Site icon InMarathi

३० तासांत अवघी २ तासाची झोप… एका ‘अज्ञात’ वाटेवर अशीही एक चढाई…!!

ratangad featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – दिलीप वाटवे

===

रतनगड पाहिला नाही असा ट्रेकर खरं म्हणजे क्वचितच सापडेल. अशा या ट्रेकर्सच्या आवडत्या रतनगडाला एकूण तीन दरवाजे आहेत. रतनवाडीकडील गणेश दरवाजा, साम्रदचा त्र्यंबक दरवाजा आणि कोकण बाजूकडे असल्यामुळे कोकण ऊर्फ कल्याण दरवाजा.

गडावर असलेल्या राणीच्या हुड्यापासून डावीकडे जाऊ लागायचं. पुढे जाऊन उजव्या बाजूच्या टेकडीला वळसा घातला की नेढ्याकडे जाता येतं. आणखी थोडं पुढं गेलं की डाव्या हाताला भरभक्कम तटबंदीत बांधलेला एक दरवाजा दिसतो. त्याचं नाव कोकण उर्फ कल्याण दरवाजा.

दरवाज्याच्या बाहेर खोल दरी आहे जिथून खाली उतरण्याची वाट दिसतच नाही.

जर इथून उतरायला वाटच नाही तर मग इथे दरवाजा का बांधला असावा? या दरवाज्याचं नाव कोकण ऊर्फ कल्याण दरवाजा असं असल्यानं इथून कल्याणकडे वाट उतरून जात असावी का? असेल तर नेमकी कुठे उतरत असेल? जर वाट असेल तर तिथे वाट असल्याच्या काही खाणाखुणा असतील का? वगैरे अनेक प्रश्न मनात येत होते आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांची मग शोधाशोध सुरू होती.

 

 

अगदी गुगल मॅपपासून ते जुन्या जाणत्या ट्रेकर्सना विचारून झालं होतं. पण कुणीच मनाचं समाधान मात्र करू शकलं नव्हतं. प्रत्यक्ष तिथे जाऊनच शोधाशोध करावी लागणार असं एकंदरीत दिसत होतं. शोध घ्यायला जायची इच्छा तर खुप होती पण मुहुर्त काही लागत नव्हता.

११-१२ नोव्हेंबरला डेहण्यातून अवघड असा ‘पाथरा घाट, आजोबा आणि गुयरीदार घाट’ असा ट्रेक केला. गुयरीदारच्या वाटेने डेहण्यात परतताना एक नवीन घाटवाट कळली, तिचं नाव ‘चिकणदरा’.

ही वाट कोकणातील डेहण्यातून साम्रदला तर जातेच पण ती रतनगडाच्या कल्याण दरवाज्यातूनही गडावर चढून जात असावी असा स्थानिक लोकांचा अंदाज होता. अर्थात या वाटेने कुणीच गेले नसल्याने त्याबाबत खात्रीशीर मात्र कुणीच काही सांगू शकत नव्हते.

आता एवढी माहिती मिळाल्यावर मागे पडत असलेल्या प्रश्नांनी पुन्हा डोके वर काढले. मग आता शांत बसणं शक्य नव्हतं. लवकरच ही शोधमोहिम हाती घ्यावी लागणार होती.

आजोबाचा ट्रेक संपवून पुण्याला परतताना मनात ‘चिकणदरा’ सारखा घोळत होता. कशी असेल ती वाट? किती वेळ लागेल? कुठे कातळारोहण करावे लागेल का? त्यासाठी काही साधनसामुग्रीची आवश्यकता भासेल का? असे एक ना अनेक विचार मनात येत होते.

चारपाच दिवसांनी आजोबाच्या धुंदीतुन बाहेर आल्यावर हळूच सोबत्यांना चिकणदर्‍याला जाण्यासाठी खडा टाकला. माझ्या मनातला विचार सर्वांनीच उचलून धरला. लगेचच डेहण्यातल्या पाटेकरांशी त्याबाबत बोललो.

 

 

आमचं जवळजवळ या अनवट वाटेने जाण्याचं नक्की झालंही होतं, तारीखही ठरली होती दहा डिसेंबर म्हणजे बरोबर एक महिन्यानेच आणि त्यादृष्टीने सगळी तयारीसुध्दा झाली होती. पण नेमकं ‘ओखी’ चक्रीवादळ जोराचा पाऊस घेऊन आलं. आता आम्हाला आमचा बेत रहीत करावा लागतोय की काय अशी भीती वाटू लागली. देव कृपेने पुढच्या दोन दिवसांत ते शमलं आणि आमचं जाण्याचं नक्की झालं.

