Site icon InMarathi

शनिवारची बोधकथा : व्यापा-याच्या फसवणूकीचा असाही उलटा परिणाम

saturday story inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आटपाट नगरातील गणु कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हरत-हेचे प्रयत्न करायचा. घरात दुधदुभत्याची कमतरता नव्हती त्यामुळे त्याच्या या कामात हातभार लावणारी त्याची पत्नी सकाळीच उठून लोणी काढायची आणि गणु लोण्याचा हंडा घेऊन विक्रीसाठी गावोगावी फिरायचा.

 

 

ऊन, पाऊस कशाचीही तमा न बाळगता तो इतर गावांमध्येही जाऊन लोण्याची विक्री करायचा. दिवसेंदिवस गणुला यश मिळत होतं त्यामुळे व्यवसायातील त्याचा आत्मविश्वासही वाढत होता.


हे देखील वाचा – शनिवारची बोधकथा : लाकडाच्या फळीची गोष्ट!

 

 

शेजारील गावात खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणा-या श्यामशी त्याची ओळख झाली ती योगायोगानेच! गणुच्या हंड्यातील लोणी श्यामने चाखले आणि ते तातडीने विकत घेतले.

पुढे दर आठवड्याला न चुकता तो गणुकडून एक किलो लोणी विकत घ्यायचा आणि त्याचवेळी गणुही त्याच्याकडून घरी नेण्यासाठी एक किलो साखर विकत घ्यायचा.

दर सोमवारी लोण्याचा हंडा घेऊन गणु आला की त्या दोघांमध्ये गप्पा व्हायच्या. व्यवसायाबाबत सल्लामसलत व्हायची आणि १ किलो लोण्याचे पैसे तो गणुच्या हातावर टेकवायचा. व्यवसायातील हे नातं कधी मैत्रीत बदललं ते त्यांनाही कळलं नाही.

एके दिवशी इतर सामानाचे मोजमाप करताना श्यामने नकळत लोणीही तराजुत तोललं आणि तराजुने चक्क ९०० ग्रॅमच वजन दाखवलं. 

आपली मोजण्यात चूक झाली असावी असं समजून त्याने पुन्हा एकदा वजन मोजले मात्र काटा ९०० ग्रॅमवरच अडकलेला. गणुची अजाणतेपणी चूक झाली असावी असं मानून त्याने त्या विषयाला पुर्णविराम दिला.

 

 

पुढील आठवड्यात गणुने लोण्याची विक्री केल्यानंतर श्यामच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

गणुची पाठ फिरताच त्याने लोण्याचं वजन केलं. काट्याने दाखविलेला ९०० ग्रॅमचा आकडा पाहून मात्र श्याम चांगलाच उखडला.

हे देखील वाचा – शनिवारची बोधकथा : शक्तीपेक्षा “श्रद्धा” श्रेष्ठ! आयुष्यात ‘गुरूं’चं महत्त्व स्पष्ट करणारी कथा

यानंतर पुढील दोन-तीन आठवडे श्यामने गणुची परिक्षा घेेतली. दरवेळी ९०० ग्रॅमच वजन भरल्याने अखेरिस श्यामचा संयम सुटला आणि तो गणुवर बरसला.

मित्र असूनही व्यवहारात दगा दिल्याचा आरोप करत त्याने गणुला शिव्यांची लाखोली वाहिली.

गोंधळलेल्या चेह-याने गणुनी सारं काही ऐकून घेतलं आणि नंतर शांतपणे तो म्हणाला, “माझ्या घरात मोजमापाचं काहीच साधन नाही. किंबहुना माझ्या परिसरातही कुणाकडे वजनकाटा नाही. त्यामुळे १ किलो लोण्याच्या बदल्यात मी तुझ्याकडून जी १ किलो साखर विकत घेतो, ते माप सारखंच असल्याने मी त्याचाच आधार घेऊन लोण्याचे वजन करायचो .”

त्याच्याकडून हे उत्तर ऐकताच श्याम जागीच चपापला. आर्थिक फायद्यासाठी आपणच केलेली फसवणूक अखेर आपल्यावरच उलटली या विचाराने तो भानावर येत वरमला.

‘पेरावे तसे उगवते’ हा पुस्तकात वाचलेला सुविचार आपण अनेकदा प्रत्यक्ष अनुभवतो. ‘जैसी करनी वैसी भरनी’ म्हणत हिंदी साहित्यातून आपल्याला हिच शिकवण दिली जाते, तर “जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे इश्वर” म्हणत मराठी काव्यही आपल्याला वारंवार हाच बोध देतं.

 

 

अर्थात चांगल्या फळाची अपेक्षा करून मग सत्कर्म करण्यापेक्षा मुळातच आपली कृती ही प्रामाणिक, खरेपणाची असावी असेही थोरामोठ्यांकडून सांगितले जाते. अर्थात त्याचे पालन कसे होते याबाबत मतमतांतरे आहेच.

मात्र आपल्या कृत्याचा हिशोब हा आपल्यालाच चुकता करावा लागतो ही बाब प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवी.

हे देखील वाचा – शनिवारची बोधकथा : कितीही वेळा हरलात, तरी ही कथा तुम्हाला उठून लढण्याचं बळ देईल!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version