Site icon InMarathi

वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ती झाली IAS, डोळ्यात पाणी आणणारी संघर्षगाथा

kinjal singh inmarathi 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्रत्येक मुलगी आपल्या नवऱ्यासाठी राणी असेलच असं नाही, पण ती तिच्या बाबांसाठी राजकुमारीच असते!!!

आपण खूपवेळा पाहतो, आई मुलींपेक्षा बाबा आणि मुलगी यांचं नातं जास्त घनिष्ठ असतं. मुली जन्मतात त्याच मुळी लोकाच्या घरचं देणं म्हणून. त्यामुळं बाबाच्या काळजाचा तुकडा असतो मुलगी. मुलांपेक्षा मुलगी जास्त जवळची वाटते.. जबाबदारीने काम करते.

एरवीही‌ बायकोने केलेल्या पदार्थांना शंभर नावं ठेवणारा बाबा लेकीनं केलेल्या नकाशासारख्या चपातीचं, पण कौतुक करत ती संपवतो. जमेल तितकं तिचं मन राखतो. लग्नाची झाली, की चांगला मुलगा पाहून तिचं लग्न लावून देतो. पाठवणीच्या वेळी खूप रडतो…

 

 

असा आपला काळजाचा तुकडा २० -२२ वर्षं सांभाळायचा आणि एक दिवस दुसऱ्याच कुणाला कायमसाठी देऊन टाकायचे. किती कठीण आहे हे सारं..! पण तशीच ओढ मुलीला पण बाबांसाठी असते.

शाळा, शिक्षण पूर्ण केलं की बाबांना मदतीचा हातभार लावावा म्हणून मुलगी पण नोकरी करते. बाबांसाठी कधी कधी आईही होते.

सासरी गेल्यावरही बाबांची काळजी करते.. गरजेनुसार मदतही करते. मुलीही खूपदा मुलांसारखी आई वडीलांची जबाबदारी घेतात आणि पूर्ण करतात.

अशीही एखादी मुलगी असते जी वडीलांवर झालेल्या अन्यायाचा विरोध करुन सत्यपरिस्थिती लोकांसमोर आणते. वडीलांवर त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये झालेल्या अन्यायाला वाचा फोडते. त्याच डिपार्टमेंटमध्ये काम करत त्या अन्यायाची पाळंमुळं खणून काढते.

किंजल सिंग ही ती मुलगी. आपल्या डीएसपी वडीलांच्या नकली एन्काऊंटरमध्ये झालेल्या हत्येचा कट उघडकीला आणणारी शूर बाबांची शूर मुलगी किंजल सिंग!!!

किंजलचे बाबा एस.पी.सिंग हे उत्तरप्रदेश यथील गोंडा येथे कर्तव्यावर होते. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा किंजल फक्त सहा महिन्यांचं बाळ होती.

३५ वर्षांपूर्वी एका नकली एन्काऊंटरमध्ये पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांनी आपलं वैयक्तिक वैर काढत किंजलच्या वडीलांची हत्या केली होती.

 

 

दोन छोट्या मुली आणि पत्नी या त्यांच्या मृत्युमुळे उघड्यावर आल्या होत्या. किंजलच्या आईला अनुकंपा तत्त्वावर वाराणसी येथील कोषागार कार्यालयात नोकरी दिली गेली, पण नोकरी दिली म्हणून गेलेला पती परत मिळणार होता का?

किंजलच्या आईनं दोन्ही मुलींचं संगोपन केलं. तेव्हा किंजलच्या आईला दोन‌ आघाड्यांवर लढावं लागलं. एकीकडे आपल्या मुलींचं संगोपन, नोकरी सांभाळणं आणि दुसरीकडं आपल्या पतीवर झालेल्या अन्यायाविरोधात लढणं.

किंजल आणि प्रांजल यांना केवळ शिक्षण देणंच नाही, तर त्यांना आयुष्यात कणखरपणे उभं करणं हे पण काम आईनं केलं. या दोन्ही मुली आईचा संघर्ष बघतच लहानाच्या मोठ्या झाल्या होत्या.

दोघींनाही भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याची महत्त्वाकांक्षा होती. ज्यामुळे त्यांच्या वडीलांवर जो अन्याय झाला होता तो निदर्शनास आणून देता येईल.