डिसेंबरच्या ९ तारखेला रात्री जेवण करून निघालो. माळशेज घाटाच्या अलिकडे एका धाब्यावर चहाला थांबलो तर गाडीच्या चाकातून हवा जात असल्याचं लक्षात आलं.

मागल्या वेळेसारखा याही वेळेस गाडीने दगा दिला होता. पण एक बरं होतं की ज्या ठिकाणी चाक पंक्चर झालं तिथून पुढे फक्त अर्ध्या किलोमीटरवरच पंक्चर काढण्याचं दुकान होतं.

दुसर्‍या दिवशी डेहणे, डोळखांब, तळेगाव सारख्या ठिकाणी पंक्चर काढता आलं असतं, पण संध्याकाळी ट्रेक संपायला किती वाजतायत त्यावर पुढचं अवलंबून असणार होतं. बरं जातानाच वाटेत परत कुठे पुन्हा पंक्चर झालं असतं तर मग सगळं अजून अवघड झालं असतं.

त्यामुळे असा धोका न पत्करता खुबीतच थोडा वेळ वाया जाणं आम्हाला परवडणारं होतं. एवढं सगळं करून डेहण्यात पोहोचायला रात्रीचे साडेतीन वाजले. दोनएक तास गावातल्या मारूती मंदीरात झोप काढली.

===

हे ही वाचा – सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या या अज्ञात किल्ल्याचं सौंदर्य अवाक करतं; एकदा भेट द्यायलाच हवी

===

सकाळचं आवरून बरोबर सहाला आरती केली आणि पाटेकरांकडे नाष्ट्याला हजर झालो. आजोबाच्या ट्रेकच्या वेळचे पोहे काही पोटभरीचे झाले नव्हते म्हणून यावेळी सरळ पोळी-भाजीच नाष्ट्याला सांगितली होती.

आमच्या वाटाड्यांनी म्हणजे देवू शिवारींनी वोरपडीतुन येऊन रात्रीच पाटेकरांकडे येऊन मुक्काम केला होता. त्यांचंही आवरून झालं होतं त्यामुळे वेळ न घालवता वाल्मिकनगरहुन शाई नदीच्या पात्रात असलेल्या वाटेने तडक निघालो. ही वाट आमच्या ओळखीची होती कारण याच वाटेने आम्ही महिन्याभरापूर्वी आजोबावरून उतरलो होतो.

पहाटेच्या धुक्यात खुटा-रतनगड, कात्राबाई, करंडा आणि आजोबा ओझरते जाणवत होते. त्यांच्यामागे होत असलेल्या सुर्योदयामुळे सह्याद्रीचा राकटपणा जाणवत होता.

 

 

आमच्या थोडंसं डाव्या बाजूला रतनगडाच्या खुटा सुळक्यासारखाच एक सुळका दिसत होता. याला कुईरानाचा कडा किंवा कुईरानाचा कापरा असं स्थानिक लोक म्हणतात. त्याच्या मागच्या बाजूला एक खिंड जाणवत होती. आम्हाला त्या खिंडीत जायचं होतं. त्यातून एक नाळ शाई नदीच्या पात्रात उतरत होती. या खिंडीतून उतरणार्‍या वाटेलाच चिकणदरा किंवा चिकणमातीचा दरा म्हणतात.

चढाईला सुरुवात

नदीपात्राच्या बाजूने गच्च झाडीतून प्रवास करत आम्ही सर्व जवळजवळ मुख्य रांगेला भिडलो होतो. ऊन लागत नसल्यामुळं पहिला थांबा उंबराच्या पाण्यापाशीच घेतला. नदीपात्राच्या बाजूला एक उंबराचं झाड आहे. त्या झाडाच्या बाजूला कुठेही खड्डा खणला तरी बारमाही पाणी मिळू शकतं.

डिसेंबर महिना असल्याने आम्हाला पाण्यासाठी खड्डा काही करावा लागला नाही. इथून पुढं ज्या वाटेने आम्ही परत खाली उतरणार होतो त्या बाणच्या नाळेत पोहोचेपर्यंत आम्हाला पाणी मिळेल याची शाश्वती नव्हती म्हणून पोटभर पाणी पिऊन घेतलं आणि बाटल्याही काठोकाठ भरून घेतल्या.

