अवतारामागची कथा

===

ज्या दिवशी हा दगड उंचावत जाऊन छताला टेकेल त्या दिवशी कलियुगाचा अंत होईल असं म्हटलं जातं. १६० मिटर लांब आणि ९० मिटर खोल अशी ही गुहा प्रवेश करायला फारच कठीण आहे.

हिंदू धर्मात शुभकार्यांत सर्वात आधी गणेश पूजन केलं जातं. याच्याशी संबंधीत अशी एक कथा इथे जन्मली आहे. गणेशाचं कापलेलं डोकं आणि त्याची गोष्ट तर तुम्हाला माहितच असे. ते डोकं या गुहेत असल्याची कथा आहे. हे डोकं इथे कसं आलं याची कथाही सुरस आहे.

स्नान करणार्‍या माता पार्वतींच्या पहार्‍यावर बाल गणेश बसले होते आणि शंकर आल्यानंतर त्यांनाही बाल गणेशानं अडवलं. यानं क्रोधित झालेले शंकर भगवान गणेशावर चाल करून गेले आणि त्याचं मुंडकं छाटलं.

 

 

पार्वतीनं विलाप केल्यावर हत्तीचं मुंडकं काढून गणेशाच्या कलेवरावर लावलं आणि वरदान दिलं की इथून पुढे प्रत्येक शुभकार्याच्या आरंभी गणेश पूजन केलं जाईल.

बाल गणेशाचं कापलेलं मानवी मुंडकं भगवान शंकरांनी या गुहेत आणून ठेवलं अशी कथा आहे.अनेक पुराण कथांना जन्म देणारी ही गुहा आतून एक वेगळंच आणि रहस्यमय विश्र्व आहे. चुनखडी खडकातल्या या गुहेतल्या प्रतिमा यात्रेकरू बघतच रहातात.

जेंव्हा अरुंद मार्गावरून अनेक पायर्‍या खाली उतरत यात्रेकरू एका अज्ञात जगात प्रवेश करतात तेंव्हा तो एक वेगळाच अनुभव असतो. या गुहेत कल्पवृक्ष, तक्षक नागाची आकृती आढळते.

याच्यावरच बाबा अमरनाथांची गुहा आहे या ठिकाणी भगवान शंकराच्या दगडाच्या विशाल जटा पसरल्या आहेत. याच गुहेत कालभैरवाच्या जीभेचं दर्शनही होतं.

असं म्हणलं जातं की, मनुष्यप्राणी कालभैरवाच्या मुखातून प्रवेश करून गर्भात प्रवेश करतो आणि शेपटपर्यंत पोहोचतो आणि त्याला मोक्ष मिळतो.

या गुहेत केदारनाथ, बद्रीनाथ आणि अमरनाथाचंही दर्शन होतं. बद्रीनाथमध्ये बद्री पंचायतद्च्या शिलारुपी मुर्त्या आहेत. ज्यात यम, कुबेर, वरुण, लक्ष्मी, गणेश आणि गरुड यांचा समावेश आहे.

 

 

पाताळ भुवनेश्र्वर गुहेत भगवान गणेशाची शिलारुपी मूर्ती असून तिच्या मस्तकावर १०८ पाकळ्यांचं शवाष्टक दल ब्रह्मकमळ सुशोभित केलेलं आहे. या ब्रह्मकमळातून भगवान गणेशाच्या मस्तकावर पाण्याचे थेंब ठिबकतात.

मुख्य थेंब आदिगणेशाच्या मुखकमलावर पडतो आणि तो दिसतो. असं मानलं जातं की हे ब्रह्मकमळ भगवान शंकारानी याठिकाणी प्रस्थापित केलेलं आहे.

स्कंद पुराणात वर्णन केल्यानुसार त्रेता युगात आयोध्येतील एक सूर्यवंशी राजा जंगली हरणाचा पाठलाग करता करता या गुहेत येऊन पोहोचला आणि त्याला भगवान शंकरासहित ३३ कोटी देवतांचं दर्शन घडलं.

===

हे ही वाचा भगवान शंकराचा जन्म कसा झाला? कथा, आख्यायिका आणि गुढतेचं वलय…

===

तसेच द्वापार युगात पांडवांनी याठिकाणी वनवासाच्या अखेरच्या टप्प्यात वास्तव्य केलेलं होतं आणि द्युत खेळला होता तर कलियुगात हिमालयात रहाणार्‍या थोर जगदगुरू शंकराचार्यांना या गुहेचा साक्षात्कार झाला आणि त्यानंतर त्यांनी याठिकाणी तांब्याच्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली.

 

 

पुराण कथांच्या मते साक्षात भगवान शंकर या गुहेत वास्तव्य करतात आणि बाकी देव देवता भगवान शंकराची स्तुती करायला याठिकाणी येतात. या गुहेत जाण्यासाठी जडशिळ अशा साखळदंडाचा आधार घ्यावा लागतो. याचं कारण म्हणजे या गुहेतल्या दगडातून सतत पाणी झिरपत असतं. यामुळे याठिकाणचा रस्ता निसरडा झालेला आहे.

हा निसरडा मार्ग धोकादाय असल्यानं साखळदंडाच्या सहाय्यानंच गुहेत प्रवेश करणं सोयीचं ठरतं. या गुहेत शेष नागाच्या आकाराचा एक मोठा दगड असून त्यानं पृथ्वी तोललेली पहायला मिळतं.

गुहेत प्रवेश केल्यानंतर आठ दहा फ़ुटांनतर गुहेच्या भिंतीवर अजब आकृत्या दिसू लागतात. या भिंतीवर हंस कोरलेले दिसतात. असं म्हणतात की हा हंस ब्रह्माचा आहे.

गुहेच्या आत एक होमकुंडही आहे. या कुंडाबाबत असं सांगितलं जातं की, यात जनमेजयानं नाग यज्ञ केला होता. ज्यात सर्व साप जळून भस्म झाले होते.

याच गुहेत एक हजार पायांचा हत्ती देखील कोरलेला आहे. भुवनेश्र्वराची पूजा करणं म्हणजे उत्तराखंडाच्या चार धाम यात्रेचं पूण्य कमावण्यासारखं असल्याचं मानलं जातं.

या गुहेत चार दरवाजे आहेत. रणद्वार, पापद्वार, धर्मद्वार आणि मोक्षद्वार. राम रावण युध्दात रावणाचा मृत्यू झाल्यावर पापद्वार बंद करण्यात आलं. रणद्वार महाभारतातील युध्दसमाप्तीनंतर बंद करण्यात आलं. त्यामुळे सांप्रतकाळात केवळ दोनच दारं उघडी आहेत.

 

 

पाताळ भुवनेश्र्वराच्या लेण्यांत काली भैरव, इंद्राचा ऐरावत आणि भगवान शंकर यांचे केस आदींचं दर्शन होतं. या गुहेत प्रवेश करण्यासाठी किमान तीस मिनिटांची प्रतिक्षा करावी लागते. एकावेळेस दहा ते पंधरा जणांनाच आत प्रवेश दिला जातो.

या गुहेची संपूर्ण मार्गदर्शित सहल करण्यासाठी तीस मिनिटे लागतात. आश्चर्य म्हणजे जमिनीखाली शंभर फुट असूनही या गुहेत क्लॅस्टोफोबिया जाणवत नाही. तर ही पाताळभुवनेश्र्वरची भेट थक्क करणारी गोष्ट आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा हिंदू धर्मद्वेष्ट्यांनी हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही या मंदिरातल्या बाप्पाला धक्का लावू शकले नाहीत!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version