Site icon InMarathi

आज गुगलच्या डुडलवर झळकणाऱ्या या भारतीयाला पाहून ऊर अभिमानाने भरून येईल!

google doodle inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतीय कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, किंबहुना देशातच नव्हे तर परदेशातील अनेक महत्वाच्या पदांचं नेतृत्व करताना भारतीय हमखास दिसतात. कुशाग्र बुद्धी असलेल्या भारतीयांचं कायमच जगभरात कौतुक होतं.

अनेक भारतीयांनी जिद्द आणि अफाट बुद्धीमत्ता यांच्या बळावर गाठलेलं शिखर ही केवळ देशासाठीच नव्हे तर जगासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

 

 

याचेच एक प्रतिक म्हणजे आज गुगलने एका भारतीयाला दिलेली मानवंदना.

काम असो वा मनोरंजन, गुगलचा वापर न करणारा माणूस हल्ली दुर्मिळच, त्यामुळे आज सकाळी गुगल सुरु केल्यानंतर दिसणारे डुडल पाहून अनेकांना प्रश्न पडला, मात्र या प्रश्नाचं उत्तर ज्यांना सापडलं तेंव्हा मात्र प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून आला.

 

 

हे ही वाचा – गुगल डुडल्स कोण तयार करतं? ह्याची सुरवात कशी झाली?? जाणून घ्या रंजक माहिती!

तर ज्या भारतीयाला खास गुगलनेही कल्पक डुडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे, ते भारतीय म्हणजे उडुपी रामचंद्र राव.

भारताचे नाव केवळ जगभरात नव्हे तर अवकाशातही पोहोचवणारे खगोलशास्तज्ञ यु. आर. राव यांचा १० मार्च हा जन्मदिवस. त्याचीच आठवण ठेवत गुगलने त्यांना आदरांजली वाहिली आहे.

अवकाश क्षेत्रात अमेरिका, चीन, रशिया हे देश कायमच भारतापुढे असतात, हा समज राव यांनी आपल्या जिद्द आणि अफाट मेहनतीच्या बळावर खोटा ठरवला.

कर्नाटकातील एका खेड्यात जन्मलेल्या राव यांना लहानपणापासूनच अवकाश क्षेत्र खुणावत होते. गुजरातमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी अमेरिका गाठली. त्यानंतर टेक्सासमध्येच नावाजलेल्या विद्यापीठात त्यांना नोकरी मिळाली, मात्र आपल्या देशाच्या प्रगतीची आस कायम असल्याने नोकरी सोडून ते भारतात स्थायिक झाले.

 

 

अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीत ते संशोधन करताना तेथे डॉ. विक्रम साराभाई यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. देशाने पहिला आर्यभट्ट हा उपग्रह सोडला तेव्हापासून त्यांची अवकाश संशोधनातील कारकीर्द सुरू झाली.

अवकाशात पहिलावहिला उपग्रह सोडण्याच्या मोहिमेत ते सक्रीय होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी डॉ राव यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर त्यांनी तातडीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि आर्यभट्ट हे भारताचं स्वप्न अवकाशात स्थिरावलं.

यू.आर. राव यांनी १९८४ ते १९९४ या काळात भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे नेतृत्व केले. दहा वर्षे ते अवकाश खात्याचे सचिव व इस्रोचे अध्यक्ष होते. ‘आर्यभट्ट’नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली भास्कर, अ‍ॅपल, रोहिणी, इन्सॅट आदी श्रेणींचे किमान वीस उपग्रह तयार झाले.

 

 

यानंतरचा सर्वाधिक महत्वाचा टप्पा म्हणजे भारताचे ‘मिशन मंगळ’. मंगळावर स्वारी करण्यासाठी इतर देशांकडे असलेलं आर्थिक पाठबळ, सुसज्ज साधनं यांची भारताकडे कमतरता होती, मात्र डॉ राव यांनी त्यावेळी सहका-यांना मंत्र दिला, कल्पकता आणि जिद्दीचा.

४५० कोटी रुपयांतील परवडणारी मंगळ मोहीम हे यशाचे शिखर सर करणा-यांच्या मागे हात होते डॉ राव यांचे. इस्त्रोच्या प्रत्येक सहका-याशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे डॉ राव यांनी भारताला अवकाश क्षेत्रात एक स्थान मिळवून दिले.

भौतिक संशोधन प्रयोगशाळेच्या गव्हर्निंग कॉन्सिलचे चेअरमन म्हणून ते कार्यरत होते. तिरूवनंतपूरममध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे ते कुलगुरू होते. परदेशातील विद्यापीठांमधील कामांची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. मात्र परदेशात राहूनही भारतीय म्हणून त्यांनी आपली कायमच ओळख जपली.

त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मविभूषण देऊन भारत सरकारने गौरविले होते.

 

 

२४ जुलै २०१७ रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने बेंगलोर येथे त्यांची प्राणज्योत मावळली, मात्र इस्त्रोच्या प्रत्येक मोहिमेतून त्यांचे नेतृत्व, जिद्द, सहका-यांना दिलेली शिकवण आजही जपली जाते.

या भारतीयाच्या जन्मदिनी गुगलने अवकाशाचेच डुडल साकारून त्यांना दिलेली मानवंदना म्हणजे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version