आता बाकी आमची वाट डाव्या बाजूच्या डोंगरधारेवर चढू लागली होती. खरंतर चिकणदर्‍याच्या खिंडीतून उतरलेली नाळ थोडी पुढे उतरत होती. पण आम्ही एक छोटासा शॉर्टकट मारून खिंडीत पोहोचणार होतो.

सुरवातीची वाट दाट झाडीतून होती आणि वाट तयार करतच चढावं लागत होतं. साधारण तासाभराच्या चढाईनंतर वाट एका सोंडेवर आली. इथे डोक्याएवढ्या उंचीचं गवत होतं. पण जसजसं वर चढत गेलो तसं ते कमी उंचीचं होत गेलं.

आता ही सोंड ओलांडून आम्हाला पलिकडच्या नाळेत शिरायचं होतं. पायाखाली वाळलेलं निसरडं गवत आणि जोरात वाहू लागलेल्या थंडगार बोचर्‍या वार्‍यामुळे जीव मुठीत घेऊनच चढावं लागत होतं. त्यातच डाव्या बाजूला चढाची बाजू तर उजव्या बाजूला निसरडा उतार आणि वाट तर फक्त एक पाऊल बसेल एवढी. पाऊल पुढे टाकलं तरी ते कधी घसरेल याचा नेम नसे. त्यामुळे काहीजण तर चक्क चतुष्पाद झाले होते.

‘बुडत्याला काडीचा आधार’ कशाला म्हणतात त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेत होतो. आता आम्ही वरच्या कड्याला भिडलो होतो. एक बरं होतं की आता कड्याला धरता येत होतं.

आडवं जात नाळेत शिरलो आणि मस्त झाडी लागली. अशा अवघड टप्प्यावरून शेवटचा माणूस येईपर्यंत थांबणं गरजेचं होतं. अर्थात त्यामुळे सर्वांनाच थोडी विश्रांती मिळणार होती आणि खिंड आता आटोक्यात आली होती त्यामुळे थांबायला काहीच हरकत नव्हती.

वाट नाळेच्या कधी अल्याड तर कधी पल्याड जात चढत होती. जसजसं खिंडीत जात होतो तसतसं वरच्या बाजूने ढासळलेल्या दगडांच्या ढिगावरून चालून जावं लागत होतं. एखाद्या मोठ्या दगडावरही पाय ठेवल्यानंतर तो कधी खाली घसरेल याचा नेम नव्हता.

ज्याला जसं जमेल तसं पण सावधगिरीने चालत हळूहळू सर्वजण खिंडीत पोहोचले. विश्रांती घेत असताना पाटेकरांशी पुढच्या वाटेबद्दल चर्चा केली. आमच्याबरोबर आलेले दोन्ही वाटाडे इथून पुढे रतनगडाकडे कधीच न गेल्याने निदान इथपर्यंत तरी त्यांचं काम झालं होतं आणि माझं सुरू झालं होतं.

आतापर्यंत केलेल्या डोगरयात्रांमुळे पदरी जमा असलेला अनुभव पणाला लागणार होता. शिवारी आणि पाटेकर आमच्यासोबत येण्यास थोडे नाखुषच दिसत होते. पण आम्हाला रतनगडाची वाट शोधायचीच असल्याने खिंडीत आम्ही रतनगडावर जाण्याची तयारी केली.

 

===

हे ही वाचा – तुम्ही ‘ट्रेक लव्हर’ असाल तर गड किल्ल्यांवर जाताना ‘या’ गोष्टी चुकूनही विसरु नका!

===

उजव्या बाजूच्या धारेवर चढलो. थोडं वर गेल्यावर समोरच भलामोठा कातळ आडवा आला. खरं म्हणजे इथून रतनगड अजिबात दिसत नव्हता. निदान समोरच्या कातळावर चढून गेलो म्हणजे काहीतरी अंदाज आला असता.

त्यासाठी कातळावर चढून जाणं भाग होतं. एक नक्की होतं, की जर इथून रतनगडावर जायला वाट असेल तर त्याकाळी कातळारोहण करून नक्कीच जात नसणार. पायर्‍या असायलाच हव्या होत्या. त्यादृष्टीने थोडी शोधशोध केल्यावर त्या गवसल्या आणि सर्वांनाच आनंद झाला.

