Site icon InMarathi

आर्य चाणक्यांची ही १५ वाक्यं मनात खोल रुजवा; मग जीवनात अशक्य काहीच नाही!

arya inmatrahi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चाणक्य ठाऊक नसणारी व्यक्ती भारतात सापडणं निव्वळ अशक्यच! एका ब्राह्मण कुटुंबातील मुलाने आपल्या कुशाग्र बुद्धीने केवळ या देशातच नव्हे तर जगभर आपली ख्याती पसरवली.

गुरु चाणक्य अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते, अर्थशास्त्राच्या बरोबर ते मुलांना राजकारण आणि कुटनीती देखील शिकवत असत. चाणक्यच्या याच कुटनीतीमुळेच सिकंदरला भारतातून पळ काढावा लागला होता.

 

 

‘चाणक्य निती’ ही केवळ एक संकल्पना नसून अनेकांंच्या जीवनाचा एक भाग बनली आहे. चाणक्यांची सूत्रे पुस्तकांच्या चौकटी ओलांडून आपल्या प्रत्यक्ष जीवनालाही नवा अर्थ देतात, भविष्य घडवण्याचे बळ देतात.

 

 

कला, क्रिडा असो वा राजकारण… असे एकही क्षेत्र नाही जिथे चाणक्यांच्या नियमांचा, सूत्रांचा वापर केला जात नाही.

अत्यंत साध्यासोप्या भाषेत चाणक्यांनी दिलेले कानमंत्र जाणून घेतले तर येणारा प्रत्येक दिवस हा नव्याने आशेचा किरण ठरेल.

अपयशाची भीती वाटत असेल, भविष्याबाबत चिंता असतील, किंवा आयुष्याबद्दल कोणाताही संभ्रम असेल तर ही १५ वाक्य तुम्हाला जगण्याचं बळ देतील.

१. तुमचे सिक्रेट कुणाशीही शेअर करू नका 

समाजप्रिय असलेल्या माणसाच्या आयुष्यात कुटुंब, मित्र, नातेवाईक यांचा मोठा गोतावळा असतो. आपल्या कुटुंबियांसह जवळच्या मित्रांशी आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शेअर करतो.

एखाद्या सुखाच्या प्रयत्नांत तर आपण आनंद इतरांसोबत साजरा करतोच, मात्र एखादं दुःख, संकट किंवा आपल्या हातून घडलेली चूकही आपण नैराश्येच्या भरात समोरच्याला सांगून टाकतो, मात्र ही आपली सर्वात मोठी चूक ठरू शकते.

 

 

आपण प्रामाणिकपणे सांगितलेली एखादी खाजगी बाब समोरील व्यक्तीकडून गुप्त ठेवली जाईलच याबाबत खात्री नसते. अनेकदा अडीअडचणीच्या काळात आपल्या या सवयीचा फायदा घेतला जाण्याचीही शक्यता असते. त्यामुळे तुमची सिक्रेट ही कुणाशीही शेअर करू नका हा चाणक्यांचा सर्वात महत्वाचा गुरुमंत्र आहे.

आपली सिक्रेट्स आपण आपल्या मनात जपून ठेवावी असंही चाणक्य सांगतात.

२. माणूस हा जन्माने नव्हे तर कर्माने मोठा होतो. 

तुम्ही सोन्याचा चमचा तोंडी धरून आला नसला तरी भविष्यात सोनाच्या चमचा मिळवण्याची धमक तुमच्यात हवी हे चाणक्य सुचवतात.

आपला जन्म कोणत्या कुटूंबात, कोणत्या परिस्थितीत व्हावा हे आपल्या हाती नाही, मात्र कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक चणचण, अपुऱ्या सुविधा यांना कायम दोष देत निष्क्रीय राहण्यापेक्षा आपली ओळख ही आपल्या कार्याने व्हावी असा निश्चय करा.

छत्रपती शिवाजी महाराज, घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, भारताच्या पहिला महिला डॉ आनंदी गोपाळ ही त्याचीच काही उदाहरणं!

 

 

हे ही वाचा – चाणक्यांची ११ सूत्रे, काही धक्कादायक तर काही त्रासदायक!

३.  कार्याच्या सुरुवातीला अपयशाची भिती नको 

एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात करतानाच “हे काम होणारच नाही’, “मला हे जमणारंच नाही” अशी नकारघंटा वाजवणारे अनेकजण आपल्या अवतीभवती असतात. मात्र त्यांच्या प्रभावाखाली येत तुम्हीही असंच करत असाल, तर आयुष्यात यशस्वी होण्याचं तुमचं स्वप्न निश्चित अर्धवट राहणार.

well begun is half done अशी इंग्रजीत म्हण आहे, त्यानुसार आत्मविश्वासाने झालेली सुरुवात, ही काम यशस्वी करण्यासाठी नक्कीच मदत करू शकेल.