वास्तविक असे नकली एन्काऊंटर हा आपल्या न्यायव्यवस्थेत असलेला असा वाईट भाग आहे, ज्यानं‌ या संपूर्ण न्यायव्यवस्थेला प्रश्नचिन्हांकीत केलं आहे.

संपूर्ण न्याय प्रक्रिया संशयास्पद वाटायला लावणारे हे एन्काऊंटर आहेत. सगळेच अधिकारी वाईट नसतात, पण काही वाईट अधिकारी सगळ्या डिपार्टमेंटला बदनाम करतात.

कधी-कधी आपली वैयक्तिक भांडणं त्याचे राग मनात धरून एखाद्या निष्पाप माणसाला आयुष्यातून उठवणारे अधिकारी याचं मुख्य कारण आहेत. किंजलच्या वडीलांवर हीच वेळ आली, पण त्याचं परिमार्जन त्यांच्या मुलीनं केलं.

 

 

किंजल आणि प्रांजल या दोघी बहिणींना त्यांच्या आईनं प्रेरणा दिली आणि त्यामुळेच या दोघीही भारतातील सर्वात अवघड असलेली IAS परीक्षा द्यायच्या तयारीला लागल्या.

नुसतीच तयारी केली नाही तर त्यांनी २००७ मध्ये ही अवघड परीक्षा पास होऊन दाखवलं.

किंजलचं आय एम एस अधिकारी होण्याचा उद्देश फक्त पद मिळवणं हा नव्हता. आपल्या वडीलांवर अन्याय करुन त्यांचा एन्काऊंटर करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांना त्याची शिक्षा देऊन तुरुंगात पाठवणं हे ध्येय उरात बाळगून किंजलनं प्रशासकीय सेवेत जाण्याची महत्त्वाकांक्षा ठेवली होती.

किंजलनं ती नुसती मनातच ठेवली नाही तर त्यावर काम करायला सुरुवात केली. दिल्लीमधील लेडी श्रीराम काॅलेजमध्ये तिनं प्रवेश घेतला. शिक्षण चालू असतानाच तिच्या आईला कॅन्सर झाला असल्याचं निदान झालं.

न डगमगता तिनं आपलं शिक्षण चालू ठेवलं, पण आईला एकदा किंजलनं वचन दिलं की बाबांना मारणाऱ्या लोकांना ती योग्य शिक्षा करेल.

थोड्या दिवसांनी आईचं निधन झालं, मग प्रांजललाही किंजलनं आपल्याकडं दिल्लीला बोलावून घेतलं आणि आपल्या ध्येयावर दोघींनी लक्ष केंद्रित केलं.

कोणताही सणवार लग्नकार्य काहीही असो या बहिणी अभ्यास सोडून कुठंही जात नव्हत्या. दोन्ही बहिणी एकमेकींना आधार देत, प्रेरणा देत. तारुण्यसुलभ गोष्टींचा विचार पण त्या करत नव्हत्या. त्यांचं एकच ध्येय होतं परीक्षा पास होणं.

 

 

लोकसेवा आयोगामार्फत घेतलेली परीक्षा किंजल २००७ ला पास झाली. ही परीक्षा पास झालेल्या किंजलनं २०१३ साली तिच्या वडीलांचा एन्काऊंटर करणाऱ्या १८ पोलिस अधिकाऱ्यांना तुरुंगाची हवा खायला पाठवलं.

हा प्रवास सहजासहजी झाला नव्हता. ६ वर्षं किंजल न्यायव्यवस्थेशी झगडत होती. वडीलांच्या मृत्यूनंतर ३१ वर्षांनी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी किंजलनं जीवाचं रान केलं.

लखनौच्या सीबीआय न्यायालयाने तिच्या प्रयत्नांची दखल घेतली आणि एस पी सिंग यांच्या हत्येत सहभागी असलेल्या १८ अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

किंजलच्या आईनं २००४ पर्यंत हा लढा दिला. कॅन्सरनं त्यांना मध्येच गाठलं. तरीही त्या हिंमतीने लढत होत्या. किंजलही अतिशय प्रामाणिक अधिकारी म्हणूनच ओळखली जाते. कोणत्याही राजकीय नेत्याचा, पक्षाचा दबाव आला म्हणून दबून जाऊन काम करत नाही.

आपल्या वडीलांवर झालेल्या अन्यायाची पाळंमुळं खणून किंजलनं कोणतीही मुलगी मुलांच्या इतकीच आपल्या आई वडिलांना आधार देऊ शकते हे सिद्ध केलं आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version