पायर्‍यांच्या मागच्या बाजूला थेट कडा होता पण पायर्‍या असल्याने तशी भीती वाटत नव्हती. समोरच कुईरानाचा कडा किंवा कुईरानाचा कापरा नावाचा आतापार्यंत कुणीही चढाई केलेला सुळका लक्ष वेधून घेत होता. याची चढाईची उंची ३००-३५० फुट नक्कीच असेल. हे करण्यासाठी एकदा पूर्ण तयारीनिशी आणि वेळ काढून यावे लागेल.

आम्ही ज्यासाठी इतक्या लांबून इथे आलो होतो ते स्वप्न आज पूर्ण होणार अशी सर्वांनाच आशा वाटू लागली. इथून पूर्वी रतनगडावर जायला नक्की वाट होती याची खात्री पटली होती. खरं म्हणजे या सपाटीवर गडाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या चौकीचे बांधकाम असायला हवं होतं पण प्रचंड झाडी माजल्यामुळे ते शोधणं थोडं अवघड आणि वेळखाऊ होतं. त्यामुळे त्याच्या नादी न लागता आम्ही फक्त वाट शोधण्याचं ठरवलं.

रतनगड दृष्टीस पडला

आता आम्हाला फक्त पायर्‍यांचा माग काढत जायचं होतं. पायर्‍या चढून वर गेल्यावर अजून एक छोटा कातळटप्पा लागला तिथल्या पायर्‍यांवरून चढल्यावर समोरच्या छोट्या टेकडीमागे असलेला रतनगड नेढ्यावरच्या झेंड्यामुळे चटकन ओळखता आला.

 

 

समोर दिसणार्‍या टेकडीच्या उजव्या बाजूला कडा जाणवत होता आणि टेकडीवर चढून जाणंही सोपं दिसत नव्हतं त्यामुळे वाट टेकडीच्या डाव्या बाजूने जात असणार हे उघड होतं. वाटेत भयानक झाडी माजलेली असल्याने वाट तयार करतच जावं जावं लागत होतं त्यामुळे वेळ प्रचंड खर्ची पडत होता.

संध्याकाळपर्यंत आम्हाला डेहण्यात पोहोचायचं असल्यानं विश्रांतीसाठी कुठेही थांबा न घेता रतनगडाच्या दिशेने चालत होतो. जुनी कारवी मोडून पडली होती आणि नवीन कारवी त्यामधूनच आली होती त्यामुळे एखादं पाऊल खाली पडलेली कारवी मोडून कधी खालच्या खड्ड्यात जाईल याचा नेम नसायचा.

त्यातच मधे उगवलेली आग्याबोंड अंगाला लागली की प्रचंड खाज सुटत असे. काटेरी झुडपे तर अगणित होती त्याने कुणाला ओरखडत होतं तर कुणाच्या अंगात काटा मोडत होता. त्यामुळे एका रेषेत चाललेल्या आमच्या टोळीचा म्होरक्या थकल्यावर आम्ही थोड्या थोड्या वेळाने बदलत होतो.

खरं म्हणजे आम्ही अंदाजेच रतनगड आणि धारेच्या सांध्याकडे चढून जात होतो पण मधेच आलेल्या एका छोट्या कातळटप्प्यावर खोदीव पायर्‍या दिसल्या आणि आम्ही योग्य दिशेने चाललो आहोत याची खात्री पटली. तसं आम्ही विश्रांतीसाठी कुठे थांबतही नव्हतो. मागून ‘ए जरा थांबा. अंतर पडलंय’ अशी आरोळी ऐकू आली की ‘अरे चला, संपलंच. थोडंच राहिलंय’ असं म्हणून रेटून नेत होतो.

 

 

घड्याळातली वेळ अडीच वाजल्याचे दाखवत होती. म्हणजे आम्हाला बराच उशीर झाला होता. अंधार पडायच्या आत बाणच्या नाळेने उतरून निदान खालच्या कुंडांपर्यंत तरी पोहोचायला हवं होतं. त्यामुळे थांबून चालणारच नव्हतं.

काही वेळाने एक वेळ अशी आलीच की मागच्या थकलेल्या मंडळींसाठी थांबावच लागलं. आता इथून पुढं यायची त्यांची अजिबात तयारी नव्हती. खरं म्हणजे रतनगड अगदी हाकेच्या अंतरावर दिसत होता. तो इतका जवळ होता की गडावरच्या मंडळींचे बोललेले आवाजही स्पष्ट ऐकू येत होते. त्यामुळे थकलेल्या मंडळींना आम्ही वाटेत थांबवून काही मोजके जण गडाकडे निघालो.

