Site icon InMarathi

या महाराणीच्या बांगड्यांमुळे इंग्रजांसमोर उभं राहिलं न भूतो न भविष्यति आव्हान…!

avanatibai inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारताचा स्वातंत्र्य लढा हा खूप शौर्यगाथांनी सजलेला आहे. ‘देशापेक्षा काही मोठं नाही, अगदी स्वतःचा जीवही नाही’ हे काही वीरांनी मान्य केलं म्हणून भारताला वेळीच स्वातंत्र्य मिळालं.

 

 

७३ वर्षांनी सुद्धा ज्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल लोकांना वारंवार नवीन माहिती मिळते त्यावरूनच त्याची व्याप्ती आपल्या लक्षात येते.

भारताव्यतिरिक्त जगातील कित्येक देशांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष केला होता. पण, जिथे स्वातंत्र्य चळवळ ही मोहीम म्हणून कमी वेळात मान्य झाली आणि त्या देशांना स्वातंत्र्य मिळालं असं म्हणता येईल.

जहालवाद की मवाळवाद या अंतर्गत विचार प्रणालीतील मतभेदांचा फायदा इंग्रजांनी हुशारीने घेतला असं आज म्हणायला हरकत नसावी.

१८५७ चा ‘राष्ट्रीय उठाव’ ही पहिली देशव्यापी मोहीम होती जेव्हा देशाच्या सर्व भागातील क्रांतिकारी एकत्र आले आणि इंग्रजांविरुद्ध लढले. देशव्यापी आंदोलन झालं, कित्येक लोकांनी जीव गमावला. पण, तरीही भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी थोडे थोडके नाही तर तब्बल ९० वर्ष वाट बघावी लागली.

मेरठ म्हणजे दिल्ली पासून ४० किलोमीटर लांब गावातून इंग्रज सरकार विरुद्ध सुरू झालेला विद्रोह अगदीच नगण्य संपर्क साधन असतांनाही संपूर्ण देशात एखाद्या वणव्याप्रमाणे पसरला याचं श्रेय आपल्या क्रांतिकारी लोकांना जातं. ‘राष्ट्रीय उठाव’ इतका आक्रमक होता की, त्यामुळे ब्रिटिश आर्मी सुद्धा घाबरली आणि त्यांनी हा विद्रोह रोखण्यासाठी अतिरिक्त सैन्यदलाची मागणी इंग्रज सरकारकडे केली होती.

हे देखील वाचा – या राणीने पोर्तुगीज सैन्याला धूळ चारली होती, कोण होती ही वीरांगना?

 

 

१८५८ मध्ये हा विद्रोह शमवण्यात इंग्रज सैन्याला यश आलं. झांसी आणि मध्यप्रदेशातील रामगड ही ती ठिकाणं होती जिथून इंग्रज सरकारला सर्वात जास्त विरोध झाला होता.

झाशीच्या राणीबद्दल तर आपण इतिहासात अनेकदा वाचलं आहे, पण रामगडच्या राणी अवंतीबाई लोढी यांच्याबद्दल आपल्याला फारच नगण्य माहिती असते.

१८५७ च्या ‘राष्ट्रीय उठावाची’ ठिणगी पडली तेव्हा राणी अवंतीबाई लोढी यांनी स्वतः ४००० सैन्याचं नेतृत्व केलं आणि त्यांनी ब्रिटिश सैन्याला ‘खेरी’ इथे हरवलं होतं याचा उल्लेख फार कमी ठिकाणी आहे.

 

 

राणी अवंतीबाई लोधी यांच्या कार्याबद्दल जाणून घेऊयात :

१६ ऑगस्ट १८३१ रोजी अवंतीबाई यांचा जन्म जमीनदार परिवारात झाला. अत्यंत स्वावलंबी आणि स्वाभिमानी असलेल्या अवंतीबाई यांनी लहानपणीच घोडस्वारी, तलवार चालवणे, धनुर्विद्येचं प्रशिक्षण घेतलं.

