Site icon InMarathi

राजकारण ठेवा बाजूला, ‘फोन टॅपिंग’ नेमकं कसं होतं ते जाणून घ्या

phone im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

संशयित सचिन वाझे, मनसुख हिरेन हत्या आणि कचाट्यात अडकलेले गृहमंत्री अनिल देशमुख हे प्रकरण आठवतंय का? एकंदरित महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणाऱ्या या प्रकरणात फोन टॅपिंग हा महत्वाचा मुद्दा समोर आला होता.

 

 

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी खुलासा केला केला  की गृहमंत्री अनिल देशमुख हे पोस्टिंग आणि बदल्याच्या मोबदल्यात पैसे घेत होते. ही बाब टेलिफोन इंटरसेप्शनमधून समोर आली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

याचाच अर्थ गृहमंत्र्यांचा फोन टॅप करून त्यामार्फत माहिती घेण्यात आल्याचा दावा परमबीर सिंह यांनी केला. यानंतर गृहमंत्र्यांचा फोन टॅप करण्याचा ठपका रश्मी शुक्ला यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्यानंतर ‘फोन टॅपिंग’ हा नवा विषय वादाच्या केंद्रस्थानी सापडला.

 

हे ही वाचा – गेम थियरी आणि परमबीर सिंग : राज्याच्या राजकारणाला अनपेक्षित कलाटणी

आता हे फोन टॅप करणं वैध की अवैध? त्यासाठी परवानगी होती की नाही? हे प्रश्न अनेकांना पडले असतानाच आता शिवसेना खासदार संजय संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचेही फोन तब्बल २ महिने टॅप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

 

पोलिसांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा फोन ६० दिवस टॅप केला होता. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा फोन ६७ दिवस टॅपिंगवर ठेवण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाल्याचे माध्यमांनी सांगितले आणि एकच गोंधळ माजला.

मात्र एकंदरित या बातम्या टिव्हीवर पाहताना प्रत्येक सर्वसामान्यांना प्रश्न पडतात, की फोन टॅप होणं म्हणजे काय? नेमकी काय प्रक्रिया असते? याला परवानगी कोण देतं? केवळ मंत्री, सेलिब्रिटी यांचेच फोन टॅप होतात की आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या बाबतीतही असा प्रकार घडू शकतो.

तुम्हाला भेडसावणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करूयात.

संपर्क करण्यासाठी केवळ लॅंडलाईनचा वापर केला जायचा, तेव्हापासून टॅपिंगची प्रक्रिया सुरु होती. मात्र त्याकाळात ही प्रक्रिया पुष्कळ सोपी होती. रेडिओ स्कॅनरच्या मदतीने सहजपणे फोन टॅप केला जायचा. रेडिओ स्कॅनर अनेक प्रकारच्या फ्रिक्वेन्सीमध्ये काम करण्यास सक्षम असायचा. त्यामुळे टेलिफोनवर होणारी चर्चा रेडिओ स्कॅनरमधील मायक्रोफोनच्या मदतीने ऐकणं शक्य होतं.

मात्र त्यानंतर आलेले स्मार्टफोन्स नावाप्रमाचे स्मार्ट अर्थात हुशार असल्याने त्यात टॅपिंगची प्रक्रिया मात्र क्लिष्ट झाली. स्मार्टफोन कोणत्याही लाईनवर नाही तर ट्रान्समिशन आणि डिजीटल एन्कोडिंगवर आधारित आहे. त्यामुळे स्मार्टफोनवरील संभाषण टॅप करणं कोणत्याही व्यक्तीला शक्य नाही. केवळ टेलिकॉम कंपन्याच फोन टॅप करू शकतात. तेही सरकारचे आदेश असतील तरच!

 

 

फोन टॅपिंगचे अधिकार कोणाला?

महाराष्ट्र एटिएस, मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग आणि लाचलूचपत प्रतिबंधक विभाग या तीन विभागांना फोन टॅप करण्याचे अधिकार आहेत. हे तिन्ही विभाग संशयित व्यक्तींचे फोन एक आठवड्यापर्यंत टॅप करू शकतात. अर्थात यासाठी त्यांना अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) यांची परवानगी लागते. शिवाय केलेल्या टॅपिंगच्या निष्कर्षासह अहवालही सादर करावा लागतो.