मागे थांबलेल्या मंडळींमधे आमचे दोन्ही वाटाडे होते हे काही वेगळं सांगायला नको. थकलेलं टोळकं मागे थांबल्याने एक गोष्ट बाकी आमच्या पथ्थ्यावर पडणार होती ती म्हणजे त्यांची विश्रांती. दुसरं असं की आम्ही वर जाऊन येईतोपर्यंत त्यांची जेवणे सुद्धा होणार होती.

पुढे डेहण्यापर्यंत चालण्याच्या दृष्टीनं ही गोष्ट चांगलीच झाली होती. खरं तर जिथे पाणवठा मिळेल तिथे थांबून जेवण करण्याचे ठरविले होते. पण उंबराच्या पाण्यापासून इथंपर्यंत आम्हाला कुठेही पाणी सापडलं नाही. पाणवठा मिळेपर्यंत सोबतचा पाणीसाठा पुरवून वापरावा लागणार होता.

रतनगडापर्यंतची वाट कशी असेल याचा अंदाज नसल्याने कातळारोहणासाठी लागणारी जुजबी सामग्री सोबत घेऊन वेळ न दवडता पुढे निघालो.

आम्ही जसजसं वर चढत होतो तसं झाडांच्या झरोक्यातून रतनगडाची तटबंदी, बुरूज दिसत होते. रतनगडावरून उतरलेली धार मागे पाहिलेल्या टेकडीपर्यंत आलेली होती. तिच्यावर हळूहळू चढत रतनगडाच्या आणि टेकडीला जोडलेल्या धारेच्या सांध्यात पोहोचलो.

 

 

इथेही अपेक्षेप्रमाणे पायर्‍या असायला हव्या होत्या तशा त्या दिसल्याच. फारशी शोधाशोध करावी लागलीच नाही. त्या पायर्‍यांचा माग घेतघेत वर चढत गेलो. पण एकवेळ अशी आली की पुढे पायर्‍या संपल्या आणि नव्वद अंशाचा कडा लागला.

जवळच प्रबळगड आणि कलावंतीणच्या खिंडीत आहे किंवा रायगडाच्या भवानी कड्याखाली आहे तसं एक टाकं दिसलं. गडावर चढून जाण्यासाठी अवघड प्रकारचं कातळारोहण करावं लागलं असतं आणि त्यासाठी वेगळ्या नियोजनाची गरज होती. आम्हाला फक्त वाट शोधायची असल्याने आम्ही त्या नियोजनाने आलो नव्हतो.

त्यामुळे इथून पुढे आम्ही काही गेलो नाही. अगदी रतनगडावर कातळारोहण करून गेलोच असतो तरीही डेहणे गाठण्यासाठी खूप मोठा वळसा पडला असता. मागे थांबलेल्यांची एकंदर अवस्था बघता त्वरीत परत आम्ही फिरण्याचा निर्णय घेतला. तसं फक्त आम्ही वाट शोधण्यासाठी आलो होतो आणि आम्हाला ती गवसली होती.

परतीचा प्रवास

आम्ही परत फिरून आमच्या मागे थांबलेल्या सोबत्यांपर्यंत येईस्तोवर त्यांचं जेवण होऊन एक झोप काढून झाली होती. थकलेली मंडळी ताजीतवानी झाल्यावर त्यांना पुढे पाठवून देऊन आम्ही पटापट आमची जेवणे उरकली आणि ते खिंडीत पोहोचेपर्यंत त्यांना मागून जाऊन गाठलं.

खिंडीपासून पंधरा-वीस मिनीटात एका मोकळ्या पठारावर आलो. या ठिकाणावरून रतनगड आणि खुटा अगदी पुर्णपणे दिसत होते. पठाराच्या आसपास बांबुची बेटे भरपुर दिसली आणि साम्रदची मंडळी बांबू नेण्यासाठी इथे वरचेवर येतात त्यामुळे या पठारावरून बाणच्या नाळेत जाईपर्यंतची वाट अतिशय मळलेली होती.