गावोगावी त्यांच्या पराक्रमाचे किस्से ऐकायला येऊ लागले आणि वयाच्या १८ व्या वर्षी त्यांचं विक्रमादित्य लोधी या राजपुत्रासोबत विवाह झाला.

विक्रमादित्य लोधी यांच्या सततच्या आजारपणामुळे राणी अवंतीबाई लोधी यांच्यावर राज्य सांभाळण्याची जबाबदारी आली होती. पण, ब्रिटिश राज्यकर्त्यांना ते मान्य नव्हतं.

विक्रमादित्य लोधी यांची दोन्ही मुलं हे सज्ञान नसल्याने ब्रिटीशांनी आपली हुकूमत घोषित केली आणि रामगडला ‘कोर्ट ऑफ वॉर्ड’ हे नाव देऊन तिथे शेख मोहम्मद या ब्रिटिश अधिकाऱ्याची नेमणूक केली. या अपमानाने राणी अवंतीबाई लोधी यांना इंग्रजांविरुद्ध बंड पुकारण्यास प्रवृत्त केलं.

१८५७ चा ‘राष्ट्रीय उठाव’ ही विरोध दर्शवण्याची योग्य वेळ होती.

 

 

हे देखील वाचा – रामप्यारी, ४० हजार शूर महिला आणि तैमूरला घडवलेली अद्दल: अभिमानास्पद अज्ञात इतिहास

१८५७ मध्ये जेव्हा इंग्रजांनी आपल्या बंदुकांना गाय आणि डुकराच्या मासाचे काडतुस लावण्यास सुरुवात केली तेव्हा सर्वांनी एकत्र येत इंग्रजांच्या या निर्णयाचा विरोध केला.

या निर्णयाविरोधात शेजारच्या राजांचं एकमत होत नव्हतं तेव्हा राणी अवंतीबाई लोधी यांनी स्वलिखित पत्र आणि काही बांगड्या शेजारील राजांना पाठवल्या आणि सांगितलं की, “जर तुमच्यामध्ये देशाबद्दल थोडं जरी प्रेम आणि एकनिष्ठता असेल तर इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी तलवारी उचला. अन्यथा, मी पाठवलेल्या बांगड्या घाला आणि घरीच बसा.”

एका स्त्री ने राजांना अशा त-हेने थेट आव्हान देणं त्याकाळी चर्चेचा विषय ठरला होता. अनेकांनी राणीच्या या वर्तनाला दोष दिला मात्र या वीरांगनेला त्याची पर्वा नव्हती. आपली कृती ही देशहितासाठी असल्याने कोणत्याही दोषारोपाला सामोरं जाण्याचा त्यांचा निश्चय होता.

या कृतीचा सकारात्मक परिणाम असा झाला की इंग्रजांबद्दलची भिती बाळगून असलेल्या इतर गावांतील राजांना आपल्या मिंधेपणाची जाणीव झाली. इतकेच नव्हे तर गावोगावचे तरुण राणीच्या या एका कृतीने जागे झाले. एका स्त्रीने केलेल्या या एल्गारात आपणही सहभागी व्हावे या विचारांनी आसपासच्या गावातील तरुण युवक, राजेे त्यांच्या सैन्यासह एकत्र आले.

 

 

राणी अवंतीबाई लोधी यांचा लढा हा आता एकटीचा नव्हता, त्यांचं सैन्य, इतर राजांकडून येणारा पाठींबा हा दिवसागणिक वाढत होता. ४००० सैनिकांची फौज झाल्यावर त्यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारण्यात आलं होतं.

भारतीयांविरोधात आपला सहज विजय होईल असं समजून ब्रिटिश सैन्य गाफील राहिलं आणि त्यांचा राणी अवंतीबाई लोधी यांच्या छोट्या सैन्यासमोर पराभव झाला. ही हार ब्रिटिश सरकारच्या जिव्हारी लागली आणि त्याचा बदला म्हणून त्यांनी संपूर्ण रामगडला आग लावली होती. सुरक्षेसाठी सैन्याने त्यावेळी राणीला देव्हारगड इथे जंगलात हलवण्यात आलं होतं.