 

 

चाणक्य सांगतात, भविष्याच्या भितीने वर्तमानात प्रयत्न करण्यासाठी घाबरत असाल तर अशी चूक करू नका.

एखादं नवं काम सुरु करताना मनातील नकारात्मकता पुर्णपणे काढून टाका. आपण हाती घेतलेलं काम नक्की यशस्वी होणारच! हा मंत्र वारंवार म्हणा असे चाणक्य निती सांगते.

४. देवाचा शोध नको, स्वतःवर विश्वास ठेवा 

तर्कशास्त्रावर आधारित चाणक्य नितीत दैवत्वाची व्याख्या सांगण्यात आली आहे. देव या संकल्पनेबाबत आस्तिक आणि नास्तिक यांच्यातील वाद काही नवे नाही. मात्र या वादांवर पडदा टाकणारे चाणक्यांचे विधान अत्यंत महत्वाचे आहे.

 

 

देव हा कोणत्याही मुर्तीत सापडत नाही. तुमच्या भावना, मनातील आचारविचार हाच तुमचा देव आहे हे नेहमी लक्षात ठेवा. तुमचे विचार, कृती यांना प्राधान्य द्या. तुमचा आत्मा हेच मंदिर असल्याचंही चाणक्यांनी सांगितलं आहे.

५. आरोग्य जपा

चाणक्यांचा हा सल्ला सद्यस्थितीसाठी अत्यंत उपयोगी आहे. मागील वर्षापासून आपण कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असताना स्वतःचं आरोग्य किती महत्वाचं आहे याचा प्रत्यय सगळ्यांना आलाच असेल.

मित्र, नाती, पैसा, नोकरी या सगळ्या गोष्टी हातून निसटल्या तरी त्या पुन्हा मिळवता येतात, मात्र शरिराची हानी भरून काढता येत नाही हा चाणक्यांचा सल्ला प्रत्येकाने जपायला हवा. त्यासाठी आहार, विश्रांती, व्यायाम ही त्रिसुत्री वापरायला हवी.

 

 

कोरोनाच्या कालावधीत स्पर्धेत धावण्यापेक्षा स्वतःसह कुटुंबाचे आरोग्य जपले गेले तर भविष्यकाळ निश्चित उज्वल ठरेल.

५. मैत्रीतील कटु सत्य

सध्या मैत्रीला अतिरिक्त महत्व देत अनेकदा मित्राच्या संगतीने चुकीच्या गोष्टीही केल्या जातात. मात्र चाणक्यांच्या मते अशी कोणतीही मैत्री नाही ज्यात स्वतःच्या फायद्याचा विचार केला जात नाही.

 

 

हे मैत्रीतील एक कटू सत्य असले तरी ते स्विकारणं महत्वाचं आहे. मैत्री हा जीवनातील महत्वाचा घटक असला तरी त्याचा अतिरेकी विचार किंवा स्वाभिमान बाजूला सारून मैत्रीत वहावत जाऊ नये.

६. गोड बोलण्याला भुलू नका 

पाठीमागून वार करणाऱ्या मित्रापेक्षा समोरून हल्ला करणारा शत्रुच बरा असं म्हटलं जातं, मात्र हा कानमंत्र चाणक्यांनी अनेक वर्षांपुर्वीच देऊन ठेवला आहे.

आपल्या समोर स्तुती करणारा मात्र आपली पाठ फिरताच निंदा करणा-या हितशत्रुपासून सावध राहणं गरजेचं आहे. अशा लोकांना त्यांनी विषाने भरलेल्या रांजणाची उपमा दिली आहे, असा रांजणावर दिसणा-या दुधाला भुलू नका अन्यथा विष प्राशन करावं लागेल असंही त्यांनी सांगितलंय.

 

 

७. संकटांशी सामना करा

संकटं आली की आपण निराश होतो, हार मानतो, मात्र या संकटांपासून पळ काढण्यापेक्षा त्यांचा सामना केला तर काही मिनिटांच्या या लढाईनंतर आपला विजय नक्की आहे.

 

 

संकटांशी दोन हात करणे किंवा संकट येण्यापुर्वीच त्यापासून दूर अशी आपली स्वतंत्र जागा निश्चित करणे या दोन उपायांपैकी एक उपाय तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल.