 

 

विनाकारण तसेच पुराव्यांअभावी व्यक्त होणारा संशय यांसाठी फोन टॅपिंग करता येत नाही.

कोणकोणत्या प्रकरणांमध्ये फोन टॅपिंग केलं जातं?

देशाची सुरक्षा कायम राखण्यासाठी फोन टॅपिंग हा महत्वाचा मुद्दा मानला जातो. दहशतवादी हल्ला, इतर देशातील दहशतवादी संघटनांच्या हालचाली यांमध्ये कोणताही संशय आलास फोन टॅपिंगचे शस्त्र वापरता येतं.

 

 

त्याशिवाय चोरी, दरोडा, आंततराष्ट्रीय स्तरावरील एखादा गुन्हा, सायबर अॅटॅक या घटनांमध्ये संशयितांचे फोन टॅप केले जातात.

हे ही वाचा – ज्या एका मॅच फिक्सिंगमुळे क्रिकेट कायमचं बदललं – ते संपूर्ण नाट्य चित्रपटाला लाजवेल असं आहे!

सर्वसामान्यांचे फोन टॅप होतात का ?

कोणत्याही सर्वसामान्यांचे फोन विनाकारण टॅप करता येऊ शकत नाहीत. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीबद्दल तक्रार दाखल होऊन, त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे हाती येत नाहीत, तसेच त्याचा गुन्हा हा देशहिताविरुद्ध असल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत सर्वसामान्यांचं संभाषण टॅप करण्याचा अधिकार कुणालाही देण्यात आलेला नाही.

कायदा काय सांगतो?

परवानगी नसताना फोन टॅपिंग करणं हा गुन्हा आहे. टॅपिंगची माहिती तसेच कायद्याव्दारे परवानगी असलेल्या यंत्रणांव्यतिरिक्त इतर कुणीही फोन टॅप्स करू शकत नाही, यामध्ये मोबाईल कंपन्यांनाही तो अधिकार देण्यात आलेला नाही.

कुणालाही कुणाचा फोन टॅप करता येत नाही. जर एखादी व्यक्ती असं कृत्य करत असेल तर त्याला तुरुंगवास होऊ शकतो. तसेच वरील एजन्सीही देशद्रोह किंवा गंभीर गुन्ह्याचा संशय असलेल्या व्यक्तींचेच फोन टॅप करतात.

 

 

तुमचा फोन कुणी विनाकारण टॅप करत असल्याचा संशय असेल, तर तुम्ही तातडीने त्याची तक्रार करू शकता. हा गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधितांना कारावास होतो.

फोन टॅपिंग कसं ओळखावं?

१. फोनवर बोलताना बॅग्राऊंड साऊंडकडे लक्ष द्या.

२. फोन विनाकारण गरम होत असेल, तर तपासा. बॅटरी सुस्थितीत असूनही फोन तापत असेल तर सावध रहा.

३. फोनमध्ये विचित्र अॅक्टिव्हिटी होत असतील तर काळजी घ्या, फोन हॅक होण्याचं हे लक्ष असून शकतं.

४. अपरिचित नंबर्सवरून वारंवार येणारे कॉल, मेसेज यांना प्रतिसाद देऊ नका, प्रतिसाद देऊनही असे फोन येत असतील, तुमची वैयक्तिक माहिती उघड होत असेल तर तातडीने पोलिसांशी संपर्क साधा.

५. दर महिन्याला मोबाईलचे बील काळजीपूर्वक वाचा, अनेकदा या बीलमधूनही फोन टॅप झाल्याची माहिती उघड होते.

६. आपण वापरात असलेला टेडा अतिरिक्त खर्च होत नाही ना? हे तपासत रहा.

 

 

टॅपिंग ही कायद्याने बंदी असल्याने आपल्यासारख्या सर्वसामान्यांचे फोन टॅप होत नाहीत, त्यामुळे विनाकारण काळजी टाळा. अर्थात याचा अर्थ दूर्लक्ष करा असा होत नाही.

जोपर्यंत आपण कोणताही गुन्हा करत नाही, तोपर्यंत आपल्याला फोन टॅपिंगची भिती बाळगण्याचं काहीही कारण नाही.

आता गृहमंत्र्यांचा फोन टॅप वैध की अवैध? रश्मी शुक्लांवर कारवाई होणार का? की या फोन टॅपिंगमधून आणखी गुंतागुंत निर्माण होणार? हे येणारा काळच ठरवेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version