Site icon InMarathi

श्रीलंकेच्या ‘बुरखा बॅन’मागील ज्वलंत इतिहास जाणून घेणं प्रत्येकासाठी अत्यावश्यक आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गेले काही दिवस श्रीलंकन सरकार जगभरातल्या माध्यमातून चर्चेचा विषय बनला आहे आणि कारण या सरकारने मुस्लिम स्त्रियांच्या बुरखा आणि मदरशांवर घातलेली बंदी.

या बंदीवर जगभरातील मुस्लिमांनी निषेधाचा सूर उमटवला. पाकिस्तानचे उच्चायुक्त साद खट्टक यांनी या निर्णयाची निर्भत्सना करत सुरक्षिततेच्या नावावर ही बंदी घालून श्रीलंकन सरकार फुटिरवादाला खतपाणी घालत आहे असं सांगितलं.

या बंदीमुळे केवळ मुसलमानांच्या भावना दुखावल्या जातील असं नाही तर अल्पसंख्यांकांच्या मानवाधिकारांवरच ही गदा असल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

 

पहिल्यांदा जेंव्हा कोविड काळात मृत्यू होत होते तेंव्हा कोविड लागण झाल्यानं मृत्यू झालेल्या व्यक्तीला दफ़न न करता दहन करावं असे आदेश देण्यात आले होते.

जर मृतदेह पुरला तर संसर्ग वाढण्याच्या भीतीतून हा निर्णय घेण्यात आला होता मात्र त्याहीवेळेस मुस्लिम संस्था आणि मानवाधिकार यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता.

आताही बुरखाबंदीवर आधी कायमस्वरूपी बंदीचा निर्णय घेतल्यानंतर जगभरातून मुस्लिम आणि मानवाधिकार यांचा विरोध होऊ लागल्यावर या निर्णयाबाबत अद्याप ठोस काही पावले उचलली नसल्याचं सांगितलं जात आहे.

===

हे ही वाचा श्रीलंका सरकारने इस्लामविरुद्ध युद्ध पुकारलंय का? वाचा एका धाडसी निर्णयाबद्दल!

===

श्रीलंका सरकारचे ज्येष्ठ मंत्री आणि प्रवक्ते केहेलिया रामबुकवेला यांनी नुकतंच सांगितलं की, बुरखा बंदीचा निर्णय सर्वसंमतीनं घेतला जाणार आहे.

गुप्तचर यंत्रणेकडून जी माहिती मिळालेली आहे तिचा सखोल अभ्यास केल्यानंतरच योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे.

 

 

मुळात ही बुरखाबंदी आणि मदरसाबंदी का? तर त्यामागे श्रीलंकन सरकारची काही भूमिका आहे आणि या भूमिकेमागे कारणं आहेत!

२०१९ च्या ईस्टरला कोलंबोत ठिकठिकाणी झालेले बॉम्बस्फोट. यामागची सत्यकथा जाणून घ्यायची तर थोडं मागे जावं लागेल. २०१९ च्या एप्रिल महिन्यातली गोष्ट. भारतीय गुप्तचर संस्था रॉला काही गुप्त कटांचा सुगावा लागला होता. या कटाची सत्यता सांगणार्‍या काही गोष्टी हाती लागल्या होत्या.

या माहितीनुसार श्रीलंकेतील चर्च आणि भारतीय दूतावासावर मोठ्या स्वरूपाचे हल्ले होणार आहेत. या कारस्थानाचा सुगावा लागताच रॉनं ही माहिती स्टेट इंटेलिजन्स सर्व्हिस (SIS)ला दिली.(SIS ही श्रीलम्केची गुप्तचर संस्था आहे).

SIS नं ही टीप श्रीलंकन सरकारच्या कानावर घातली. पुढील कारवाईसाठी आदेशाची वाट बघितली जात होती. मात्र याचवेळेस दुर्दैवानं सरकारमधे अंतर्गत राजकारणाला ऊत आला होता. या अंतर्गत राजकाराणामुळे महत्वाच्या आणि गंभीर अशा या मुद्द्याकडे चक्क दूर्लक्ष झालं.

 

 

त्यानंतर उजाडला २१ एप्रिलचा दिवस. ईस्टर संडेचा हा दिवस ख्रिस्ती बांधवांसाठी विशेष महत्वाचा. या दिवसाला ख्रिस्ताच्या पूनर्जन्माचा दिवस म्हणून आनंदानं साजरा केला जातो.

राजधानी कोलंबोतही मोठ्या उत्साहाचं वातावरण होतं. ठिकठिकाणच्या प्रार्थनास्थळांमधे ख्रिस्ती बांधवांची प्रार्थनेसाठी गर्दी जमली होती. इतर वर्षी असतो तोच उत्साह आणि आनंद सर्वत्र भरुन राहिला होता.

श्रीलंकेच्या सफरीवर आलेले परदेशी पर्यटकही या सोहळ्यात उत्साहानं सहभागी झालेले होते. या आनंदावर आणि उत्साहावर विरजण घालणारी भयंकर घटना लवकरच घडणार आहे हे कोणाच्या ध्यानी मनीही नव्हतं. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. हसर्‍या चेहर्‍यांच्या चिंधड्या उडाल्या.

आनंद साजरा करायला आलेले अबालवृध्द, स्त्री पुरूष यांच्या मृतदेहांचा खच पडला. हे कृत्य करणार्‍या आतंकी संघटना मात्र पवित्र कार्य केल्याच्या आणि स्वर्गात जागा मिळाल्याच्या आनंदात होत्या.

