Site icon InMarathi

रोजच्या जेवणातील या भाज्यांचं “मूळ” आहे काहीतरी भलतंच! वाचा

veg 2 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगभरातली खाद्य संस्कृती हे सहिष्णूतेचं, सर्व समावेशकतेचं उत्तम उदाहरण आहे. आपल्याला अगदी ‘आपले वाटणारे’ काही पदार्थ हे चक्क परदेशी खाद्यसंस्कृतीतून आलेले असतात. अशाच काही भाज्या आणि फळं आहेत, जे आपल्या स्वयंपाकघरातले अविभाज्य भाग आहेत मात्र ते खरंतर परदेशी आहेत.

लग्न कार्यात आवडीनं केली जाणारी जिलेबी जशी भारतीय नाही, तसा उपवासाला खाल्ला जाणारा साबुदाणाही भारतीय नाही. रोज उठल्यावर हवाच असणारा चहा आपला नाही की हवीहवीशी वाटणारी कॉफीही आपली नाही.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मसाल्याचे अनेक घटकही आज भारतीय मातीत रूजले असले तरीही प्रत्यक्षात ते परदेशातून आलेले आहेत. आज आपण अशाच काही भाज्या आणि फळं बघणार आहोत, जी परदेशातून आपल्याकडे येऊन अगदी आपल्या घरचीच झालेली आहेत.

बटाटा-

 

असा एकही भारतीय पदार्थ नाही ज्यात बटाट्याचा वापर होऊ शकणार नाही. जिथे बटाट्यापासूनचे पदार्थ बनत नाहीत असं स्वयंपाकघर भारतात सापडणं विरळाच!

मुलांच्या पोळीच्या रोलमधला बटाटा, दाक्षिणात्य डोशाच्या पोटात दडलेली बटाट्याची भाजी असो की काश्मीरमधला गोडसर चवीचा दम आलू किंवा अगदी मुंबईचा वडापाव, सगळ्यात घुसलेला असा बटाटा चक्क परदेशी पाहुणा आहे. या पाहुण्याला ओसरी दिल्याने याने चांगलेच हातपाय पसरले आणि आपल्या बहुतांश पदार्थांशी गट्टी जमवली आहे.

सोळाव्या शतकापर्यंत बटाटा भारतीयांना परिचितही नव्हता. पोर्तुगीज व्यापारी आपल्यासोबत बटाट्याला घेऊन दक्षिण अमेरिकेत घेऊन गेले आणि तिथून तो हिंदुस्थानात येऊन इथेच रूळला.

लाल मिरची-

आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. झटका देणारी मिरचीही परदेशी पाहुणी आहे. हिचं मूळ मेक्सिकोमधलं आहे. ख्रिस्तोफ़र कोलंबसनं समजूतीचा घोळ करून ठेवल्याने मिरची ही भारतीय समजली जाते.

वास्तवात वास्को दी गामा १४९८ मध्ये मिरची भारतात आणली. गंमत म्हणजे त्यापूर्वी पदार्थाला झणझणीत बनविण्यासाठी काळी मिरी वापरली जात असे.

 

चिंच- 

 

अगदी नैवेद्याच्या पानातही आवश्यक अशी चिंच गुळाची आमटी आणि त्यातली आंबट चिंच. चाटपासून सांबारपर्यंत अत्यावश्यक चिंचेचा कोळ आणि तो ज्यापासून काढला जातो ती चिंचही भारतीय नाही. भारतीयच काय पण ती मुळात आशिया खंडातलीही नाही.

मुळची आफ्रिकेतली चिंच व्यापार्‍यांनी आपल्यासोबत भारतात आणली. काही जुन्या नोंदींनुसार, उत्तर अमेरिकेत ख्रिस्ताच्याही जन्माआधीपासून चिंच वापरात आहे. प्राचीन इजिप्तमधेही चिंचेच्या वापराच्या नोंदी आढळतात.

 

भोपळा-

 

लहान मुलांना झोपताना आपण म्हातारी आणि तिच्या टुणुक टुणुक भोपळ्याची गोष्ट पिढ्यानपिढ्या सांगतो. यातला हा भोपळा भारतीय नाही. ही मध्य अमेरिकेची भारताला आणि जगाला मिळालेली भेट आहे.

अमेरिकन व्यापार्‍यांनी युरोपमार्गे तो भारतात आणला. आता तो सांबारपासून घार्‍यांपर्यंत सगळीकडे मुक्त संचार करतो आहे.

 

काजू-

 

कोकण म्हटलं, की पहिले आठवतात ते काजूगर. कोकणाची ओळख काजूगरांशिवाय अपूर्ण आहे. पंजाबी करीमधली काजू पेस्ट ते विविध गोड पदार्थातला याचा वापर बघता तो भारतीयच असणार अशी तुमची खात्री असेल तर ते साफ चूक आहे.