मळलेली वाट साम्रदकडे निघून गेली आणि आम्ही बाणच्या नाळेतून उतरू लागलो. थोडं उतरून गेल्यावर स्वच्छ पाण्याचा साठा मिळाला.

चिकणदर्‍याखालच्या उंबराच्या पाण्यानंतर आत्ताच पाणी मिळालं होतं. बाणची नाळ माझ्या चांगल्या परिचयाची होती. जानेवारी २००८ च्या पुणे व्हेंचरर्सच्या बाण मोहीमेत मी इथं आठवडाभर मुक्कामाला होतो.

आता बारीक नाळेतून मोठ्या झालेल्या नाळेत आलो आणि समोर ८१० फुटांचा बाण सुळका, सांधणदरीची भेग आणि त्यामागे करवली घाट दिसू लागला. बाणच्या पायथ्यातून मोठमोठे कातळटप्पे उतरावे लागत होते. सुर्यास्तही होऊ लागला होता त्यामुळे आता जेवढ्या लवकर सांधण खालच्या कुंडांपर्यंत जाता येईल तेवढं जावं लागणार होतं. कारण अंधार पडल्यावर चालण्याचा वेग मंदावतो.

 

 

बाणच्या नाळेतून पुर्णपणे खाली उतरून जाता येत नाही. मधे दोन-तीन मोठाले कातळटप्पे आहेत. त्यामुळे बाणची नाळ सोडून आम्हाला डाव्या बाजूच्या नाळेत उतरावे लागणार होते. त्यासाठी अगोदर डाव्या धारेवर चढावे लागले. इथे पोहोचेपर्यंत पुर्णपणे अंधार पडला.

डाव्या धारेवरून नाळेत उतरण्याची वाट इतकी सरळसोट होती की सुरक्षा दोर वापरण्याखेरीज पर्यायच नव्हता. एखादे मोठे झाड पाहून त्याला दोर बांधायचा. एकएक करत सर्वजण खाली आले की शेवटचा भिडू गाठ सोडून दोर त्याच झाडाला इंग्रजी ‘U’ सारखा ओवायचा आणि दोन्ही टोके खाली सोडायचा.

मग दुहेरी झालेला दोर धरुन खाली बाकीच्या सोबत्यांपर्यंत उतरायचा. असं करत करत आमची जत्रा अंधारात खाली उतरत होती. जवळजवळ हा प्रकार आम्ही आठ-दहा वेळा तर नक्कीच केला. बराच वेळ असं आम्ही उतरत होतो.

काहीच दिसत नसल्याने तळ किती लांब आहे ते काहीच समजत नव्हते. एकदाच्या सांधणदरी खालच्या ओळखीच्या खुणा दिसल्या आणि सुटकेचा निश्वास सोडला.

 

===

हे ही वाचा – ट्रेकर्ससाठी आकर्षण तर हिंदू आणि जैनांचे श्रद्धास्थान असलेला हा पर्वत माहितेय का?

===

रात्रीचे साडेआठ वाजले होते आणि डेहण्यापर्यंत अजुनही दोनएक तासांची चाल बाकी होती. पण एक बरं होतं की वाट मळलेली, सपाटीची आणि निर्धोक होती. नाही म्हणायला जवळपास कोल्हेकुई ऐकू येत होती पण तेवढीच. उठतबसत एकदाचे साडेदहा वाजता सर्वजण डेहण्यात पोहोचलो.

आम्हा सर्वांची पुण्यातून निघून डेहण्यात पोहोचण्याच्या चोवीस तासात फक्त दोनच तास झोप झाली होती आणि आता इथून पुढे पुण्यापर्यंत पाच तास झोप होणार नव्हती. म्हणजे पुण्यात पोहोचण्याआधीच्या तीस तासात सोळा तास ट्रेक, दहा तास ड्रायविंग, दोन तास आवरण्याचे आणि फक्त दोन तास झोप.

एकूण पाटेकरांचा या ट्रेकचा चालण्याबद्दलचा अंदाज साफ चुकला होता. हा ट्रेक एक दिवसाचा खासच नाही.

बहुतेक सर्वांनाच दुसर्‍या दिवशी कामावर जायचे होते त्यामुळे डेहण्यात थांबण्याचा प्रश्नच नव्हता. पाटेकरांकडे चहा घेतला आणि तडक पुण्याकडे निघालो ते याखेपेला सुद्धा आणखी एक नवीन सापडलेल्या घाटवाटेत परत येण्यासाठीच.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version