त्या दिवशी सकाळी कोलंबोत एकूण सहा ठिकाणी बॉम्बब्लास्ट झाले. यात तीन चर्च आणि तीन लक्झरी हॉटेल्सचा समावेश होता. हे सगळे हल्ले आत्मघातकी हल्ले होते. मानवी बॉम्बनी मानवी जीवनांचा बळी घेतला होता.

जखमींना मदत करण्याची यंत्रणेची तारांब्ळ उडालेली असतानाच कोलंबोनजिक आणखीन दोन धमाके झाले. या सिरियल धमाक्यांत ३०० हून जास्त लोक मृत्यूमुखी पडले तर ५०० पेक्षा जास्त गंभीररित्या जखमी झाले. मृत्यू झालेल्या लोकांत परदेशी पर्यटकही होते.

 

 

ख्रिस्ती बांधवांच्यादृष्टीनं अत्यंत पवित्र असणार्‍या या दिवशी असे घातक हल्ले करणारी संघटना होती तरी कोणती? या स्फोटांचा आरोप दोन स्थानिक मुस्लिम संस्थांवर होता, पैकी पहिली आहे- नॅशनल तौहीद जमात.

हे एक कट्टर इस्लामिक संघटन असून शरीयाचा प्रचार, प्रसार यात अग्रेसर आणि बुध्द मुर्त्यांची नासधूस, तोडफोड यासाठी ती परिचित आहे.

तौहीद जमातचा म्होरक्या जहरन हाशिमला या हल्ल्यांचा मास्टरमाईंड मानलं जातं. मात्र तपास यंत्रणांना दाट संशय होता की हे इतकं मोठं कारस्थान स्थानिक पातळीवर होणं शक्य नाही. यांना बाहेरच्या शक्तींनी मदत केलेली आहे. इस्लामिक स्टेटनं या हल्ल्यांची जबाबदारी घेतल्यावर या संशयाला पुष्टी मिळाली.

इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबू बक अल-बगदादीने प्रसारीत केलेल्या एका व्हिडिओमधे या आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू झालेल्या मानवी बॉम्बना शहिद जाहिर करून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

श्रीलंकेत इस्लामिक स्टेटनं केलेला हा पहिला आणि मोठा धमाका होता. मात्र इस्लामिक स्टेटचा थेट संबंध पुराव्यानीशी सिद्ध होऊ शकला नाही.

या हल्ल्यानंतर श्रीलंका सरकारनं सुरक्षेच्या दृष्टीनं काही कठोर पाऊलं उचलली. यात मदरशांवर बंदी आणि बुरखाबंदी यांचा समावेश होता. सोशल मिडीया साईटसवर बंदी घालण्यात आली.

ही बंदी तात्पुरत्या स्वरूपाची असली तरिही  मुस्लिमद्वेशानं मात्र सिंहली लोकांच्या मनात द्वेशाची बीजं अधिक गहिरी केली. याचं कारण आहे, एकुण लोकसंख्येच्या केवळ दहा टक्के लोकसंख्या असलेल्या मुस्लिम समाजाचं देशावर असलेलं नियंत्रण.

===

हे ही वाचा चीनने इस्लामविरुद्ध हत्यार उचलण्यामागचं कारण भारतासाठी धक्कादायक आहे!

===

भारताप्रमाणेच श्रीलंकेतल्या निवडणुकांतही अल्पसंख्य म्हणवले जाणारे मुस्लिम निर्णायक भूमिका बजावत आलेले आहेत. इतर धर्मियांच्या तुलनेत हा समाज आर्थिकदृष्ट्या संपन्न आनि सुबत्ता असणारा आहे हे दुसरं कारण.

आधीच मुस्लिम सामाजाचा रागराग करणारा सिंहली समाज या अमानवी आणि अमानुष घटनेनंतर आणखीनच कडवा द्वेषी बनला. या द्वेषाचे परिणाम नंतरच्या बदललेल्या राजकीय घटनांमधून स्पष्ट दिसून आले.

 

 

श्रीलंकेत मुस्लिमधार्जिणा समजला जाणारा राष्ट्रपती बदलून सिंहली जनतेला आपला वाटणारा राष्ट्रपती निवडून आला. आता PTA ची कडक अंमलबजावणी चालू आहे तर मदरसा आणि बुरखाबंदी येऊ घातली आहे.

यापूर्वीच एक हजारांहून जास्त मदरशांवर बंदी आलेली आहेच. धार्मिक अतिवादाचं कारण देत मुस्लिम स्त्रिया आणि मुलींच्या बुरख्या घालण्यावर श्रीलंका कायमस्वरूपी बंदी आणण्याच्या विचारात आहे.

बुरखाबंदी करणारा श्रीलंका हा एकमेव देश नाही-

श्रीलंकेआधी इतर देशांनीही सुरक्षा आणि त्या त्या देशाच्या संस्कृतीविरोधी परंपरा म्हणून बुरख्यावर बंदी घातलेली आहे. यात स्वित्झरलॅण्ड, फ़्रान्स, बेल्जियम, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, बल्गेरिया, नेदरलॅण्ड या देशांचा समावेश आहे.

या सर्व देशांत चेहरा पूर्ण झाकला तर कडक दंड ठोकला जातो.

बेल्जियममध्ये मुस्लिमांची संख्या १ लाख असली तरिही केवळ तिनशे महिला बुरखा आणि नकाब वापरतात. नेदरलॅण्डमधे चेहरा पूर्ण झाकणारं हेल्मेटही वापरायला बंदी आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version