काजू ब्राझिलियन वंशाचा आहे. जगात सगळीकडे तो पोहोचला असला तरीही भारतात गोवा आणि कोकण पट्टीत तो रुजला आणि इथली ओळख बनला. पोर्तुगिजांनी काजूही भारतात आणून इथलाच बनवून टाकला.

 

फ्लॉवर-

 

गल्लो गल्ली मिळणारा, भारताच्या खेड्यापाड्यातशेतांमधून उगवणारा फ्लॉवर हा भारतात फक्त गेल्या दिडशे वर्षांपासून वास्तव्याला आहे. इंग्लंडमधून १८२२ मध्ये तो भारतात आला. ब्रिटिश गेले आणि मागे जाताना इंग्लिशसोबत फ्लॉवर ठेवून गेले.

ब्रिटिशांचा फ्लॉवर आज आपण चायनिज डिशमधे हातोहात खपवतो ही खाद्यसंस्कृतीच्या सरमिसळीची गंमतच म्हणायची.

 

अननस-

 

अननस हा मध्य अमेरिकेतला आणि कोलंबसचा शोध आहे. याला नाव काय द्यायचं? यात सुरवातीला जरा गोंधळ होता.

ख्रिस्तोफरनं याचं बारसं, द पाईन ऑफ द इंडिज असं केलेलं होतं. नंतर ते ॲपल झालं.

 

राजमा-

 

भारतीय पंजाबी जेवणाची ओळख असणार्‍या राजमा चावल मधल्या राजमाला जर अभारतीय शिक्का दिला तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. राजमा मेक्सिकोमधून आलेला आणि पंजाबात स्थिरावलेला पाहुणा आहे. हा भारतात कसा पोहोचला? ती एक गंमत आहे.

सगळ्यात आधी मेक्सिकोमधून तो युरोपमध्ये आणि नंतर तिथून तो दक्षिणोत्तर भारतीय किनारपट्टीवर पोहोचला. याचं श्रेयही अर्थातच पोर्तुगीजांना जातं.

नुसता उकडून खाल्ला जाणारा राजमा पंजाब्यांनी प्रेमानं बटर आणि मसाल्यात बुडवला. आता जगभरात पंजाबी हॉटेल्स राजम्याला भारतीय म्हणून एकदम आत्मविश्वासाने विकताना दिसतील.

 

टोमॅटो-

 

सूप, सार, रस्सम, सॉस आणि भारतातल्या बहुसंख्य भाज्यांच्या ग्रेव्हित घुसलेला टोमॅटो दक्षिण अमेरिकेतून भारतात आला आहे. बटाटा जसा आला आणि इकडच्या खाद्य पदार्थात ठाण मांडून बसला तसाच टोमॅटोही आला आणि ठाण मांडून बसला आहे.

 

पेरू-

 

मिठू मिठू पोपटाला आवडणारी पेरूची फोड हा उन्हाळ्यात मिळणारा भारतीयांचा लाडका फळ प्रकार आहे. पोर्तुगीजांनी भारतात आणलेला पेरू परदेशी वाटतही नाही इतका तो इथल्या मातीत मिसळला आहे.

हाच पेरू मलेशियातही नेला. मात्र याला तिकडे पोर्तुगीज जम्बु या नावानं ओळखतात.

 

सिताफळ-

 

सिताफळ रबडी आणि आईस्क्रिम असे लोकप्रिय पदार्थ आपल्या नावावर असलेलं सिताफळ १७ व्या शतकात बहुतेक पोर्तुगीजांनी भारतात आणलं असावं.

 

लिची-

 

उन्हाळ्यात भारतीय फळ बाजारपेठेत हमखास आढळणारं आणि तमाम भारतीयांचं आवडतं फळ आहे लिची.

आज आपण चायनिज वस्तूंवर बहिष्कारांच्या गोष्टी करतो मात्र गंमतीची गोष्ट ही की भारतीयांचं लाडकं उन्हाळी फळं चक्क चायनिज आहे. आणखीन गमतीची बाब ही की आजच्या घडीला भारत हा कॅन्ड लिचीचा जगातला सर्वात मोठा निर्यातदारही आहे.

प्रसिध्द ब्लॉग लेखक विर संघवी यांच्या म्हणण्यानुसार, एकदा एखादं फळ, भाजी किंवा पदार्थ भारतीयांना आवडला, की ते त्याला हृदयात स्थान देतात. त्याला आपल्या चवीत घोळवून आपलं बनवतात. त्यांच्या या म्हणण्यात तथ्यही आहे कारण वर उल्लेख केलेल्या बर्‍याच फळांचा भारत हा सगळ्यात मोठा निर्यातदार आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht

tps://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version