हे ही वाचा – यशस्वी आयुष्य जगायचंय ? या गोष्टी आचरणात आणल्या तर ते जास्त अवघड नाही..

८. ध्येयाशिवाय विजय नाही

जी व्यक्ती आपलं ध्येय ठरवत नाही, तो आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकणार नाही.

 

 

एखादं काम सुरु करण्यापुर्वीच आपले ध्येय ठरविले, तर त्यादृष्टीने नियोजन करता येतं, ध्येय समोर असलंं की मेहनतीची दिशा निश्चित होते, यश हमखास मिळतेच.

९. कमतरता समोर येऊ देऊ नका

प्रत्येक माणसात जसे गुण असतात, तशा कमतरताही असतात. मात्र तुमच्या कमतरता इतरांसमोर कधीही उघड करू नका. कारण आपल्यातील कमतरतेचा अनेकदा शत्रूंकडून फायदा घेतला जातो.

 

 

याचेच उदाहरण देताना चाणक्य म्हणतात, सापांच्या काही प्रजाती या विषारी नसल्या तरी ते विषारी असल्याचे भासवतात, यामुळेच त्यांच्याबाबत आपली भीती कायम राहते, परिणामी त्यांचा जीवही वाचला जातो.

१०. अतिचांगुलपणा नको

चाणक्यांचा हा सल्ला सध्याच्या काळात प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त आहे. “चांगल्याची दुनिया नाही” हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.

प्रत्येकाने चांगुलपणा जपला पाहिजे ही बाब योग्य असली तरी आपला चांगुलपणा म्हणजे आपली दुर्बलता ठरणार नाही याची काळजी घ्यावी.

सरळ वाढलेल्या झाडांवर जसे सर्वात प्रथम कु-हाड चालवली जाते, त्याचप्रमाणे अतिचांगुलपणा हाच त्या माणसाच्या प्रगतीतील अडथळा ठरू शकतो.

११. आजचा क्षण जगा

भूतकाळातील आठवणीीत रमणारे आणि भविष्याबद्दल चिंता करणारी व्यक्ती कधीही वर्तमानात यशस्वी होऊ शकत नाही.

 

 

भूतकाळातील चुका दुरुस्त करता येत नाहीत आणि वर्तमानाचे भाकीत करता येत नाही, त्यामुळे सध्या वर्तमानात जे क्षण जगता येतात, ज्या संधी मिळतात त्याचे सोनं करा.

१२. शिक्षणाचं महत्व

 

 

चाणक्यांच्या मते अशिक्षित माणसाचं आयुष्य हे कुत्र्याच्या वाकड्या शेपटी प्रमाणे असतं. जसं वाकड्या शेपटीमुळे कुत्र्याचे संरक्षण होत नाही, उलट कुत्र्याला त्याचा भार होतो तसंच निरक्षरांचे आयुष्यही व्यर्थच असतं.

१३. स्वतःच्या क्षमता ओळखा

 

 

आपल्या क्षमता इतरांपेक्षा आपण जास्त चांगल्यारितीने ओळखू शकतो. आपल्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाचे काम किंवा अन्य कशासाठी राजी होऊ नका. तो अभिमान नसून स्वाभिमान आहे. आपला स्वाभिमान आधी आपण जपला तरच इतरांकडून जपला जाईल.

१४. गुरुंचे मार्गदर्शन

 

 

जो गुरु आपल्या शिष्याला नितिमत्ता आणि आयुष्यात त्याचा वापर कसा करावा हे शिकवतो, तो सर्वश्रेष्ठ गुरु होय, अशा गुरुचे आपल्यावर इतके मोठे कर्ज असते, लाखो रुपयांच्या संपत्तीनेही परत फेडता येत नाही. त्यामुळे योग्य गुरुची निवड आणि आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहणे, त्यांचा आदर करणे हीच खरी गुरुदक्षिणा आहे.

हे ही वाचा – यशस्वी आयुष्य जगायचंय ? या गोष्टी आचरणात आणल्या तर ते जास्त अवघड नाही..

१५. खऱ्या भावाची पारख

 

 

जी व्यक्ती तुम्हाला संकटात, आजारपणात, तुमच्या कठीण काळात सर्वार्थाने मदत करते, खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहते, तोच खरा तुमचा भाऊ, सखा. अशा नात्यांना कधीही गमावू नका.

चाणक्यांनी दिलेले हे गुरुमंत्र प्रत्येक वयोगटासाठी उपयुक्त ठरतात. आपल्या रोजच्या आयुष्यात या गोष्टींचे पालन केले तर भविष्यात अपयशाची भिती बाळगावी लागणार नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version