Site icon InMarathi

ऑस्ट्रेलियात देवदूताप्रमाणे काम करणाऱ्या भारतीय माणसाची कहाणी वाचून अभिमान वाटेल!

daman shrivastav inmarathi1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे खरंतर आपलं जीवनच बदलून गेलेलं आहे. बाहेर जाताना सतत एक प्रकारची भीती मनात असते. लॉकडाउन मुळे तर अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या.

लॉकडाऊन मध्ये सगळ्यात जास्त हाल कोणाचे झाले असतील तर ते भिकाऱ्यांचे. रस्त्यावर कोणीही फिरत नाही त्यामुळे रोज त्यांना जो थोडाफार पैसा किंवा जेवण मिळायचं ते मात्र थांबलं.

बरं ही परिस्थिती फक्त भारतापुरतीच मर्यादित नव्हती, तर संपूर्ण जगभरातच या लोकांचे हाल झाले. प्रत्येक देशात थोड्याफार प्रमाणात तरी का होईना भिकारी असतातच. अर्थात काही देशांमध्ये त्यांची संख्या कमी असेल.

युरोप,अमेरिका, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी देखील अल्प प्रमाणात का होईना भिकारी लोक आहेत. पण तिथे त्यांना भिकारी/बेगर्स असं म्हटलं जात नाही. असे शब्द वापरल्याने त्यांचा अपमान होतो असं समजलं जातं म्हणून, तर त्यांच्यासाठी जो शब्द वापरला जातो तो आहे “होमलेस पीपल”.

 

 

या होमलेस लोकांकडे तिथे मानवतावादी दृष्टिकोनातून पाहिलं जातं. हे लोक रस्त्यावर एक रुमाल पसरून त्या समोर बसतात. कुणी पैसे टाकावे यासाठी ते याचना करत नाहीत, पण येणारे जाणारे त्यावर पैसे टाकतात. कोण फारच कनवाळू असेल ते त्यांच्यासाठी कपडे, अंथरूण, स्वेटर वगैरे गोष्टी देतात.

तिकडे थंडी खूप असते म्हणून मग कोण कॉफीही नेऊन देतात. त्यांची स्वच्छता करणे, केस विंचरणे, केसांना तेल लावणे इत्यादी गोष्टीदेखील लोक करतात. त्यांना एकटं वाटू नये म्हणून अगदी त्यांच्याबरोबर गप्पा देखील मारत बसतात.

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरातलं हे सर्वसाधारण परिस्थितीतलं नेहमीचं दृश्य, परंतु कोरोना आला आणि त्याने जगाबरोबरच ऑस्ट्रेलियाला देखील घेरलं. त्यातही सगळ्यात जास्त फटका बसला तो मेलबर्नला.

तिथे दिवसाला पाचशे केसेस आढळून यायला लागल्या आणि मग तिथल्या सरकारने सहा महिन्यांचा लॉकडाउन जाहीर केला. आवश्यक सामानाचे  दुकान सोडल्यास इतर सर्व व्यवहार बंद झाले. अगदी रस्त्यावर फिरण्यास देखील मनाई करण्यात आली.

या परिस्थितीत होमलेस लोकांचे जेवणाचे हाल सुरू झाले. त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली, पण त्याच वेळेला त्यांच्या मदतीला धावून गेला एक भारतीय. त्याचं नाव आहे दमन श्रीवास्तव. दमन हे मेलबर्नमध्ये शेफ म्हणून काम करतात.

 

 

५४ वर्षांचा दमन दिल्लीमध्ये वाढला आणि नव्वदच्या दशकात त्यांनी कामाला सुरुवात केली. अगदी पूर्वेकडील काही देशातही त्यांनी नोकरी केली आहे. नंतर ते ऑस्ट्रेलिया मधील मेलबर्नला गेले आणि तिथेच स्थायिक झाले.

दमन श्रीवास्तव यांनी गल्फ वॉर मध्येदेखील जेवण पुरवण्याचं काम बगदाद मध्ये केलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हे काम नवीन नव्हतं, परंतु परिस्थिती मात्र नक्कीच वेगळी होती.

दमन श्रीवास्तव यांनी बगदादमध्ये युद्ध चालू असताना देखील हजारो टन अन्न गरजू लोकांपर्यंत मोफत पोहोचवले होते. तेच कार्य त्यांनी मेलबर्नमध्ये देखील केलं. तिथेही होमलेस लोक, नोकरी गेलेले एकटे राहणारे लोक, शिवाय अनेक देशातून आलेले अडकून पडलेले विद्यार्थी यांना जेवण मिळवण्याचा कोणताच मार्ग शिल्लक नव्हता. त्यांच्यापर्यंत जेवण पोहोचवण्याचं काम दमण श्रीवास्तव यांनी केलं.

 

 

दमन श्रीवास्तव हे स्वतःच्या घरामध्ये सगळं जेवण बनवायचे. त्यांच्या मदतीला त्यांची पत्नी आणि मुलगी होते. तशी मुळातच ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या कमी आहे तरीदेखील तिथेही हा प्रश्न उभाच राहिला होता.

दमन दररोज १५० प्लेट जेवण बनवायचे. लॉकडाऊन मध्ये दोन- तीन तासांची शिथिलता मिळायची, त्या वेळेमध्ये ते हे जेवण होमलेस लोकांपर्यंत, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तसेच जॉबलेस लोकांपर्यंत अगदी मोफत पोहोचवायचे. त्यासाठी स्वतःची गाडी वापरली आणि लोकांना मदत केली.

सध्याच्या काळात मीडिया, सोशल मीडिया या सगळ्या गोष्टींमुळे लगेच त्यांच्या या कार्याला तिथे प्रसिद्धी मिळाली. तोंडोतोंडी पसरलेल्या या बातमीमुळे त्यांचे कार्य वाखाणले जाऊ लागले आणि त्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले.

खूप लोक असे होते, की त्यांना लोकांना मदत करायची होती, पण ती कशा स्वरूपात करायची हे कळत नव्हते. त्यांना दमन श्रीवास्तव यांच्यामुळे ते कार्य करणे सोपे झाले. त्यांना लोकांचे फोन येऊ लागले आणि मदत कशी करायची याची विचारणा होऊ लागली.

शेवटी दमन श्रीवास्तव यांनी इंटरनेटवर एक वेब पेज काढले आणि त्यावर फंड रेझिंग चालू केले. या पैशांमुळे ट्रकमध्ये जास्त लोकांपर्यंत जेवण घेऊन जाणे शक्य झाले. अनेक गरजू लोकांपर्यंत ते मोफत पुरवता आले.

 

 

दमन हे स्वतः ऑस्ट्रेलिया मध्ये जेव्हा गेले, त्यावेळेस त्यांच्याकडेही फार काही पैसे नव्हते. त्यांनी स्वतःही होमलेस असणे आणि जेवण नसणे या दोन्ही परिस्थितीचा सामना केला आहे. म्हणूनच ते म्हणतात,

“घर नसणे आणि जेवण नसणे या परिस्थितीत माणसाला काय वाटू शकते हे मी समजू शकतो. म्हणूनच अशा लोकांना मदत करावी असं माझं अंत:करण मला सांगतं. त्यानुसारच मग मी वागायचं ठरवलं. माणसावर कोणतीही परिस्थिती कधीही उद्भवू शकते. परिस्थितीने मलाही शिकवलं असं म्हटलं तर वावगं होणार नाही.”

बाहेरच्या देशात जाऊन माणुसकीची जाणीव ठेवणं खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि एक भारतीय म्हणून आपल्याला देखील ही गोष्ट शिकण्यासारखी आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version