इंग्रज सैन्याने देव्हारगड वरही हल्ला केला आणि आपल्या पराजयाचा प्रतिशोध घेतला.

 

 

कमी सैन्य असल्याने राणी अवंतीबाई लोधी यांना एका वेळेनंतर इंग्रज सैन्याला रोखता आलं नाही. आपला पराभव आणि पर्यायाने मृत्यू समोर दिसत असतांनाही राणी अवंतीबाई लोधी यांनी एका सैनिकाची तलवार घेतली आणि स्वतःवर चालवली. पण, इंग्रजांच्या अटकेत गेल्या नाहीत त्यांनी ‘गुरीला’ युद्धनीतीचा वापर केला आणि इंग्रजांना शेवटपर्यंत परेशान केलं.

२० मार्च १८५८ रोजी राणी अवंतीबाईंनी आपल्या सैनिकांना हा लढा पुढे सुरु ठेवत तो जिंकण्याची शपथ देत आपला प्राण सोडला.

राणी अवंतीबाई लोधी यांनी लॉर्ड डलहौसी च्या राज्यविस्ताराचे क्रूर मनसुबे धुळीस मिळवले होते. इंग्रज अधिकारी वाडिंग्टन यांना सुद्धा राणी अवंतीबाई लोधी यांच्याकडून ‘मांडला’ येथील युद्धात पराभव पत्करावा लागला होता. मांडला या राज्यावर त्यानंतर बराच काळ राणी अवंतीबाई यांनी राज्य केलं होतं.

कार्याचा गौरव आणि आठवण

राणी अवंतीबाई लोधी यांच्याबद्दल गोंदिया (जुनं रामगढ) येथील लोकांमध्ये आजही कृतज्ञता व्यक्त होते. आदिवासी जमातीच्या एका गाण्यात या ओळींनी राणी अवंतीबाई लोधी यांच्या शौर्याचं कौतुक करण्यात आलं आहे:

“राणी अवंतीबाई ही आमची आई आहे, जिने आमच्यासाठी ब्रिटिशांना हरवलं. ती एकमेव आहे, जिने तत्कालीन राज्यकर्त्यांना ‘बांगड्या घाला’ हे पत्र पाठवून सांगितलं. आमच्या राणीने ब्रिटिशांना पळता भुई थोडी अशी परिस्थिती आणली होती. जेव्हा जेव्हा तिने घोडेस्वारी केली तेव्हा तिच्या तलवारीने मैदानावरील दिवस गाजवला. “

जबलपूर येथील बर्गी या धरणाचं नामकरण हे राणी अवंतीबाई लोधी यांच्या कार्याची आठवण म्हणून बदलून ‘राणी अवंतीबाई लोधी सागर’ असं करण्यात आलं आहे.

 

 

नर्मदा नदीवर बांधण्यात आलेलं हे धरण हे जबलपूर शहराला पाणीपुरवठा करतं आणि त्यासोबतच वीजनिर्मिती साठी सुद्धा योगदान देतं.

भारतीय पोस्ट ने १९८८ आणि २००१ मध्ये राणी अवंतीबाई यांच्या नावाने २ स्टॅम्प तयार करून लोकांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळत राहील असा प्रयत्न केला आहे.

 

 

२०११ पासून राणी अवंतीबाई यांच्या जीवनावरील एक धडा अभ्यासक्रमात सुद्धा समाविष्ट करण्यात आला आहे.

अन्यायाविरोधात लढण्यासाठी भारतीयांना एकतेचा कानमंत्र देणा-या या वीरांगनेला मानाचा मुजरा…!

हे देखील वाचा – “स्वसंरक्षणासाठी” पुढे मागे न बघता चक्क अकबराच्या गळ्यावर कट्यार ठेवणारी वीरांगना!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version